नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – २१ )

ते अस्तित्वात नसलेले प्रश्न म्हणजे! लोक काय म्हणतील? मी हे अपयशी जीवन कसं जगू? माझ्या मागे माझ्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं काय होईल? सर्व भौतिक वस्तूंशिवाय मी कसा जगू? तर लोकं ही बोलतच असतात.यश अपयश हे आपल्या मानण्यावर असते कारण अपयश ही यशाची पायरी असते. या जगात आपल्यावर कोणी अवलंबून नसतं. जो जन्माला येतो त्याची सर्व व्यवस्था निसर्गात असतेच.भौतिक वस्तू गरज ही आपल्या मनाला चंचल मनाला असते. देहाला नाही!.ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार येईल त्याने आपण मेलेलेच आहोत! असं समजून जगायला सुरुवात केली की त्याला कळतं आपलीमुळे या जगात कोणाचेच काहीच अडत नाही. आपले आयुष्य हे फक्त आपल्या पुरते मर्यादित होते..

आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे..असो! तर तेथील अगदी पाच सहा वर्षाची मुलेही ते झाडू बनविण्याचे काम सराईतपणे करत होते. ते सगळे त्या परिस्थितीतही आंनदी दिसत होते. त्यावर विजयला प्रश्न पडला.याही परिस्थितीत लोक जगतातच ना? आम्हीही जगलोच की? मग! लोक छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक आत्महत्या का करतात? तेथेच बाजूला त्यांच्यापैकी एक तरुण मुलगा होता. थंडीतही तो उगडाच होता. त्याच्या उगड्या देहाकडे विजयने पाहिले तर तो बलदंड शरीराचा पण सडपातळ होता. त्याच्या पोटावर आजच्या भाषेत ऐट पॅक होते. ते पाहून विजय मनातल्या मनात म्हणाला,” हे असं शरीर मिळविण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात ते ह्याने मेहनत करून मिळविले आहे.विजयला त्याचा फोटो काढण्याचा मोह टाळता आला नाही. असेच काही वर्षापूर्वी विजयने रस्त्याच्या कडेला अंघोळ करत असलेल्या एका कष्टकरी तरुण स्त्रिला त्याने पाहिले होते. रस्त्याने चालणारे स्त्री- पुरुष तिला वळून वळून पाहत होते. ती इतकी सुंदर होती. जर तिचा जन्म योग्य ठिकाणी झाला असता तर नक्कीच ती सुपर मॉडेल झाली असती.तेंव्हा पहिल्यांदा विजयचा नशिबावर विश्वास बसला.. लहानपणी विजयला वाटायचं की खूप मेहनत करून माणूस श्रीमंत होतो. त्याने खूप मेहनत केल्यावर त्याच्या लक्षात आले हे कष्टकरी लोक आयुष्यभर घाम गळतात आणि रक्त जाळतात पण तरीही त्यांच्यापैकी कोणी श्रीमंत होत नाही.अक्कल शून्य लोक लबाडी, भ्रष्टाचार, अफरातफर आणि फसवणूक करून श्रीमंत होतात.अक्कल शून्य लोकांना वारसाहक्काने करोडो रुपयांची संपत्ती मिळते. ती नशिबाने.या लोकांकडे स्वतः मेहनत करून एक दिवसही स्वतःचे पोट भरण्याची अक्कल नसते.

आज विजय रस्त्याने चालत असताना रस्त्याच्या मधोमध वेल्डिंगचे किटलं उडत असताना दिसली. वर पाहिले तर नक्की अँगल जोडत होते की तोडत होते ते कळत नव्हते. त्या अँगलच्या  बरोबर खाली विजय पाऊल टाकणार इतक्यात एक माणूस ओरडला मागे जा अँगल पडतोय आणि क्षणार्धात वीस एक फुटावरून तो अँगल खाली रस्त्यावर पडला. विजय त्या पडलेल्या अँगल पासून फक्त एक पाऊल मागे होता नाहीतर आज त्याच काही खरं नव्हतं. ते म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणून कोणालाच काही इजा झाली नाही. क्षणभर विजयही घाबरला होता. दुसऱ्या क्षणाला विजयच्या मनात विचार आला अजूनही आपल्या सोबत ती अज्ञात शक्ती आहे जी वेळोवेळी आपले रक्षण करते. योगायोगाने आज संकष्ट चतुर्थीही होती. विजयला घडणाऱ्या संभाव्य गोष्टीची पूर्व संकेत मिळण्याचे प्रमाण हळू हळू वाढू लागले होते. खरं तर तिथे अपघात होऊ शकतो असे त्याला वर पाहता क्षणी वाटून गेले  होते. विजयच्या जीवावर बेतले असते असा हा पहिला प्रसंग नव्हता. तर यापूर्वी अशी बरीच संकटे आली होती. एक दिवस विजय एका मुलीकडे पाहत हायवे क्रॉस करत होता. इतक्यात त्याच्या मनात काय आलं तर त्याने वळून पाहिले एक गाडी भरधाव वेगाने येत होती. आज सारख संकट त्याच्यापासून फक्त एक पाऊल लांब होतं. तो वळला नसता तर अपघात अटळ होता. विजय आणि त्याचे शालेय मित्र समीरची गाडी घेऊन पिकनिकला गेले होते. ते शिवनेरी किल्ला आणि अष्टविनायकापैकी ओझर आणि लेण्याद्रीच्या गणेशाचे दर्शन घेऊन रात्री माघारी मुंबईला येत होते माळशेज घाटात त्यांच्या ड्रायव्हरला झोप यायला लागली नशीब त्याच्या शेजारी बसलेला विजयचा मित्र जागा होता नाहीतर त्या दिवशी गाडी दरीत कोसळलीच असती. ते सगळे सुखरूप मुंबईला परत आले ही त्या श्री गणेशाचीच कृपा असावी. एक दिवस विजय एका मॉल जवळील बस स्टॉपवर उतरला आणि तोच त्याला झाडाची एक भली मोठी फांदी तुटण्याचा आवाज आला विजयने सर्वाना ओरडून सांगितले. झाड पडतंय क्षणात सर्व बाजूला झाले आणि आज सारखेच पाऊलच्या अंतरावर ती फांदी तुटून पडली. ती फांदी म्हणजे अर्धे झाडच होते.  तेंव्हाही कोणाला साधं खरचटलं नाही. एक दिवस विजय कारखान्यात थ्री फेस मशीनचा प्लग बदलत होता. नवीन प्लग मध्ये सर्व वायरी जोडून त्याने मशीन चालू केली.  पण मशिनला हात लावण्यापूर्वी कोठून तरी विजयच्या मनात विचार आला.  हात लावण्यापूर्वी मशिनला टेस्टर लावून पहावा! आणि त्याने टेस्टर लावला तर फुल करंट येत होता. त्याने मेन स्विच बंद केला आणि मोटारीच्या वायरी काढून पहिल्या तर वायरींगचा  कलर कोड चुकीचा लावला होता.  म्हणजे हिरवी वायर आर्थिगला देतात ती फेसला दिली होती. त्या दिवशी जर विजयने मशिनला हात लावला असता तर त्याला मोठा शॉक लागला असता. त्या दिवशी विजयला पहिल्यांदा खात्री पटली होती की या जगात कोणती तरी अज्ञात शक्ती आहे. त्या शक्तीनेच मला या संकटापासून वाचवले होते. तेंव्हा पासूनच खरं तर नास्तिक विजय आस्तिक व्हायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली  होती.

विजयच्या मनात सतत विचार येत होता.मी माझ्या भविष्याचा विचार नव्याने करायला हवा का? कारण मला माझं भविष्य आता सुरक्षित वाटत नाही. सार विश्व आज स्वार्थाने भरलेलं आहे. कोणीही विश्वास ठेवण्या पात्र राहिलेला नाही. माझ्या बुद्धिमत्तेचा वापर मला आता माझं भविष्य सुरक्षित करण्यासाठी करायला हवा! नाहीतर भविष्यात माझ्यावर इतरांवर अवलंबून राहायची वेळ येऊ शकते. मी सध्या जे काम करतोय ते काम करून माझं भविष्य सुरक्षित होणार नाही. त्यामुळे आता मला हे काम सोडावेच लागेल. पण ते काम सोडून मी करू काय? रस्त्यावर वस्तू विकणे आता माझ्या प्रतिष्ठेला शोभणार नाही. आणि दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणे आता मला जमणार नाही. त्यामुळे एखाद दुकान सुरू करणे हा एकच पर्याय सध्या उपलब्ध आहे. पण सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हा पर्याय किती योग्य ठरेल याबद्दल शंका वाटतेय.कारण स्वप्नील मागील दोन वर्षे जागेचे भाडे भरून भरून कसा व्यवसाय करतोय ते मी डोळ्याने पाहतोय.मग! दुसऱ्याच्या हाताखाली महिन्याकाठी एक विशिष्ट रक्कम घेणे उत्तम वाटते कारण त्यात आपल्या काहीच जोखीम नसते. मी एकच नोकरी धरून ठेवली हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा होता हे आता म्हणजे उशिरा माझ्या लक्षात येते आहे. नोकरी करताना पगार कमी असला तरी चालेल पण त्या नोकरीत आपले भविष्य सुरक्षित आहे का? हे पाहणे खूपच गरजेचे आहे.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..