![p-92009-train-numbers](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2022/04/p-92009-train-numbers.jpg)
प्रत्येक प्रवासीगाडीला नाव असतं. नाव नसेल, तर ती गाडी जिथून निघते त्या सुरुवातीच्या स्टेशनच्या किंवा जेथे ती अखेरीस थांबते, त्या शेवटच्या स्टेशनच्या नावानं ओळखली जाते; परंतु रेल्वे स्टेशनं, तिकीट कंट्रोल रूम येथे मात्र त्या गाड्या क्रमांकानुसार ओळखल्या जातात.
१०० वर्षांपूर्वी गाडीला साधा एक अंकी किंवा दोन अंकी क्रमांक असे. मुंबईहून निघणाऱ्या गाड्यांना ‘डाऊन’ गाडी व मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना ‘अप’ असं संबोधले जाई. त्याप्रमाणे डाऊन गाडीला जो क्रमांक दिला असेल, त्याच्या पुढचा क्रमांक अप गाडीसाठी दिला जाई.
उदाहरणार्थ, वन-डाऊन मुंबई-हावरा मेल व्हाया नागपूर; तर टू-अप हावरा मेल व्हाया नागपूर.
परंतु एखादी गाडी अपवादही असे. उदाहरणार्थ, हावरा स्टेशनकडून मुंबईकडे अलाहाबाद मार्गे येणारी गाडी ‘डाऊन’ म्हटली जाई व मुंबईकडून हावराला जाणारी गाडी ‘अप’ म्हणत. त्याकाळात हावरा स्टेशनवरून मुंबईकडे निघणारी ती पहिली गाडी होती.
जसजशी रेल्वेच्या गाड्यांची संख्या वाढत गेली व त्यानुसार रेल्वेचे विभाग, पोटविभाग बनत गेले, तसतशी गाड्यांना क्रमांक देण्याच्या पद्धतीत सतत सुधारणा करावी लागते आहे. तीन अंकी, मग चार आणि आता पाच अंकी क्रमांक देणं क्रमप्राप्त झालं आहे.
गाड्यांना दिला जाणारा क्रमांक खालील गोष्टी दर्शवितो:
पहिले १, २ हे क्रमांक दूर पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस किंवा नवीन आलेल्या गाड्यांना दिले जातात.
पहिल्या आकड्यावर ० असणं ही विशेष गाडीची ओळख समजली जाते.
पहिला अंक ५ अंक असेल तर ती गाडी पॅसेंजर म्हणून ठरवितात.
गाडीला दिलेल्या क्रमांकातील दुसरं स्थान हे गाडीच्या झोनचं दर्शक असतं.
गाडीला दिलेल्या क्रमांकावरील शेवटची दोन स्थानं म्हणजे गाड्यांचे ओळीने लावलेले क्रमांक समजावे.
उदाहरणार्थ, कुर्ला-एर्नाकुलम (केरळ) दुरान्तो एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक १२२२३, एर्नाकुलम (केरळ)-कुर्ला दुरान्तो एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक १२२२४
हाच गाडी क्रमांक तिकिटावर येतो. प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले येताना प्रथम गाडीचा क्रमांक येतो. रेल्वे रिझर्वेशन फॉर्म भरताना गाडीचा योग्य तो क्रमांक लिहून द्यावा लागतो. रेल्वे टाईमटेबल बघताना गाडी क्रमांक माहिती असल्यास चटकन गाडीची वेळ, वगैरे सर्व शोधता येतं. आधुनिक जग अंकांचं (डिजिटल) आहे, तेव्हा अंकांशी जुळवून घेणं आवश्यकच आहे. हे रेल्वेबाबतही अनुभवाला येत राहते.
आपल्या जगण्यात रेल्वेचं असणं’ हे अत्यंत सुखदायी आहे, म्हणूनच तर रेल्वे अंतर्बाह्य समजून घेणं ही उत्सुकतेची, आनंदाची बाब ठरते; पण राजेशाही रेल्वे खऱ्या अर्थानं अनुभवायची असेल तर मात्र ज्या रेल्वेतून देश विदेशात मनसोक्त प्रवास करणं अनिवार्य आहे अशा गाड्यांपैकी आपल्याकडची एक रेल्वे आहे – ‘पॅलेस ऑन व्हील्स.’
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply