नवीन लेखन...

स्टेशन चिरेबंदी (कथा)

अस्ताव्यस्त पसरलेल्या या स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म आहेत हे स्टेशनमास्तरला सुद्धा सांगता येणार नाही. किती पूल आहेत तेही मोजावे लागतील. कुठल्या पुलावर चढल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरता येईल ? कुठे जाता येईल ? सांगता येणार नाही. कोण कुठे अडवील समजणार नाही. गर्दीत काहीही स्वत:च डोक न चालवता चालत राहिलात तरच स्टेशनच्या बाहेर पडू शकाल.


मुंबईला पहिल्यांदा केव्हा आलो होतो आठवत नाही. आठवत ते आजीला मुंबई दाखवण्यासाठी लहानपणी आलो होतो. त्यावेळी बराच वेळ आम्ही दोघंच व्हीटी स्टेशनवर थांबलो होतो. मुंबईचं ते पहिल दर्शन-लक्षात राहिलेले. आताच्या मानाने त्यावेळी गर्दी कमीच असणार, पण ती गर्दीसुध्दा आजीला फारच जाणवली होती. कुठ जातात सारी माणसं? काम शोधत मुंबईत तेव्हा आलो त्यावेळी तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळालं. त्यावेळेपर्यंत गर्दी दहापटीनें वाढली होती. आता शंभरपटीनं.

दगडी कोरीव काम, सभामंडपातील स्तंभासारखे खांब, घुमटाकार छत. त्यावर व्हिक्टोरिया क्रॉस रंगविल्याच नंतर लक्षात आल. ते बघत बघत आजीनं सहज विचारलेल अजूनही चांगलच लक्षात आहे. इथ देऊळ होत का? या प्रश्नाच उत्तर मात्र सापडल नाही. माणसाला देव मानून आपलं काम प्रामाणिकपणे मन लावून करणे म्हणजे देवाची आराधना मानंल, तर आजही व्हीटी स्टेशनमध्ये प्रवेश करताना एखाद्या पवित्र ठिकाणी- मंदिरात प्रवेश करतोय असा नेहमीच भास होतो. शहरात किती मंदिरं, मशिदी, चर्चा आहेत माहिती नाही. तिथे जाणा-यांची संख्या किती आहे माहिती नाही. पण मुंबई शहराच्या या सर्वात महत्वाच्या मंदिरातून येणाऱ्या- जाणाऱ्या कष्टक-यांची मुंबापुरीचे वारकरीच ते- त्यांची संख्या अगणितच. नित्यनेमाने सकाळ-संध्याकाळ कमानीखालून जावंच लागणार.

दिवसा इमारत उजळून निघालेली असतेच. तिचे रेखीव, रुबाबदार बांधकाम, स्वत:च व्यक्तिमत्व घेऊन उभ असत. पण आपल्याला तिकडं बघायला वेळ तरी कुठे असतो. सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या योजनेखाली या सुंदर वास्तूचा समावेश आहे. जगातून कानाकोपऱ्यातून आलेला पर्यटकही या वास्तूकडे बघत घटकाभर उभा राहतोच. एखादं तरी छायाचित्र काढतोच. रात्रीच्या अंधारातही एखाद्या पुरातनकाळी मंदिरासारखी उठून दिसायची ही वास्तू.

चर्चगेट स्टेशनची गोष्ट वेगळी आहे. तिन्ही बाजूने भुयारी मार्गातून स्टेशनवर यावं लागतं. गर्दी असतेच. चि. त्र्यं. खानोलकरांचा अजगरच तो. गर्दीचा हा अजगर सतत वळवळत असतो. सकाळी या विवरातून सळसळत बाहेर पडतो. नरिमन पॉइंटवरील असंख्य गगनचुंबी इमारतींच्या ऑफिसात विरुन जातो आणि मुकाटयाने आज्ञाधारक शाळकरी मुलासारखा संध्याकाळी आपल्या घरात जाऊन लुप्त होतो. एक व्यावसायिक दृष्टी  ठेवूनच उभारण्यात आलेल्या चर्चगेट स्टेशनला व्हीटी स्टेशनसारखी शान नाही. पण व्यावसायिक झगमगाट आहे. सेंट्रल रेल्वेपेक्षा इथून कमी वेळात जास्त लोकलगाडया सुटतात. चर्चगेट स्टेशनशी जर शेजारच्या रुबाबदार राजवाडयाला जोडल असतं तर वेगळेपण वाढल असतं. नाही तरी या इमारतीतच पश्चिम रेल्वेची आणि पर्यटन खात्याची ऑफिसेस आहेत. पण मधून वाहणाऱ्या रस्त्यांमुळे ठोकळयासारखी वाटणारी स्टेशनची इमारत अगदीच  सामान्य वाटते.

पश्चिम आणि सेंट्रल रेल्वेची उपनगरी वाहतूक जोडणारं दादर स्टेशन गर्दीच आगरच आहे. अस्ताव्यस्त पसरलेल्या या स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म आहेत हे स्टेशनमास्तरला सुध्दा सांगता येणार नाही. किती पूल आहेत तेही मोजावे लागतील. कुठल्या पुलावर चढल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरता येईल, कुठे जाता येईल सांगता येणार नाही. कोण कुठे अडवील समजणार नाही. गर्दीत काहीही स्वत:चं डोक न चालवता चालत राहिलात तरच स्टेशनच्या बाहेर पडू शकाल. नाही तर काही खरं नाही. मुंग्यांच वारुळच ते, सतत भळाभळा वाहत असतं. कोण पुढे जातय, कोण मागे येतय समजत नाही. बॉम्बे सेंट्रल म्हणजे साहिब, बीबी और गुलामधली पराणी हवेच. भायखळा स्टेशनवर गाडी आली की राणीच्या बागेतील पिंजऱ्यात आल्यासारखं वाटतं. चारीबाजूने बंद असलेल्या या स्टेशनात अंधार भरुन राहतो. बांद्रा आणि कुर्ला स्टेशन म्हणजे तेथील रेल्वेयार्डाचे भाग वाटतात- भकास- गचाळ. ठाणे आणि बोरिवली स्टेशनवरची गर्दी सोडली तर ते मुंबई संस्कृतीचे भाग वाटतच नाहीत.

माझं सर्वात आवडतं स्टेशन माटुंगा स्वच्छ गर्दीही नाही. असलीच तर दुपारी कॉलेजातील मुला-मुलींची, खूप झाडंही आहेत. पिवळया धम्मक चाफ्याची मोजून तीन झाडं आहेत. त्यात गाडी थांबल्यावर स्टेशनबाहेरच्या हॉटेलातील कडक काळया कॉफीचा दरवळ जाणवत राहतो.

मुंबईतल्या सगळया रेल्वे स्टेशनाना खाली मान घालायला लावील अस सुंदर काम सिडकोने केलंय, नवी मुंबईत, जुईनगर हे आशियातील सर्वात सुंदर स्टेशन आहे असे म्हणतात. बघायला हवं. नव्या आणि जुन्या मुंबईत काही फारसा फरक राहिला नाही.


-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक  10 मार्च 1994

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..