नवीन लेखन...

लोअर वरळी

   गिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय.


          मुंबई बंदर आणि मुंबईतील कापडयाच्या गिरण्या प्रामुख्याने शहराच्या औद्योगिकीकरणाचा पाया रचण्यात अग्रेसर. देशातील कामगार चळवळसुध्दा सुरु झाली ती मुंबईच्या गिरणगावातूनच. राजकीय, सामाजिकदृष्टया गिरणगांव किती जागरुक आहे, ते सांगायलाच नको. या गिरणगावाचा बघता बघता कसा कायापालट होतोय, हे बघण्यासारख आहे. आवडो न आवडो.

गिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय. गिरणी कामगारांची तिसरी पिढी आज गावात नांदते आहे. बाजुबाजूला होणारी प्रगती पाहून आपण मागे का, हा प्रश्न स्वत:लाच विचारत आहे. त्याच उत्तर न सापडल तर उतावीळ होऊन दिसेल तो मार्ग स्वीकारत आहे. गिरणी सोडून इतर मोठया कंपन्यांत काम करुन तो स्थिरावत आहे.

या गिरणगावाची मराठमोळी संस्कृती. संघटित कामगार स्वत:च्या गावाला न विसरलेला. या गावातल्या गिरण्या बंद पडत आहेत. एकामागून एक, तर काही बाहेरगावी जाण्याच्या मार्गावर आहेत. पण त्यांच्यामागे गिरणगावातील कामगार धावणार नाही. दुसरा काही पोटापाण्याचा मार्ग स्वीकारुन आपले पाय घट्टपण रोवून तो उभा राहील.

मुंबईत जमिनीला सोन्या-मोत्याची किंमत, त्यासाठी सगळेच धडपडणार. त्यासाठी राजकाराचे डावपेच आखरणान, बसलेल्याला उठवणार, ठरलेला परत बसण्याचा प्रयत्न करणार. या ओसाड गिरण्यांच्या जमिनी विकण्याचा प्रश्न ज्वलंत. रान उठवणारा. विका-विकू नका. गिरणगावाच्या अस्तित्वाचा प्रश्न. पण काळ कुणासाठी थांबत नाही. आर्थिक प्रवाहात सार वाहून जात.

दक्षिण मुंबईत पाय ठेवायला जागा नाही. दहा बाय दहाच्या जागेसाठी कोटी रुपये मोजावे लागतात. आता अनेक मोठमोठया कंपन्या आपल्या कंपन्यांची ऑफिसेस गिरणगावात उभ्या राहणाऱ्या नवीन इमारतींमध्ये हलवत आहेत.

पोशाखी झगमगाटात सर्व व्यवहार जिथे चालतात, तिथे तुमच ऑफिस कुठे आहे, तुम्ही राहता कुठे यावर तुमची किंमत ठरवली जाते. त्यामुळे या कंपन्याना आपली ऑफिसेस परळ, लालबाग, लोअर-परळ इथे आहेत, हे सांगण्याच जरा जिवावर येत. मार्केटिंगमध्ये प्राण ओतणाऱ्या आणि मालाकडे लक्ष न देणाऱ्या या बाजारात अनेक नवीन कल्पना जन्माला येतात. अशीच एक क्लुप्ती बघून सर्द झालो. गिरणगावाला धोका आहे तो अशा क्ल्युप्त्या योजणाऱ्या केवळ धंदा आणि पैसा मोजणाऱ्या बाजारी प्रवृत्तींचा.

कामानिमित्त एका ऑफिसात गेलो. त्यांचीं सर्व सामानाची आवराआवर चालली होती. महिना पाच लाख रुपये भरुन नरिमन पॉईंटवर ऑफिस चालवण्यापेक्षा जरा लांबवर नवीन इमारतीत ऑफिससाठी जागा घेतल्याची त्यानी सांगितल. नवीन पत्ता छापलेले, टेलिफोन  नंबर असलेले नवीन व्हिजिटींग कार्ड माझ्या हातात कोंबण्यात आल.

पत्ता वाचला. एकदा, दोनदा लाक्षात आल नाही. लिहिल होत. लोअर-वरळी. कारण वरळीला समुद्रकिनारा जवळ आहे आणि तिथे टाटा-बिर्लाच्या शो-रुम्स आहेत. परळ- लालबागच नामकरण लोअर-वरळी झाल. आता या लोअर -वरळीच अतिक्रमण नाकातोंडात जाऊन गिरणगाव गुदमरणार आहे. येणाऱ्या लोअर-वरळीत गिरणगावातील तरुण पिढीने आक्रमकपणे जागा पटकावली पाहिजे.

गिरण्यांच्या अतिरिक्त जमिनी रहिवासी निवासी इमारती बांधण्यासाठी देण्यात येणार की नाही. माहित नाही पण आजच्या घडीला अनेक टोलेजंग उंचच उंच इमारती, बंद पडलेलया गिरण्यांच्या धुराडयांशी स्पर्धा करत उभ्या राहत आहेत. गिरणगावाला उंच इमारतीच वावड असण्याचे कारण नाही.

फक्त गिरणगावातले लोक त्याचा उपयोग करु शकणार नाहीत. इथे येणाऱ्या धनिकांची गिरणगांवावर सावली पडणार. या सावलीचही भय नाही. पण त्याचा परिणाम निश्चित होणार. या नवीन लाटेत गिरणगाव संपणार का, जस गिरगाव इतिहासजमा झाल की, नवीन येणाऱ्याला सामावून घेत अधिक बळकट होणार. युनियनच्या मारामाऱ्या मतपेटीच राजकारण, गुन्हेगारीची पावल यापलीकडचा हा प्रश्न आहे. 

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक २५ ऑगस्ट १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..