नवीन लेखन...

अंधार आणि उजेड

रोज दिवाळी साजरी करणा-यांना दिवाळीत नवीन काय, असा प्रश्न पडतो. ती कशी साजरी करावी, याची त्यांना चिंता पडते. तर दिवाळीतही अंधारात राहणा-यांची संख्या कमी नाही. त्यांच्या उजेडाची काळजी  कुणी करावी?


      दिवाळी आली आणि गेली. तशी मुंबईत दिवाळी रोजच असते, रोज दिवाळी साजरी करणा-यांना दिवाळीत नवीन काय, असा प्रश्न पडतो. ती कशी साजरी करावी, याची त्यांना चिंता पडते. तर दिवाळीतही अंधारात राहणा-यांची संख्या कमी नाही. त्यांच्या उजेडाची काळजी  कुणी करावी? ज्यांना करायची असते ते सुध्दा आपल्या दिवाळीत मश्गुल असतात.

दिवाळीपूर्वीच दिवाळी इंडस्ट्री जोमाने कामाला लागते. त्यात गोरेगांव- ठाण्यातील महिला मंडळांपासून आकाश कंदील बनवणाऱ्या पोरांबरोबरच महाग भेटीच्या वस्तू बनवणाऱ्या कारखानदारांचाही समावेश असतो. मागच्या वर्षी एका पाहणीतील निष्कर्ष होता की, केवळ दिवाळीशी संबंधित ५०० कोटी रुपयांची उलाढाल होते. आणि त्यात केवळ वर्षभरातून दिवाळीत लागणारे पदार्थ-वस्तू बनवणाऱ्या कामाचा समावेश असतो. उटणे, सुवासिक तेल, रांगोळया, आकाशकंदील, पणत्या, विजेच्या माळा, दिवाळीतील फराळाचे पदार्थ घरी तयार करणारे, तसच अनेक फटाके घरोघरी जाऊन विकणारी शाळकरी मुलसुध्दा स्वत:चा वर्षाचा खर्च काढतात.

युनिसेफच्या भेटकार्डापासून फुटपाथवर बसून स्वत: काढलेली भेटकार्डे विकणारे याच दिवसात चांगला व्यवसाय करतात. मोठया दुकानांपासून फुटपाथवर हजारोंच्या संख्येने भेटकार्ड मिळतात. दरवर्षी त्यात नावीन्य भरण्याचा प्रयत्न होतो. त्यात काही हुशार मंडळ दीपावलीच्या शुभेच्छा अस न छापता सीझन्स ग्रीटिंग अस लिहितात आणि त्याच कार्डांची विक्री दिवाळी संपल्यानंतर नाताळापर्यंत चालू ठेवतात. शुभेच्छा वर्षाव चालू राहतो. त्यातूनच असलेले संबंध टिकवून वाढवण्याचे प्रयत्न होतात.

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या किंवा महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या टेबलावर तर भेटकार्डाचा खच पडतो. बहुतेक जण ती कार्ड बघून टाकून देतात. पण जनसंपर्काबाबत जागरुक असलेली मंडळी मात्र ज्याची कार्डे येतात त्यांना आवर्जून धन्यवादाची पत्र पाठवतात.

गेल्या काही वर्षात शहरातील गिफ्ट कल्चर फारच जोमात वाढलय. मोठमोठया कंपन्या, कारखानदार, व्यावसायिक ज्यांच्यांशी त्यांचा सातत्याने संबध येतो. अशा व्यक्तीना दिवाळीची भेट पाठवतात आणि आपले स्नेहाचे संबंध टिकवून ठेवतात. नेहमी काम करणारे पोस्टमन, टेलिफोनवाले लाइनमन, सोसायटीचा रखवालदार यांना दिवाळीची पोस्त द्यावी लागते, कुणाला जास्त भेटी मिळतात यावर त्याची लोकप्रियता ठरवली जाते, तर काही क्षेत्रातील मंडळी भेट स्विकारण फारस निकोप मानत नाहीत, कारण भेटी देणारा आपला स्वार्स्थ साधण्यासाठीच धडपड करणारा असतो. दिलेल्या वस्तू ज्याला दिल्या त्याच्याकडेच रहातील, अशी शाश्वती नसते. कारण तो पुढे त्याच्यासंपर्कात येणाऱ्या व्यक्तीना वाटून टाकतो.

दरवर्षीप्रमाणे हेमामालिनीच दूरदर्शनवर दर्शन हात आणि फटाके कसे उडवावेत याच मार्गदर्शन मिळत. पण त्याचा फारसा परिणाम होत नसावा. मुंबईतील फटाक्यात शोभेबरोबर आवाजाचे फटाके फार मोठया कानठळया बसवणारा आवाज हवा असतो. त्याशिवाय त्यांचा आनंद आणि मोठेपणा व्यक्त होत नाही.

मुंबई बॉम्बस्फोटात झालेले आवाजसुध्दा सौम्य वाटावेत इतक्या मोठया आवाजात फटाके फोडले जातात. पूर्वी उखळी तोफा वापरत आणि त्या चालवणा-यांचे कान बहिरे होत. मुंबईत वापरणारे ऍटमबॉम्ब या उखळी तोफांची बरोबर करत असावेत. बॉम्बे जिमखाना हा प्रतिष्ठितांचा क्लब. तेथे दरवर्षी शोभेच्या दारुचे फटाके उडवले जातात आणि ते बघायला तुफान गर्दी होते. तशीच गर्दी चौपाटीवरही होते. फाळक्यांना कंटाळून दिवाळीत मुंबईबाहेर जाणारी मंडळी काही कमी नाहीत.

दिवाळी अंकाशिवाय दिवाळी पूर्ण झाली, असे मराठी माणसाला वाटत नाही. आज दिवाळी अंकांची संख्या भरमसाठ वाढली असली तरी वाचण्यासारखे दिवाळी अंक हाताच्या बोटावर निघणारे असतात. बाकीचे जाहिराती मिळवण्यासाठी काढलेले आणि रद्दीत भर टाकणारे असतात. या दिवाळी अंकांचे मुंबई हे माहेरघरच आहे. सर्वात जास्त दिवाळी अंक मुंबईत प्रसिध्द होतात आणि खपतात.उरलेले दादर स्टेशनवर दिवाळीनंतर डिस्काऊंटमध्ये रुपया-दोन रपयांना मिळतात. बरेच चाणाक्ष वाचक नाताळच्या सुट्टीत दिवाळी अंक वाचणे पसंत करतात.

दिवाळी येऊन गेली तरी मोठमोठया दुकानांतील रोषणाई काही बंद होत नाही. नाताळच्या दिशेने वाटचाल सुरु होते.

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक १० नोव्हेंबर १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..