नवीन लेखन...

अनोळखी

काम करायच असेल तर या आठवड्यात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो! ‘नक्की करतो म्हणाला’ आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यानंतर आला. कुठे गळत होतं तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जावं तसा.


पाऊस पडण्यापूर्वी काम करुन द्यावं, असा विचार होता. मुंबईत डॉक्टर, इंजिनीयर्स, वैज्ञानिक मिळतील, पण सुतारकाम आणि दुरुस्तीच कामासाठी प्लंबर्स मिळण अवघड. शोधून सापडणार नाहीत. पण ही गोष्ट वेळ आल्याशिवाय लक्षात येत नाही.

योग्य माणूस सापडायला महिना गेला. तेही दहा लोकाना विचारुन- कुणी माहितीचा आहे काय, असल्यास पत्ता काय, अस करत बराच वेळ फिरल्यानंतर एक जण शेवटी भेटला. पण तो इतका कामात व्यस्त की विचाराची सोय नाही. दोन वेळा येऊन गेला. काम करतो म्हणाला. पुढच्या आठवडयात येतो, त्याच्या पुढच्या आठवडयात येतो, अस करत करत महिना गेला. शेवटी त्याला ताणून सांगितले. काम करायच असेल तर या आटवडयात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो. नक्की करतो म्हणाला आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यांनतर आला. कुठे गळत होत तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जाव तसा.

पैसे घेऊन गेलेला, त्यात अर्धवट काम. त्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. पाऊस तर जवळ येत चाललेला. त्याला शोधायच कुठे. त्याचा ना ठावठिकाणा ना दुकान. हातावर पोट. ओळखीने मिळालेली काम. काम केल तर केल नाहीततर नाही. ज्यांच्याकडे काम चालू होत, त्यांना विचारल.

त्यांनाही पत्ता माहीत नव्हत. शेवटी त्यांनी ज्याच्याकडून त्याला आणल होत त्यांच्याकडे त्याचा पत्ता असेल म्हणून गेलो. तिथेही तीच अवस्था. तो राहतो कुठे, कुणालाच माहिती दिसत नव्हतं. असा माणूस शोधायचा कसा? गवताच्या ढिगाऱ्यात हरवलेली टाचणी शोधण्यासारखच. त्यामुळे पाऊस येऊ नये आणि त्याआधी प्लंबर उगवावा, अशी प्रार्थना करत स्वत:वरच रागावत वाट बघण्याशिवाय काही गत्यंतरच नव्हतं. पण आणखी शेजारी पाजारी चौकशी केल्यावर एका महाभागाकडे पत्ता मिळाला.

पत्ता देण्यापूर्वी त्यांनी मी आणि माझ्यासारखे असंख्य मुंबईकर किती गचाळ आहेत आणि किती बेजबाबदार आहेत. त्याच मोठ व्याख्यान ऐकवल. ‘ठीक आहे. तुम्हाला काम करुन घेण्याची आवश्यकता होती. पण याचा अर्थ असा नव्हे, की ते कुणालाही ‘द्यांव. काम देण्यापूर्वी तुम्ही त्याची चौकशी करायला नको?

“चौकशी?” होय चौकशी करायला हवी. ती सुध्दा नकळत. म्हणे त्याने आतापर्यंत किती जणांकडे काम केल आहे? तो राहतो कुठे? त्याचा पत्ता काय? काम मिळविण्यासाठी कुठल्या दुकानात तो जातो? सर्व माहिती बोलता बोलता काढली पाहजे. काय भरवसा. मुंबई शहर काय लहान गाव आहे, जिथे प्रत्येकजण एकमेकाला ओळखतो. अहो माहिती करुन घेतली नाही तर कोण केव्हा फसवून निघुन जाईल हे कळणार नाही आणि जिवावर बेतेल.

अहो साध प्लंबिंगच काम, त्यात जिवावर काय बेतणार? मी आपला वैतागून विचारल. ते आणखीनच किंचाळले, कस बेतणार? वाचा हे, त्यानी अलमारीतून वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच कात्रण माझ्यापुढे ठेवल. पोलीस आयुक्तांच आवाहन कुणाही अनोळखी माणसाकडे काम सोपविण्यापूर्वी त्याची माहिती घ्या आणि पुढे गुन्हे कसे घडतात याची माहिती दिली होती.

आता तुम्ही सांगा. एकदा त्याला काम दिल्यावर तुम्ही रजा घेऊन चौवीस तास थांबणार आहात काय? नाही. कारण तेवढा वेळ तुमच्याकडे नाही. म्हणजे घरातली बाई किंवा मुल किंवा नोकर यांच्यावर ते तुम्ही सोपवणार. तो लुच्चा-लफंगा असला तर बारा वाजलेच म्हणून समजा, त्यामुळेच सगळी माहिती करुन घेतली पाहिजे.

त्यांच म्हणणं खर होत. माहिती करुन घेतली पाहिजे. पण कुणाकुणाची माहिती करुन घेणार. रोज तस पाहिल तर अनोळखी माणसांशीच आपला संबंध येत असतो. पाववाला, पेपरवाला, कचरावाला, गॅसवाला, प्लंबर, सुतार, मेहनत-मजबुरी करणारी कितीतरी माणस अत्यावश्यकच असतात. या सगळयांची मुठे कुठे माहिती घेणार आणि एखाद दुसराच अपवाद सोडला तर त्यांच्या सारखी प्रमाणिक माणस मला तरी आढळलेली नाहीत आणि सुटाबुटात हातोहात फसवणारे अगणित भामटे रोज तुमच्या खिशात हात घालून डल्ला मारत असतात, फसवत असतात. त्यांच काय?

काळजी घेतली पाहिजे हे निर्विवाद. पण रोज भेटणारे अनोळखी चेहरे ओळखायचे कसे? समोरचा माणूस प्रामाणिक आहे की भामटा आहे ओळखासच कस? चोर आहे का साव आहे सांगणार कोण? माझे प्रश्न वाढतच चालले.

‘पैसे दिलेत? हो? मग आता विसरा, अहो काम झाल्याशिवाय पैसे कसे दिलेत? आता तो येत नाही. मेहनत-मजदूरी करणारा त्याच्याकडे सामान आणायला कुठले पैसे असणार, त्यामुळे त्याला थोडा ऍडव्हान्स दिला. एकदा पैसे दिलेत की काम संपल असे समजा. पैसे नेहमी काम झाल्यानंतर द्यायचे, त्यांनी समजावून सांगितले आणि मी आपल्याला काहीच समजत नाह, अस म्हणून मान हलवली.

त्यांच्याकडून पत्ता घेतला आणि ज्याच नावही माहिती नाही अशा माणसाच्या शोधात निघालो. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या रामपाडयात राहत होता. रामपाडा म्हणजे शंभर- दोनशे झोपडपट्टया नव्हत्यां, तरी वीस हजारांचे स्वयंपूर्ण गावच. त्यात पत्ता शोधण मुश्कील. पण सर्व खाणाखुणा शोधत एकदाचा पोहोचलो. घरी त्याचा मुलगा. निरोप ठेवला तरी पत्ता नाही.

पाऊस आणि तो बरोबरच आला. काम करुन गेला. पावसात केलेल काम किती टिकणार. पाऊस संपल्यानंतर येतो असे सांगून गेलाय. मी वाट पाहतोच. कदाचित येईल कदाचित येणार नाही. माझी अडचण आहे ती अनोळखी चेहरे ओळखण्याची.

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : २३ जून १९९४   

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..