नवीन लेखन...

प्रपंची जो अप्रमाण (सुमंत उवाच – १०१)

प्रपंची जो अप्रमाण|| तो परमार्थी खोटा||

प्रपंच करणे हिताचे, प्रपंचात सुख ते भाग्याचे, परी काम नव्हे ते मूर्खाचे, समर्थ म्हणती. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य जपले, लहानपणी घेतलेला ध्यास अविरत टिकून राहिला कारण त्यांचे मन खंबीर होते. ज्याचे मन हे स्वतःच्या काबूत असते त्याला निवडलेल्या मार्गावरून दूर करणे अशक्य असते. समर्थांनी आयुष्यभर समाजकारण केले, राजकारण केले त्यावर भाष्य ही केले पण त्यांनी प्रपंच केला नाही तर त्यावर भाष्य का केले? कसे केले?

विहित कर्म करणे हा प्रपंचाचा महत्वाचा भाग आहे नाहीतर, द्रव्य स्त्रीस लागते, द्रव्य लेकरास लागते, द्रव्य घरास लागते, मग ते कष्ट करोनि मिळवावे की जोगी बनावे असा प्रश्न मनात उद्भवतो.

आधी प्रपंच करावा नेटका| मग घ्यावे परमार्थ विवेका||

येथे आधी आणि मग या गोष्टी वयोमानाशी निगडित नसून त्या रोजच्या दिनचर्येशी एकरूप आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आधी प्रपंच करावा नेटका म्हणजे आपले विहित कर्म दिवसात आधी करावे मग घ्यावे परमार्थ विवेका म्हणचे नामस्मरण, पारमार्थिक सेवा किंवा त्याबद्दलचे कर्म हे नंतर करावे. प्रपंच येथे कर्मास म्हटले आहे जे दुसऱ्यासाठी असते तर परमार्थ म्हणजे स्वतः स दिलेल्या काळाला संबोधले आहे. परमार्थ म्हणजे केवळ भगवंताची भक्ती करणे असाच होत नसून स्वतःला दिलेला प्रामाणिक वेळ यालाही समर्थ परमार्थ असेच म्हणतात पण त्यात राहिलेल्या कर्मांची जर साठवण असेल तर मात्र तो परमार्थ ठरत नाही.

प्रपंची जो अप्रमाण| तो परमार्थि खोटा|| असे समर्थ जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की प्रपंच करताना, घरच्या परिस्थितीला स्थेर्य येण्यासाठी लागणारे कर्म न करिता जो व्यक्ती त्यात आळस करून समाजात मात्र समाज सुधारणेसाठी कष्ट करितो, तेथे त्याचा कर्माचा झरा अखंड वहात असतो मात्र घरात तो झरा कोरडा ठणठणीत असतो तो व्यक्ती परमार्थात खोटा च ठरतो. आधी प्रपंच करावा नेटका मग समाज सुधारावा. घरी तोंड फाटके, अन बाहेर मधुर वाणी, कोण त्यास देईल सांगा, स्वतः घरची वेणी?

कर्म करताना त्याचे पडसाद भविष्यात काय होणार याची सुचकता जर जाणून ते कर्म सावधानतेने केले तर परमार्थात समाधान प्राप्त व्हायला सोप्पे जाते. कर्मच जर अपचनीय केले, दुसऱ्यास त्रास होणारे केले, कोणाच्या हातचे घास पळवून स्वार्थ साधणारे केले तर परमार्थात मोक्ष मिळण्याची आशा धूसर होते.

म्हणून सुचकता आणि अखंड सावधानता बाळगून प्रपंच करणे परमार्थासाठी हितकारक आहे.

कर्माला आपलंसं करणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्या कर्मातून योग्य वेळी बाहेर पडणे देखील गरजेचे नाहीतर आजकाल ऑफिस मधल्या कामाच्या तणावाखाली घरचे सुखाचे चार घास घ्यायला त्रास होतो आणि मग तो वेळ जातो मंद प्रकाशात उघडलेल्या बाटलीतील द्रव्य घशात ओतण्यात ज्यातून मिळत काहीच नाही. उलट जाते ते परत न येण्यासाठी जाते. मग परमार्थ अशा ठिकाणी शोधावा का? जेथे स्वतःस वेळ देता येईल? याचे उत्तर जरी हो असले तरी तेथे जाऊन खरंच समाधान मिळते का? की केवळ मेंदूस गुंगी येणारे पाणी प्यायल्याने तसा आभास निर्माण होतो?

आपल्या पूर्वजांनी पडलेल्या रूढी परंपरा ह्या काही त्यांना बाकी काही कळत नव्हते म्हणून नाही पाडलेल्या, आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ हे केवळ कागद जास्त होते आणि MNC कंपनीत नोकरी नव्हती म्हणून लिहिलेले नाहीत. भले आपण 21व्या शतकात असू आणि आपली लाइफस्टाइल ही आता 80% परकीय संस्कृती प्रमाणे होत चालली असेल तरी आपण रहात असलेला प्रदेश अजूनही तोच आहे. वेशभूषा बदलली, आहार बदलला तरी अजून आपल्याकडे असणारे ऋतू काही उणे अंश 20 पर्यंत खाली उतरत नाहीत आणि घरात देवाचे फोटो बासनात बांधून ठेवलेले नाहीत. प्रपंच करताना कशातून काय घ्यायचे हे जर कळले तर परमार्थ हा योग्य प्रकारे घडू शकतो. नाहीतर दिवसा कामासाठी वणवण आणि रात्री घरच्यांशी तणतण यात सारं आयुष्य कधी मणमण मरतं हे कळतही नाही. प्रपंच करताना लोभ हा असावा तो गरजेचाच आहे पण त्याची सीमा सुद्धा ठरलेली आहे. ती जर ओलांडली गेली तर हव्यासाचा महापूर आलाच समजावा.

म्हणून समर्थांनी सांगितल्या प्रमाणे जर गोष्ट कोणतीही असो तिला बांध घालता आला तर ती गोष्ट डोंगरएव्हढी न होता आपल्या मुठीत स्थिरावू शकते आणि मन शांत राहू शकते.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..