नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)

कै.डॉ.दभी.कुलकर्णी एक साहित्य परिस स्पर्श

गुरुवर्य मा. श्री. दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी ज्येष्ठवृंद, अभ्यासु प्रख्यात समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. सर्वश्रुत व्यक्तीमत्व. प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभणं म्हणजे एक आनंदच! आणि असा सर्वार्थांन सुंदर, लाघवी, मायाळू माणसाळू अशा सर्वच व्यक्तिमत्वाचा सहवास पूर्वसुकृतानेच लाभतो असं मला वाटतं!

मी स्वतः व्यवसायाने एक मुद्रक प्रकाशक असल्यामुळे आजपर्यंत मला योगायोगाने अनेक ज्येष्ठ साहित्यिक, कवी-कवयित्री यांचा सहवास लाभला. हे मी या लेखमालिकेत विदित केलेले आहेच. पण तरीही द.भी. यांचा माझा सहवास प्रदीर्घ आहे आणि दभी सर हे अत्यंत मोकळे, दिलखुलास, प्रेमळ, मार्गदर्शक असे व्यक्तीमत्व आहे हा माझा स्वानुभव आहे.

त्यांना भेटावयास येणाऱ्या सर्वांचंच अगदी अगत्यपूर्वक स्वागत करण्याची त्यांची समाधानी, आनंदी – दातृत्वी मार्गदर्शक प्रवृती हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. अशा सर्व गोष्टी कधी एकत्रित जाणवत नाही हे खरं! पण डॉ. दभी सर याला निश्चितच अपवाद होते हा माझा स्वानुभव आहे.

आपण सरांना भेटण्यासाठी फोन करावा आणि फोनवरुनच त्यांचा दभी असा आवाज यावा मग सर येवू कां? असं आपण विचारवं! आणि सरांनी लगेचच “या, या” असं सहज प्रत्युत्तर यावं. आपण वेळेप्रमाणं निघावं आणि पुण्याच्या पश्चिमेकडील डीएसके विश्व धायरी या टेकडीवरील रम्य अशा नैसर्गिक परिसरात प्रवेश करताच मन प्रसन्न व्हावं.आणि यथावकाश दभी सरांच्या घराच्या प्रवेशद्वारात उभं रहावं आणि लगेचच समोर हिरव्या रंगाच्या भिंतिवर दभी ही सफेद पांढऱ्या रंगाची फक्त दोनच अक्षरे आपल्या नजरेत सहज भरावीत आणि आपण प्रसन्न व्हावं अशी अवस्था होते. तशी दभी ही दोनच अक्षरे सर्वार्थांने सर्वश्रुत आहे. दूसरे महत्वाचे म्हणजे दभी. सरांच्या प्रवेशद्वाराचा दरवाजा फक्त आतिल बाजूसच उघडला जातो. बाहेर उघडत नाही. याचाच अर्थ आत आनंदाने येण्यास पूर्णतः मोकळीक आहे. स्वागत आहे.

पण बाहेर पड़ताना तो दरवाजा बाहरेच्या बाजूस उघडतच नाही, तो आतील बाजूसच उघड़तो हे वैशिष्टय! कारण दभी सरांचा सहवास किंवा त्यांच्या शब्दसागरातील संवाद सोडून बाहेर पडण्याची इच्छाही आपल्या मनाला होत नाही ही वास्तवता नाकारता येत नाही.

दभी सरांचे घर म्हणजे हिरवाई. पुस्तकांनी गच्च भरलेला एक सुंदर बगीचा.अनेक अनमोल अशा पारितोषिकांची, मानपत्रांची रेचलेल! घराच्या अंगणात अगदी खुपच साधा पण खुपच मोहक हवा असणारा स्वागत कक्ष. त्यामध्ये त्यामध्ये एक सुंदर छोटसं असं संस्कृती आणी संस्कारंच प्रतीक असलेलं वृंदावन! शेजारी सोफा, खुर्च्या सोबत एक सात्विक ऐश्वर्याची साक्ष असणारा झुलणारा झोपाळा आणि एक छानसा टी-पॉय अशा वातावरणात आपण सारेच सहज आदरयुक्त भीतिने प्रवेश करतो हे खरं!

पण दभी जेंव्हा अत्यंत नम्रतेनं, प्रसन्न मुद्रेने आपलं स्वागत करतात तेंव्हा आपली ती भिती नाहीशी होते.

“या ! या !” असे म्हणतच आपलं स्वागत दभी सर करतात. त्याक्षणीच सरांच्या त्या लडिवाळ प्रेमळ शब्दांनी आपलं आणी त्यांच अनेक जन्मांचंच नातं असल्याचं जाणवून जातं! सर्वांनाच बसा! बसा! म्हणून स्वतःच घरात जावून सर्वांसाठी थंड पाणी आणून टी-पॉय वर ठेवतात आणी अगदी सहज झोपाळ्यावर आसनस्थ होतात. हळूहळू विषयानुरूप गप्पा सुरु होतात. दभी या शब्दप्रभुंची, शब्दब्रह्माची रिमझिमणारी बरसात झुळझुळू लागते. अन मग त्या शब्दांनी आपले मनांतर अधीक समृद्ध होतं! हा माझा प्रत्येक भेटीतील अनुभव आहे.

अचानक मध्येच क्षणभर स्वतः उठतात. घरात जातात. विविध मिठाईचे बॉक्स आणून टी-पॉयवर ठेवतात. मग त्यात इंदुर, नागपुर, साताऱ्याची मिठाई,पेढ़े,संत्राबर्फी, काजुबर्फी असे. गोव्याचे काजू, केळी, काजू कतली, बेळगावचा कुंदा, गरम गरम बटाटे वडे, भजी, मुगभजी,असे अनेक पदार्थ समोर ठेवून स्वतः जातीने आग्रह करून आपल्याला खाण्यास प्रवृत्त करतात. हे सारे मी स्वतः अनुभवले आहे. आपण खात रहातो. दभी बोलत रहातात.

अनेक साहित्य विषयांचा सखोल अभ्यास! ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, गीता, वेदशास्त्र पुराण, ग्रन्थ इत्यादी विषयावरील त्यांचे प्रभुत्व सर्वांना त्यांच्या वाणीतून जाणवते. आपण फक्त ऐकत रहावं! ते आपली मार्गदर्शकाची भूमिका लीलया बजावत असतात. महाकवी कालिदास हा तर त्यांचा पीएचडीचा विषय होता. त्यांच्या अस्खलित वाणीतुन कधी कधी आपण न ऐकलेले अर्थपूर्ण शब्द देखील वारंवार अगदी सहज येत असतात. माझ्यासारख्या सर्वसामान्य अनभिज्ञ व्यक्तीला त्या शब्दांचा अर्थ कळलेला नसतो, तेंव्हा मी अज्ञानापोटी कुतूहलतेनं त्यांना त्या शब्दाचा अर्थ विचारतो तेंव्हा दभी सर त्या शब्दाचा सखोल अर्थ समजून सांगत असत. समोरच्या व्यक्तीला अंर्तमुख करण्याची त्यांची हातोटी आहे.

असाच एकदा त्यांच्या बोलण्यात अंभृणी हा शब्द आला होता. आम्ही बरीच मित्र मंडळी होतो. त्यावेळी आम्हा कुणालाच त्या अनभिज्ञ अंभृणी शब्दाचा अर्थ कळला नव्हता. तो सरांनी आम्हा सर्वानाच अगदी विस्तृत पद्धतीने समजावून सांगितला. अंभृणी हा वेदसुक्तामधील शब्द असून त्याचा अर्थ “वाणीची वैदिक देवता” असा आहे, असे सांगून त्याचे सार्थ विश्लेषण ही केले.

सरांच्या सहवासात नेहमीच अगदी मोकळे पणाने साहित्य विश्वातील अनेक वैचारिक मूलभूत प्रश्नांची उकल त्यांच्या मार्गदर्शनातून होत असते.

साहित्य क्षेत्रातील गुरुस्थानी असलेल्या अशा वंदनीय व्यक्तीला माणसं आवडतात. माणसांशी हितगुज, विचार-विनिमय, संवाद करणे तसेच गरजवंतांना उत्तम यथायोग्य मार्गदर्शन करणे आवडतं! हाच त्यांचा सहजसुंदर दैवी सद्गुण आहे. स्वभावत कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. मी पणा नाही याचा सातत्याने प्रत्यय येत असतो.

अनेक साहित्य संस्थाना त्यांचे मार्गदर्शन असते आणी हे सारे करताना संस्थेच्या कुठल्याही पदासाठी मला आग्रह करु नका हे ते अगदी नम्रतेने सांगत असत!

प्रयत्नांती साहित्य क्षेत्रातील अत्युच्य शिखरावर पोहचुन देखील स्वान्त सुखाय या परिपूर्ण अवस्थेत देखील सर्वसामान्य माणसांच्या सहवासात नि:स्पृहतेनं, आनंदाने रहाणं! जे ज्ञान आपल्याजवळ आहे ते अगदी मुक्तपणे, सहज सास्त्विकतेंनं देत रहाणं, काटेकोरपणे आपली साहित्य समीक्षकाची भूमिका निभावणं! या साऱ्या भूमिका लीलया निभावणारे डॉ. द.भी.कुलकर्णी सर एक अलौकिक अंभृणी व्यक्तीमत्व म्हणावे लागेल.

यापूर्वीच्या भागामध्ये मी त्यांच्या बद्दल लिहिलेले आहेच.

प्रत्येक व्यक्ती चांगलीच असते. सहवासाअंती आपल्याला ती व्यक्ती उमजत जाते हे वास्तव आहे. आपली समीक्षक वृत्ती ही राजहंसी असावी.

मानवी जीवनाचे अनेक विविधांगी कंगोरे असतात. आपल्याला वैयक्तिक त्या जीवनाची जी अनुभूती येते. ते सत्य असते. जे चांगले असते पहावे , वेचावे, जे लिहिण्यासारखे आहे, जे सांगण्यासारखे, जे वैचारिक प्रबोधन करू शकेल असे लिहीत रहावे.

वि. ग. सातपुते

9766544908

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..