नवीन लेखन...

मराठी अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त

आई – वडील यांच्याकडून आलेला अभिनयाचा वारसा, उपजत अभिनयकौशल्य या बळावर यशवंत दत्त यांनी मराठी नाटक आणि चित्रपट यांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठीनंतर त्याला हिंदीतही चांगली संधी चालून आली होती. नकला हा यशवंत दत्त यांचा स्थायीभाव होता. शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्यात हुबेहूब नकला करत असत, अर्थात, पुढे नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. “थंडर्स’ नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असत. निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. यशवंत दत्त या हरहुन्नरी अभिनेत्याची ती सुरवात होती.

यशवंत दत्त यांच्या आई – वडिलांनी चित्रपटात व नाटकांत कामे केली होती. वडिलांनी तर “गरिबांचे राज्य’ या नावाचा चित्रपट काढला होता; पण दुर्दैवाने या चित्रपटात त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. यशवंत दत्त यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि मार्गदर्शनही केले. घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली, पानाच्या गादीवर काम केले, अखेर “फिलिप्स’ मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर या कंपनीला विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. यशवंत दत्त यांच्यामुळे फिलिप्स कंपनीचे नाव कलाक्षेत्रात गाजत होते. राज्य नाट्यस्पर्धेत “अडीच घरं वजिराला’ हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले, मग मुंबईच्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली.

दत्ता भट यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्याने त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावले. “गरिबी हटाव’ या नाटकात यशवंत दत्त यांनी चुणूक दाखवून दिली. नंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं आली. यशवंत दत्त यांना नाव मिळवून दिले ते “नाथ हा माझा’ या नाटकाने. या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका मस्त उभा केला, की लोकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, पुन्हा काही काळाने ते परतले ते “वेडा वृंदावन’ या नाकातून. त्यानंतर सुरू झाला यशवंत दत्त यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास. “सुगंधी कट्टा’, “दगा’मध्ये त्यांनी खलनायक, नायक रंगवला. मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका चांगल्या नायकाची गरज होती, ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली. “भैरू पैलवान की जय’, “दौलत’, “फटाकडी’, “आपली माणसं’, “आयत्या बिळात नागोबा’, “पैजेचा विडा’ आदी चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. “शापित’मध्ये केलेल्या भूमिकेची दखल देशपातळीवर घेतली गेली.

चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणे सोडले नाही. प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे “नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

यशवंत दत्त यांनी “शापित” तसंच “संसार” या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना “राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नाटक, चित्रपट यामध्ये मग्न असलेल्या यशवंत दत्त यांच्यामध्ये एक हळुवार कवी लपलेला होता. यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. यशवंत दत्त यांचे ११ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..