नवीन लेखन...

तथास्तू

 

माणसाच्या उक्रांतीचा इतिहास पाहू जाता त्यात झालेले बदल नजरेत भरतात. याचवेळी हेही लक्षात येते, की देवाचा किंवा परमेश्वराचा इतिहास इतका पुरातन नाहीये. मग ज्यावेळी परमेश्वराचे अस्तित्वच नव्हते त्यावेळी सामान्य माणूस कोणाच्या, कशाच्या आधारावर जगत असावा? त्याची श्रद्धास्थाने, भक्तिस्थाने काय असावीत? त्यावेळचा माणूस स्वतच तर देव नव्हता? होय, त्यावेळी त्याचे जगणे म्हणजेच देवाची पूजा होती, आराधना होती, स्वतच्या ठायी असलेल्या देवत्वापुढे तो लीन होत होता. त्याला एक कळले होते, की मी या निसर्गाचा पुत्र आहे, त्याच्या आदेशानुसार राहणे म्हणजेच देवत्वात राहणे आहे. द्वेष, असूया, स्वार्थ, प्रेम, मत्सर अशा विकाराने त्याच्या मनातील, हृदयातील परमेश्वरावर मात करायला प्रारंभ केला आणि देवांची निर्मिती झाली. असे झाले तरी त्याच्या परमेश्वराच्या कल्पना निसर्गापुरत्या मर्यादित होत्या. ही पृथ्वी, हे आकाश, हा समुद्र, सूर्य-चंद्र, जल या त्याच्या देवता होत्या. माणसाच्या प्रगतीबरोबर देवांच्या कल्पना बदलू लागल्या. त्याला माणसाचे रूप येऊ लागले. त्यालाही स्वार्थ, द्वेष अशा दुर्गुणाने भारून टाकले जाऊ लागले. माझ्या स्वार्थाचा, माझ्या हिताचा विचार, करणारा तो माझा देव होऊ लागला. अगदी अलीकडे म्हणजे सहा-सात हजार वर्षांपूर्वी तरी देव कुठे होता? पावसासाठी करुणा भाकणारी आदिवासी माणसे थेट वरुणराजाला साकडे घालीत आणि तो त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करी. मी माझ्यावर प्रेम करीत होतो तोवर तोही माझ्यावर प्रेम करीत असे; पण स्वतवर प्रेम करण्याचा मानवी धर्म लोप पावला आणि मग माझ्या सोयीच्या देवाचे अस्तित्व जाणवू लागले. माझ्या पलीकडे कोणी तरी आहे त्याला परमेश्वर म्हटले जाऊ लागले. त्याला खूप केले, की आपल्याला हवे ते मिळविता येते हा सोयीचा मार्ग प्रशस्त होत गेला. `माझे कल्याण कर’ असे म्हणण्याऐवजी त्याचा `नायनाट कर’ अशा प्रार्थना दुःखमुक्त होण्यासाठी सुरू झाल्या. देवाला नवस बोलले जाऊ लागले.

मला जे प्रिय ते देवाला अर्पण होऊ लागले. माणूस स्वार्थी झाला आणि आपल्याला सर्वाधिक प्रिय आपणच आहोत ही भावनाही लोप पावली. आनंदाचा धनी मी आणि दुःखाचे प्राक्तन दुसऱयाचे यात अस्वाभाविक काही आहे, असे वाटेनासे झाले. माझ्याऐवजी कोंबडा, बोकड एवढेच काय दुसर्‍या माणसाचा बळी देण्याएवढा माणूस स्वतला सक्षम मानू लागला, स्वतच्या अंतरात्म्याला गाडून टाकले, की इतरांची काय पत्रास? हा निसर्ग, ही वृक्षवल्ली, हे प्राणी-पक्षी माझाच अंश आहेत, ही भावना लोपली आणि मग परमेश्वर हा धाक दाखविण्याचाही एक मार्ग होऊन गेला. शनिच्या डोक्यावर थोडे तेल ओतले, की आपली इतिकर्तव्यता संपली, असे मानण्यात धन्य होता येते, हा अनुभव माणसाला येऊ लागला. कुठे तेलाच्या नद्या, तर कुठे कोंबड्यांचा पिसांचा उकिरडा, कुठे बोकड, तर कुठे मनुष्यबळी-माणसाच्या विद्वेशाच्या अभिव्यक्ती सर्वत्र साकारू लागल्या. त्याला संस्कृती म्हटले जाऊ लागले. त्याला धार्मिक आधार मिळू लागला. काहीवेळा भीतीने, तर काहीवेळा धर्माच्या धाकाने माणूस आपल्यातल्या परमेश्वराला जिवंतपणी ठार करू लागला. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट, खरेतर खूप भीषण, माणसाच्या मनाचा थरकाप उडविणारी; पण वास्तव मांढरदेवीच्या नवसपूर्ती यात्रेत शेकडोंचा बळी गेला. बोकड, कोंबड्या नव्हेत, तर बाया-बापड्यांचा, लहान पोरांचा, थोर-वृद्धांचा आणि कमावत्या शरीराच्या तरुणांचाही. माणसाने माणसाला तुडवले. ठार मारले. त्यात माझे, आपले कोणाला दिसले नाही. प्रत्येकाला स्वतच्या पलीकडे काही पाहता आले नाही. पाहिले ते देव होते, स्वत जिवंत राहण्यासाठीचे आधार होते, त्यात मुले होती, बायका होत्या; पण मला मी जगणे आवश्यक वाटले. त्यांना तुडवत माझ्यातल्या `मी’ने जिवंत राहण्याचा आनंदसोहळा साजरा केला. एवढ्यावरच भागले तर तो माणूस कसला? त्याने मृतदेहावरच्या चीजवस्तू लुबाडल्या. आपल्याच आया-बहिणींच्या अंगावरच्या साड्या ओढताना त्याने आपल्यातल्या दुःशासनाला तृप्त केले. तिथे कृष्ण कोणी अवतरला नाही. कारण तशी आर्त हाकच त्याच्यापर्यंत पोहोचली नाही. मांढरदेवीचे रूपच असे होते, की तिला आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकायची होती. त्यांना कौल द्यायचा होता. भक्तांची मागणी हीच होती, “माझ्या शत्रूचा नायनाट कर”, “त्याचे तळपट होऊ देत” एक भक्त दुसऱयाबद्दल हीच कामना करीत असेल, तर त्याच्या देवाने काय करावे. त्यालाही कंटाळा आला असावा, या मत्सराचा, द्वेषाचा, त्यालाही खऱया प्रेमाची तहान लागली असावी. देवाने मग माझा-तुझा न पाहता सर्वांना `तथास्तू’ म्हटले. मांढरदेवीचे पठार लाल होऊन गेले.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..