नवीन लेखन...

भविष्य

 

नाशिकमध्ये माझा एक मित्र आहे. खलील जिब्राननं त्याला वेडं बनविलेलं आहे. जिब्रानच्या साहित्याचं मराठीत भाषांतर करून ते प्रकाशित करण्यासाठी मोठी पदरमोडही त्यानं करून घेतली आहे. एक चांगला वाचक, चांगला कवी असं त्याचं वर्णन होऊ शकेल. भविष्य हा

त्याच्या रोजीरोटीचा व्यवसाय. अपारंपरिक किवा पर्यायी औषध साधना हाही त्याच्या आवडीचा, संशोधनाचा विषय. अमावस्या वगळता आठवड्यातले सहा दिवस तो नाशिकपासून मुंबईपर्यंतच्या अनेकांच्या भविष्यात डोकावत असतो किवा काही औषधे तरी देत असतो. सतत माणसात वावरणार्‍या या माणसाला स्वतःच्या पुस्तकाचं भविष्य मात्र पाहाता आलं नाही.

 

 

असो, तर या मित्राकडे जाऊन बसणं हाच मुळी एक जीवनानुभव असतो. डॉक्टरपढे जसा रुग्ण सहजपणे नग्न होतो तसंच माणसाचं भविष्य सांगणार्‍या या माझ्या मित्रापुढं अनेकांनी आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांगून टाकलेल्या. आई-वडील-पती-पत्नी एकमेकांना सांगणार नाहीत, अशी गुपितं त्याच्या पुढ्यात खुली झालेली. माणूस कसा असतो? त्यागी, स्वार्थी, विकृत, बीभत्स की आणखी काही हे सारं त्याच्यापुढं उघड होणार्‍या आयुष्यात पाहता येतं. एकदा मी म्हटलं, ‘‘खलीलच्या भाषांतरांपेक्षा ही माणसांची कथा लिही, चांगला लेखक म्हणून गौरव होईल तुझा;’’ पण त्यानं ते ऐकलं नाही. असं बोलल्यावर तो फक्त हसतो, तसाच याहीवेळी हसला एवढंच. तर भविष्य अन् त्याची ओढ, त्याची उत्सुकता किती टोकाची असू शकते. याचा एक अनुभव तुम्हाला सांगायचा म्हणून ही प्रस्तावना. अर्थात, हा अनुभव नाशिकमधल्या त्या मित्राचा नाही. तो आहे पुण्यातल्या एका स्नेहाचा. दोघांमधलं साम्य हेच, की भविष्य हाच त्यांच्या उपजीविकेचा भाग. पुण्यातला हा मित्र तर चक्क चार्टर्ड अकाउंटंट आहे; पण भविष्य हेच सूत्र महत्त्वाचं. असंच एका संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. दारातच थांबलो. कारण मित्रासमवेत एक वृद्ध गृहस्थ बसलेले होते. बहुधा भविष्य हाच विषय असावा. मनात आलं, वयाची साठी ओलांडल्यानंतरही

भविष्याचं औत्सुक्य कायम असतं? मी म्हटलं, ‘‘चालू द्या. मी नंतर येतो,’’ मित्रानं थांबविलं. त्या वृद्धाला म्हणाला, ‘‘आपण पुन्हा भेटू, हे माझे पत्रकार मित्र आलेत, त्यांना वेळ दिली होती मी.’’ खरंतर मी त्याची वेळ घेण्याचा प्रश्न नव्हता; पण त्या वृद्धाला टाळण्यासाठी हे सारं होतं हे लक्षात आलं माझ्या. तो वृद्ध गेला. थोड्या वेळानं पुन्हा येतो म्हणाला. आता त्या वृद्धाचा विषय काढावा असं काही नव्हतं; पण मनातून प्रश्न जात नव्हता. मी दरवाजाकडे खूण करूनच विचारलं, ‘‘यांच
ं काय काम?’’ ‘‘होतं असंच काहीतरी’’ असं म्हणून मित्र ते टाळू शकला असता पण म्हणाला, ‘‘बस. सांगतो.’’ आतल्या खोलीत चहाची ऑर्डर दिली अन् त्या वृद्धाची कहाणी मी ऐकू लागलो.

 

 

‘‘तर या माणसाचं वय आता ६५ असावं. दहा-बारा वर्षांपूर्वी तो आणि त्याच्या पत्नीत तणावाचं वातावरण निर्माण झालं. तणावाचं कारण होतं, विवाहबाह्य संबंध किवा अनैतिक प्रेमसंबंध.’’ मी थोडा सावरून बसलो. मित्र सांगू लागला. ‘‘आता हे बघ हे माधवराव आणि त्यांच्या शेजारचे गणपतराव एकमेकांचे चांगले मित्र. मैत्री अशी की त्यांनी फ्लॅटही एकमेकांच्या जवळच घेतले. दोन्ही कुटुंबांचं एकमेकांकडे जाणं-येणं चालू होतं. काही खाद्यपदार्थांचे नमुने एकमेकांकडे जात होते. अशाच एके दिवशी माधवरावांच्या पत्नीनं गणपतरावांना आवडतात म्हणून गुलाबजाम केले. त्यांच्या घरी आवर्जून पाठविले. झालं, इथं संशयाला पालवी फुटली. दोन कुटुंबातल्या प्रत्येक व्यवहाराचे अर्थ लावले जाऊ लागले. घरात भांडणं होऊ लागली. एकदा माधवरावांची समजूत घालायला गणपतराव आले अन् घरातलं वादळ दोन घरात पोहोचलं. हा म्हातारा त्या म्हातार्‍याला काही काही बोलला. या सगळ्याचं पर्यवसान माधवरावांच्या घटस्फोटात झालं. न्यायालयानं घर माधवरावांच्या पत्नीच्या ताब्यात दिलं. माधवरावांनी घर सोडलं; पण ती इमारत नाही सोडली. तिथंच जागा घेऊन ते राहू लागले. गणपतरावांची पत्नी अधूनमधून त्यांची विचारपूस करू लागली. पत्नीविषयी संशय घेणार्‍या मनात मित्राच्या पत्नीविषयी अवाजवी प्रेमाच्या भावना येऊ लागल्या. सध्या हे असं चाललंय…’’

 

 

मित्रानं साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरात संपविली.

 

 

इथं भविष्याचा काय प्रश्न येतो? माझ्या मनातला प्रश्न अखेरीस मी विचारून टाकला मित्र म्हणाला. ‘‘थांब. भविष्याचा हा प्रश्न समजावा म्हणून तर भूतकाळ सांगितला. आता हे जे वृद्ध गृहस्थ आले त्यांना भविष्यातून दोन प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. एक म्हणजे गणपतरावांच्या पत्नीचं आणि माझं लग्न होईल का? ग्रह कसे आहेत? जमेल तर केव्हा?’’ ‘‘दुसरा प्रश्न काय?’’ मी विचारता झालो. त्यावर माझा मित्र म्हणाला, ‘‘ती तर खरी गंमत आहे. मानवी स्वभावाचं वेगळेपणं सांगणारा तो प्रश्न आहे. माझ्या घटस्फोटित पत्नीचं आणि गणपतरावांचं लग्न तर होणार नाही ना? ते होऊ नये म्हणून काय करता येईल?’’ असे ते प्रश्न आहेत.

 

 

त्या वृद्धाच्या प्रश्नाचं ते स्वरूप ऐकून मी हादरून गेलो. सहज दाराकडे पाहिलं, तो वृद्ध आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी पुन्हा

 

येत होता. त्याचं भवितव्य आणि माझा मित्र यांच्यात थांबण्याचा वेडेपणा मी केला नाही इतकंच.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..