नवीन लेखन...

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ३ – औषधी गुणधर्माचा सागर: आघाडा

औषधी गुणधर्माचा सागर: आघाडा
श्रावणात आघाड्याला विशेष महत्त्व आहे. जिवतीपूजन, मंगळागौरीला, बुध-बृहस्पती, जेष्ठागौरी, हरतालिका तसेच गणपतीपूजनात आघाड्याचे विशेष महत्त्व आहे. पावसाळयात हा आघाडा जागोजागी उगवतो. अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून, त्याला थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात.

 

 

ही वर्षायू औषधी अ‍ॅमॅरॅंटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅचिरँथस अ‍ॅस्पेरा आहे. आघाड्याला अपांग, चिचरा, लत्जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, काटेरी फुलोरा अशी वेगवेगळ्या भाषांत नावं आहेत. ही वनस्पती सर्वत्र (समुद्रसपाटीपासून सुमारे १,००० मी. उंचीपर्यंत) मोकळ्या पडिक जागी किंवा कचऱ्याच्या ढिगाच्या आसपास तणाप्रमाणे वाढते. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील उष्ण देशांत आढळते.

आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.

 

पुजेतले महत्त्व:

आघाडयासारख्या छोट्या पण मौल्यवान झाडाकडे आपलं दुर्लक्ष होऊ नये, त्याच्यातील गुणधर्माचा आपल्याला उपयोग व्हावा आणि ज्या ऋतूत जी झाडं येतात त्यांचा उपयोग आपल्या धार्मिक आचार-विचारांमधून, व्रतवैकल्यांतून केलेला आहे. आघाडा ही वनस्पती श्रावण-भाद्रपदात जास्त उगवते. आषाढ-श्रावणात ती नुकतीच उगवायला लागलेली असते आणि भाद्रपदामध्ये तिची वाढ पूर्ण होते. म्हणून श्रावणात मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या पत्रींमध्ये आघाडयाचा समावेश केला आहे.
गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि।।


आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीच्या पूजेत आघाडा व दूर्वांच्या माळेला खूप महत्त्व आहे. भाद्रपदात ज्येष्ठा गौरी बसवितात. त्या वेळेस आघाडयाची रोपं एकत्र बांधून ती भांडयावर ठेवतात. त्यावर गौरीचं चित्र बांधतात. देवीला ही पत्री अतिशय प्रिय असल्यामुळे भाद्रपद शुद्ध षष्ठीला आघाडा व तेरडा मुळासकट उपटून आणतात. त्यांच्यावरून पाणी व तांदूळ ओवाळून टाकतात. घरातल्या कुमारीकेकडून पूजा करवून घेतात. नंतर आघाडयाची जुडी सर्व खोल्यांतून फिरवितात. तेव्हा गुलालानं गौरीची पावलं काढतात. आघाडयाची जुडी ठेवून त्यावर गौरीचा मुखवटा बसवितात. तीन दिवसांनी गौरीचं विसर्जन करून आघाडयाची जुडी नदीच्या पाण्यात निर्माल्य म्हणून विसर्जन करतात. गौरी गणपतीच्या सणामध्ये आघाडा वनस्पतीला खूप महत्त्व आहे. हरितालिका व्रताचे देखील असेच आहे. जोपर्यंत या पुजेत आघाडा नसतो, तोपर्यंत ही पुजा पुर्ण होत नाही. परत येताना नदीकाठची वाळू आणून घरी ठेवतात, त्यामुळे घरी भाग्यलक्ष्मी येते, अशी समजूत आहे.

औषधी उपयोग:
आघाडयापासून क्षार तयार करतात. त्याला ‘अपामार्ग क्षार’ असे म्हणतात. याचा उपयोग मूतखड्यावर होतो. अपामार्ग क्षाराच्या तेलाचा वापर बहिरेपणा, ऐकू न येणे, कानात विविध आवाज येणे यावर होतो. आघाडयाची राख मिसळलेले तिळाचे तेल कानदुखीवर व फक्त राख व्रणावर बाहेरून लावतात मात्र यासाठी वैद्यचिकीत्सा आवश्यक आहे. पूर्वी दात घासण्यासाठी आघाडयाच्या काडीचाही उपयोग करीत. त्वचारोगावर आघाडयाच्या काढयाचा उपयोग करतात. हा खोकल्यावर गुणकारी आहे. याचे चाटण मधाबरोबर घेतात. या वनस्पतीची राख खोकला व दम्यावर उपयुक्त असते.

आघाडा हा वामक आहे. म्हणूनच यामुळे कफ पडून रुग्णाला आराम पडतो. मात्र याच्या सेवनाने उलटया होऊ शकतात. म्हणून वैद्याच्या सल्ल्याने याचा वापर करावा. पायात काटा विशेषत: बाभळीचा काटा मोडल्यास आघाडयाचा रस चोळून लावावा, त्याचे पोटीस बांधावे, काटा वर येतो.

आघाडयाच्या मुळांचा भिजवून काढलेला रस सौम्य स्तंभक (आकुंचन करणारा) असतो. पानांच्या भुकटीचा काढा मधाबरोबर अतिसारात व आमांशात उपयुक्त ठरतो. बिया वांतिकारक असतात.
वनस्पतीचा रस तिखट, रेचक व मूत्रवर्धक असून मूळव्याध, गळवे, चर्मरोग, शूल इ. व्याधींवर देतात. तसेच ती रंगकामात व कपडे धुण्यास वापतात. दात दुखत, हलत असतील तर काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळावा.

पोटदुखीवर आघाडयाची ४-५ पानं चावून खावीत किंवा पानांचा रस काढून प्यावा. पित्त झाल्यास आघाडयाचं बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून द्यावं म्हणजे पित्त बाहेर पडतं किंवा शमतं. नंतर तूपभात खावा.

खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाडयाची झाडं मुळासकट उपटून ती जाळून त्याची राख करावी. ती थोडी थोडी मधात घालून त्याचं चाटण द्यावं. यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाडयाचं चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण द्यावं. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाडयाच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. सर्दीमुळे खोकला, पडसं झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचं हाड वाढल्यास आघाडयाचं बी बारीक वाटावं. त्यात सैंधव, मेंदीचा पाला, जाईचा पाला समभाग घालून वाटावा, त्याच्या निम्मं तिळाचं तेल घालून ते निम्मं आटवावं. हे तेल दिवसातून 2-3 वेळा नाकात घालावं.

जलोदरामुळे पोटाला सूज आली असेल किंवा इतर अवयवांमध्ये काही कारणांनी सूज आली असेल तर आघाडयाची राख, पाणी व गूळ एकत्र करून द्यावी. त्यामुळे सूज उतरते. या राखेत पाण्याऐवजी गोमूत्र घातलं तरी चालतं.

गळवं लवकर पिकत नसतील आणि ती वारंवार होत असतील तर त्यावर आघाडयाची पानं बारीक वाटून त्यामध्ये तेल, हळद घालून गरम पोटिसासारखं गळवांवर बांधावं, म्हणजे गळवं लवकर बरी होतात.
ब-याच व्यक्तींच्या- विशेषतः घाम जास्त येणा-या व्यक्तींच्या मानेवर, छातीवर, पाठीवर, चेह-यावर पांढरे भुरकट डाग पडतात, त्यातून कोंडा पडतो, त्याला ’शिबं’ म्हणतात. त्या शिब्यास आघाडयाच्या क्षाराचं पाणी लावावं.

आघाडयाचा क्षार काढण्यासाठी आघाडयाची झाडं सावलीत वाळवावीत. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्‍यात घालावीत. त्यात राखेच्या चौपट पाणी घालून चांगली कालवावी. ते पाणी न हलविता १० ते १२ तास तसंच ठेवून द्यावं. नंतर वरचं स्वच्छ पाणी काढून गाळून घ्यावं व लोखंडाच्या कढईत घालून ते पाणी आटवावं. कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहील तो आघाडयाचा क्षार. या क्षाराला ’अपमार्गक्षार’ म्हणजे स्वच्छ करणारा- असं संस्कृतमध्ये नाव आहे.
पूर्वी परीट लोक कपडे स्वच्छ करण्यासाठी याच क्षाराचा उपयोग करीत असत. डोळे आल्यास आघाडयाच्या मुळाचं चूर्ण, थोडं सैंधव तांब्याच्या भांडयात घालून दह्याच्या निवळीत खलावं व ते अंजन डोळ्यात घालावं.

विंचवाच्या विषारावर आघाडयाचे तुरे किंवा मुळी पाण्यात उगाळून ते पाण्यात कालवावं. हे पाणी थोडं थोडं प्यायला द्यावं. पाणी कडू लागलं, की विष उतरलं असं समजावं. उंदराच्या विषारावर आघाडयाच्या कोवळ्या तु-यांचा रस काढून तो ७ दिवस मधाबरोबर द्यावा किंवा आघाडयाचं बी वाटून मधातून द्यावं.

कुत्र्याच्या विषारावर आघाडयाचं मूळ कुटून मध घालून द्यावं. कोरफडीचं पान व सैंधव दंशावर बांधावं. स्नान करतांना आघाडा, कडूभोपळा, टाकळा, कडूशेंदनीचें फळ हीं नरकाचे क्षयाकरितां व पाप नाशार्थ अंगावरुन ओंवाळून टाकावी असा उल्लेख कार्तिक महात्म्याच्या ३५ व्या अध्यायात नवव्या व दहाव्या श्लोकात आहे.

आघाडा ही वनस्पती मस्तकरोग, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, अशा रोगांवर उपयुक्त आहे. पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात. सर्दी, प्लीहा, डोळे आणि त्वचारोगांवर उपचार करण्यासाठी आघाडा उपयुक्त आहे. भूक कमी करण्यासाठी त्याच्या बिया टंचाईच्या वेळी वापरल्या जातात. त्याची पातळ मुळे दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जातात.

सर्वसाधारण उपयोग:
झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात. नरक चतुर्दशी च्या दिवशी आघाड्याचे पान मस्तकाभोवती फिरवून मग अभ्यंगस्नान करतात.

आघाड्यापासून बनणारी औषधे:
आघाड्याच्या तुऱ्यांपासून वा मुळ्यांपासून डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात, उदा. फलत्रिकादी काढा

आघाड्याची भाजी:
आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी पाचक असून, लघवीस साफ होण्यासाठी उपयोग होतो. या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शरीरातील मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे. या भाजीने मूळव्याधीच्या तक्रारी, गुदभागी वेदना, खाज इत्यादी कमी होण्यास मदत होते.

त्याचा विशिष्ट पद्धतीनं वापर केल्यास माणसाचे नशीब उजळू शकते. प्रत्येक व्यक्तीला जीवनातील सर्व भौतिक सुख मिळावे, असे वाटते. यासाठी तो कठोर परिश्रम करतो, परंतु कधीकधी नशीब त्या व्यक्तीला साथ देत नाही. असं होऊ नये यासाठी आघाडा वनस्पतीच्या मुळापासून काही उपाय करू शकता.

वाणीत यश मिळेते : वास्तूनुसार लाल आघाड्याची छोटी फांदी दाताने चावली तर व्यक्तीला वाणीत यश मिळते. याचा अर्थ व्यक्ती जे काही म्हणेल, जी इच्छा ठेवेल ती खरे होईल. आघाडा महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंचोपचार पद्धतीनुसार आघाड्याच्या मुळाची पूजा करून मंत्रोच्चार करून हातावर बांधून घ्या. असे केल्याने व्यक्तीला मोठ्या समस्यांपासून सुटका मिळते.

दर पावसाळ्यात थोडी भाजी करुन खाल्ल्यास शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुधारते. आजार होण्यापेक्षा होउ नये यावर आघाडा परिणामकारक आहे म्हणून पुजनीय ठेवला आहे. घरात सुख-समृद्धी येते : घरामध्ये आघाडा लावणं खूप शुभ मानले जाते. घरामध्ये योग्य ठिकाणी पांढरा आघाडा लावला तर तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्त होते. तसेच शुभ्र आघाडा जाळून त्याची राख गाईच्या तूपात मिसळून सेवन केल्यास संततीचे सुख प्राप्त होते, असे मानले जाते.

वशिकरणाची शक्ती: ज्योतिषांच्या मते आघाड्याचे मूळ हातात घेऊन पाण्याने चोळल्याने व्यक्तीला वशिकरणाची शक्ती प्राप्त होते. आघाड्याची मुळे हातावर घेऊन चोळल्यानंतर त्याचा कपाळावर टिळा लावावा. याशिवाय रविवारी पुष्य नक्षत्रात या वनस्पतीचे मूळ गरोदर महिलेच्या कमरेभोवती एखाद्या धाग्याने बांधावे. ते साधेपणा आणि गतीचा प्रभाव तयार करेल.

धनलाभ होईल : नवरात्री, दिवाळी किंवा कोणत्याही शुभसमयी आघाडा वनस्पतीचे मूळ घराच्या तिजोरीत ठेवल्यास धनलाभाचे योग जुळतात. याशिवाय रवि-पुष्य योगात आघाड्याच्या मुळाची पूजा केल्यानं जमिनीत गाडलेले धन मिळतं, असं मानलं जातं. त्याचबरोबर घरातून नकारात्मक शक्तीही नष्ट होतात.

होउ नये शरीरात बिघाडा |
मग ऐकदातरी घ्या आघाडा ||
(अपामार्ग अर्थात आघाडा )
ह्या अर्थाची एक म्हण आहे.

असा हा हिंदू धर्मामद्धे धार्मिक, पौराणिक व औषधी गुणधर्माचा सागर असणारा आघाडा
(सूचना: येथे दिलेली बहुतांश धार्मिक व अध्यात्मक माहिती (शास्त्रीय माहिती सोडून) श्रद्धेवर व लोकमान्यतेवर आधारित आहे.

संदर्भ:
१. डॉ.कांचनगंगा गंधे यांचे लिखाण व मराठी विश्वकोश
२. मराठी विकिपेडिया
३. बरेच आयुर्वेदिक संदर्भीय लेख
४. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
१६/०३/२०२५

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 88 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on आयुर्वेद व जडीबुटी – भाग ३ – औषधी गुणधर्माचा सागर: आघाडा

  1. या लेखात काही प्रमाणात, अंधश्रद्धा खतपाणी घालण्यात आले आहे. जसे नशीब उजळते,वशीकरण. बाकी लेख उत्तम आहे.
    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..