नवीन लेखन...

उगवतीच्या कळा : ४

शाळेतल्या दिवसांतील एक लख्ख आठवण !

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना , लेखनाला वाव मिळावा , त्यांच्या प्रतिभशक्तीला योग्य व्यासपीठ मिळावे , म्हणून प्रत्येक शाळेत हस्तलिखित वा भित्तीपत्रके तयार केली जातात . त्यासाठी जाणकार शिक्षकांचे संपादक मंडळ असते . विद्यार्थ्यांकडून आलेल्या साहित्याची निवड करणे , योग्य ते संपादकीय संस्कार करणे आणि ज्यांचे हस्ताक्षर चांगले असेल त्यांच्याकडून लेखन करवून घेणे ही कामे ते संपादक मंडळ करीत असते. प्रत्येक शाळेत अनेक वर्षे सुरू असलेली ही एक चांगली प्रथा आहे . त्यातून अनेक विद्यार्थ्यांना आपल्यातील प्रतिभाशक्तीचा साक्षात्कार झाला आहे. अनेक लेखकांची पहिली सुरुवात बहुधा अशीच झाली असावी. पण माझ्या लेखणीच्या नशिबी तो योग नव्हता बहुधा.

मी ज्या शाळेत शिकत होतो ती एक नामवंत शाळा होती . सर्व शिक्षक वृंद ज्ञान आणि अनुभवसंपन्न होता . सर्वांबद्दल आदर युक्त भीती वाटायची . त्या शाळेतील अनेक उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित असायचे . हस्तलिखित हा तर खास उपक्रम होता . त्यात आपले साहित्य प्रकाशित होणे हे अभिमानास्पद असायचे .

मी शाळेत असल्यापासून कविता करायला लागलो होतो . त्यात वाङ्मयीन मूल्य किती होते , ते कळण्याचे ते वय नव्हते . मग त्यासाठी एक मार्ग होता . आपली कविता शाळेच्या हस्तलिखितासाठी द्यायची . निवड झाली तर कविता चांगली असं समजायचं , असा एक तेव्हाचा आमचा ठोकताळा होता .
तर मी कविता दिली आणि दुसऱ्याच दिवशी स्टाफरूम मध्ये त्या शिक्षक संपादकांनी बोलावलं. मी उत्साहाने गेलो .

त्यांनी माझ्याकडे एकदा पाहिलं , मी दिलेला कवितेचा कागद परत दिला आणि पुढची दहा मिनिटं ते माझ्या कवितेची खिल्ली उडवीत होते. त्यातले शब्द , मी वापरलेल्या प्रतिमा सगळ्याची त्यांनी यथेच्छ खिल्ली उडवली. स्टाफरूम मधील अनेक शिक्षक हसत होते. मला भयंकर काहीतरी वाटू लागले. मी काहीतरी मोठा गुन्हा केला असेच वाटू लागले.

मी शरमून मान खाली घालून वर्गात येऊन बसलो. शाळा सुटल्यावर खेळायला न थांबता , शाखेत न जाता थेट घरी आलो.
माझा उदास चेहरा बघून काकूने कारण विचारले . ते कळल्यावर ती हसायला लागली.” तू आत्ता लगेच तात्यांकडे जा आणि त्यांना दाखव कविता. काय म्हणतात ते ऐक. ” मी तसाच उठलो आणि तात्यांकडे निघालो .

तात्या म्हणजे त्यावेळचे काँग्रेसचे खासदार मोरोपंत जोशी. नवकोकण या नावाच्या साप्ताहिकाचे ते मालक , मुद्रक , संपादक होते. तेव्हा आम्ही टिळक आळीत रहात होतो. नवकोकण चा छापखाना आणि कार्यालय टिळक आळीत होते. तात्यासुद्धा टिळक आळीत राहायचे. ते वृद्ध होते , राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याबद्दल सर्वाना आदर होता. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते काहीतरी लिहीत होते . मी त्यांना हाक मारली . तेव्हा चष्मा थोडा पुढे ओढून त्यांनी माझ्याकडे पाहिले .

” काय हवंय ?”

मी भीतभीत कवितेचा कागद पुढे केला .आणि सगळं धैर्य एकवटून म्हणालो. ” मी कविता केली आहे , शाळेतल्या हस्तलिखितासाठी सरांनी ती घेतली नाही. तुम्ही वाचाल का? ”
ते हसले , म्हणाले ;
” ठेव त्या पेपरवेटखाली आणि उद्या संध्याकाळी ये , मग वाचून सांगतो .”

त्यांनी सांगितल्याप्रमाणे कविता ठेवली आणि घरी आलो. ती रात्र आणि दुसरा सगळा दिवस मी बेचैन होतो . तात्यानासुद्धा कविता आवडली नाही , तर… याच विचाराची बेचैनी लागून राहिली होती. दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी न जाता थेट तात्यांच्या नवकोकण मध्ये गेलो. तात्यांसमोर उभा राहिलो. त्यांनी चष्मा काढून हातात घेतला .

” तू काल कविता दिली होतीस ना वाचायला ? वाचली .”

मला काय बोलावं कळेना. मी चुळबूळ करीत तसाच उभा राहिलो.

“तुझी कविता मी नवकोकणच्या अंकात छापायला घेतली आहे . येत्या अंकात आपण ती प्रसिद्ध करू , चालेल ना ? मला तुझी कविता आवडली . आता पुन्हा कविता केलीस की घेऊन ये .”

मी त्यांच्याकडे बघत राहिलो. त्यांच्या शब्दांचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचायला वेळ लागला आणि अर्थ कळला तेव्हा आनंदानं उडीच मारली मी.ज्या कवितेची सगळ्यांसमोर खिल्ली उडवली गेली होती , जी कविता हस्तलिखितासाठी योग्य वाटत नव्हती , ती कविता चक्क वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार होती.

मी तात्यांना नमस्कार करून पळतच घरी आलो. ही बातमी सर्वात आधी मला काकुला सांगायची होती …

– उगवतीच्या त्यावेळच्या कळा शब्दातीत होत्या. माझी जडण घडण होत होती आणि अनेक दीपस्तंभ मला प्रकाशमान करीत होते .

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.

९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..