नवीन लेखन...

उगवतीच्या कळा : १

परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं?

त्यासाठी मला खूप वर्ष पाठी जायला हवं. शिक्षण चालू होतं. गरिबी असली तरी रडायचं नाही आणि कुणासमोर उगीचंच हात पसरायचे नाहीत हे संस्कार आई अण्णांनी केले होते. पोट भरण्यासाठी कसलंही चांगलं काम करायला लाज वाटून घ्यायची नाही हा अनुभवसिद्ध संस्कार काकूनं केला होता. त्यामुळं पहाटे उठून रत्नभूमी या तेव्हाच्या वर्तमानपत्राची लाईन टाकणे ( घरोघरी पेपर वाटणे ) हे काम करावे लागे आणि दर रविवारी रत्नागिरीतल्या गोखले नाक्यावर रविवारची लोकसत्ता ओरडून विकण्याचे काम करावे लागे.

आपल्या वयाची इतर मुले काय करतात हे बघायलाही तसा वेळ नसायचा किंवा कोण काय म्हणेल याचा विचारसुद्धा मनात आणायला फुरसद नसायची. सकाळी पेपर टाकण्याचे पैसे ठरलेले होते , पण रविवारी पैसे मिळायचे ते स्वतःच्या ओरडण्याच्या क्षमतेवर आणि येणाऱ्याजाणाऱ्यांच्या पाठून पळत त्यांना पेपर घ्यायला लावण्याच्या कौशल्यावर.

मला चांगलं आठवतं , ओरडून पेपर विकणारे आम्ही तीनचार जण होतो . शिवाय एक वृद्ध गृहस्थ पण असायचे पेपर विकायला . खाकी हाफ पॅन्ट , खाकी शर्ट , जुनी सायकल आणि त्यावर पेपरचा मोठा गठ्ठा . सुरुवातीला आम्हा सगळ्यात ते जास्त पेपर विकायचे आणि कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे ठरलेले वाचक त्यांच्याकडूनच पेपर घ्यायचे .
सुरुवातीला ओरडून पेपर विकणे हे मला कसेतरीच वाटायचे. परिणामी पेपर कमी विकले जायचे. त्यामुळे कमिशन कमी मिळायचे. दर रविवारी जवळपास तीन तास खर्च व्हायचे आणि तुलनेत हाती काहीच पडत नव्हते.

– अशाच एका रविवारी उदास होऊन लोकसत्ताचा गठ्ठा मांडीवर घेऊन एसटी स्टँडच्या बाकड्यावर बसलो असताना पुरवणीतल्या एका लेखावर नजर गेली . आणि बघताबघता तो लेख वाचून संपवला . मला काय वाटलं कुणास ठाऊक पण तो लेख मी पुन्हा वाचला . पुन्हा वाचला . आणि त्या लेखाच्या प्रेमातच पडलो. आलंकारिक असली तरी सहजसोपी भाषा . व्यावहारिक उदाहरणे . वेगळे विषय . उर्दू शेरोशायरी . नर्म विनोद आणि असं बरंच काही …

मी लेखकाचं नाव पाहिलं. विद्याधर गोखले. प्रसिद्ध लेखक , नाटककार आणि लोकसत्ताचे तेव्हाचे संपादक .

विद्याधर गोखले यांच्या काळात लोकसत्ता खूप गाजू लागला होता , त्यांच्या अग्रलेखाच्या आणि दर रविवारच्या त्या नितांतसुंदर लेखामुळे.

– मला काहीतरी सापडलं होतं. तो लेख मी बारकाईनं पुन्हा वाचला .मनाशी शब्द जुळवले आणि उठलो.

– एव्हाना बरोबरीचे सगळे पेपर विकायला गेले होते. बहुधा मला सगळे हसत गेले असावेत .

मी मनाशी जुळवलेले विद्याधर गोखल्यांच्या लेखातील शब्द पुन्हा एकदा उच्चारले . लेखाचा मतितार्थ सांगणारे ते एकच वाक्य मी मोठ्यांदा उच्चारले . लोकसत्ता , लोकसत्ता असे पुन्हा एकदा ओरडलो आणि स्टँडच्या बाहेर आलो . रस्त्यावर आल्यावर पुन्हा ते वाक्य ओरडलो .

गंमत म्हणजे त्यावेळी स्टँडच्या बाहेर असणाऱ्या आंबर्डेकरांच्या समर्थ लॉज मधून एक गृहस्थ बाहेर आले आणि मला म्हणाले , ” काय म्हणताहेत गोखले ? ” मी पेपर पुढं केला , त्यांनी दिलेले पैसे घेतले . पुन्हा ओरडत गोखले नाक्यावर आलो. त्या रविवारी मात्र मी एक तासात पेपर संपवून घरी आलो. बाकीचे विक्रेते काय करतात हे न बघता मी माझ्या नव्या शैलीने पेपर विकले .

मला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. दर रविवारी मी गोखल्यांचे लेख वाचू लागलो. कळत नकळत लेखनाचे संस्कार होऊ लागले. माझ्या लेखनाच्या उगवतीच्या काळातल्या ह्या कळा मला नवीन उभारी देऊन गेल्या. ते ऋण मान्य करायलाच हवे !

जाताजाता नोकरीत स्थिरावल्यावर मी मारुती ८०० , ही गाडी घेतली . त्यानंतर जेव्हा मी गाडी घेऊन पहिल्यांदाच गोखले नाक्यावर गेलो तेव्हा ट्रॅफिकचा विचार न करता गाडी उभी केली . खाली उतरून रस्त्यावरची धूळ कपाळाला लावली . एव्हाना ट्रॅफिक हवालदार शिटी वाजवत माझ्याजवळ आला . गाडी का थांबवलीत म्हणून विचारू लागला . मी त्याला सांगितलं ,

” या गोखले नाक्यावर एकेकाळी मी पेपर ओरडून विकत असे , त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला मी थांबलो होतो .” त्याचा आ वासलेला चेहरा बघत मी गाडी सुरू केली .

उगवतीच्या कळा सुरुवातीला असह्य होत्या पण लेखक म्हणून जडणघडणीत त्या मोलाच्या होत्या , हे नक्की !

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..