नवीन लेखन...

जनपदोध्वंस किंवा साथीचे आजार

नमस्कार वाचकहो ,
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !! येणारी पुढील अनेक वर्षे संपूर्ण विश्वालाच ; उत्तम आरोग्याची , सुरक्षेची आणि संपन्नतेची असू देत , ही परमेश्वराजवळ प्रार्थना …….. !

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लेखन प्रपंचातून आपल्यासमोर येत आहे …. जनपदोद्ध्वंस आणि व्याधिक्षमत्व असा विषय घेऊन .

२०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय ठरणारे झाले आहे ( ठरलंय ) . दैनंदिन जीवनव्यापारही करणे अतिशय कठीण झाले होते ; असा मागील काही महिन्यांचा काळ आपण सर्वांनी पाहिला , अनुभवला . अजूनही थोड्या फार प्रमाणात त्याची झळ आहेच …. लवकरच तीही निवेल अशा सकारात्मक मुद्यावर येऊन आपण वरील विषय समजून घेऊया .

आयुर्वेदाच्या ग्रंथकर्त्यांनी शास्त्रकारांनी काय सांगितलंय ; किती मूळापासून ; खोलवर याचा विचार करून , सांगून ठेवलंय ते पाहूया.

सर्वात आधी , या दोन मोठ्या शब्दांचा अर्थ जाणून घेऊ .

जनपदोद्ध्वंस म्हणजे काय ? तर संपूर्ण जगभरात सामान्य नैसर्गिक भाव दूषित झाल्याने एकाच वेळी , एकाच समान लक्षणांनी युक्त असे रोग उत्पन्न होऊन, एकाच वेळी जनपदास ( अनेक माणसांना ) नष्ट करते ; ती स्थिती म्हणजे जनपदोद्ध्वंस … !

वायू , जल , देश आणि काल हे चार सामान्य प्राकृतिक भाव दूषित झाल्याने अशी स्थिती ओढावते . ज्यालाच आपण Epidemic ह्या नावाने जाणतो . गेल्या काही महिन्यांपासून आपण सगळेच ह्याला सामोरे जातोय .

शास्त्रकारांनी , ह्या सगळ्याचे मूळ कारण ‘ अधर्म ‘ असे सांगितले आहे . चुकीच्या पद्धतीने , चुकीच्या मार्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या जातात , त्या अधर्मात मोडतात आणि हे करताना ; ते चुकीचे आहे , हे माहीत असूनही केले जाते त्याला ‘ प्रज्ञापराध ‘ असे म्हणतात . बघा , अतिशय छोट्या वाटणाच्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा भयंकर स्वरूपात समोर येतात .

आता ; व्याधिक्षमत्व ह्याचा अर्थ जाणून घेऊ .
रोगाशी लढण्यासाठी , प्रतिकार करण्यासाठी असलेली शरीराची स्थिती , थोडक्यात immunity म्हणजे व्याधिक्षमत्व ! शरीरातील पेशींच्या स्तरावर तुमचे शरीर त्या विशिष्ट व्याधीशी किती जोरकस प्रतिकार करते यावर व्यक्तीचे व्याधिक्षमत्व उत्तम , मध्यम , हीन (कमी) आहे असे म्हटले जाते .

मग आता , ह्या दोन गोष्टींचा परस्पर संबंध कसा आहे ? किंवा आहे का ?

तर निश्चितच तो संबंध आहे. कसा आहे … ? तर जेव्हा अशा स्वरूपाच्या Epidemic व्याधी येतात , त्यावेळी त्याचा पसरण्याचा वेग जास्त असतो . व्यक्तीचे व्याधिक्षमत्व उत्तम असेल तर अशा साथीस आपण बळी पडत नाही . किंवा एखाद्याला झालाच तर पटकन बरा होतो .

व्याधिक्षमत्व ही काही एकदम ८-१५ दिवसात तयार होणारी शारीरिक , मानसिक स्थिती नाही . तर आयुर्वेदाच्या शास्त्रकारांनी दिनचर्येत , ऋतुचर्येत सांगितलेल्या गोष्टींचे पालन नित्यनेमाने केल्यास , अभ्यासाने प्राप्त होणारी अवस्था आहे.

Epidemics जेव्हा येतात , तेव्हा काही विशेष नियमांचे पालन करण्यासाठीचे आदेश शास्त्रकार , शासन देते . त्यानुसार व्याधिक्षमत्व चांगले घडण्यास , जे आहे ते अधिक चांगले होण्यास निश्चितच मदत होते .

शास्त्रकार काय सांगतात ?
तर … रोगाचे मूळ कारणच दूर करा / दूर ठेवा . सध्याच्या परिस्थितीत आपण ‘ घरी राहाणे ‘ हा नियम जो पाळला , तो याच संदेशात मोडतो .

जास्तीत जास्त काळ ‘ घरात थांबायचे ‘ म्हटल्यावर निश्चितच चलनवलन कमी होऊ लागणार . याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊन , ती बिघडू नये याचाही विचार आचार्यांनी आधीच केलाय . प्रत्येकाच्या दिनचर्येत व्यायाम आहेच असे गृहीत धरून आचार्य सांगतात , अल्प आहार घ्यावा

याचप्रमाणे आयुर्वेदानुसार पंचकर्म चिकित्सा वैद्यांकडून करवून घ्यावी . तसेच वेगवेगळी रसायन औषधी वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत . उदाहरणार्थ , आत्ताच्या काळात आपल्याला च्यवनप्राश किंवा दूध + गाईचे तूप किंवा हळद + दूध घ्यायला सांगितले गेले , तसेच इतरही रसायन औषधींचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करावा.

साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी , रोगातून मुक्त होण्यासाठी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक बळही मिळावे / वाढावे म्हणून आपल्या इष्ट देवतांचे पूजन , स्तवन , प्रार्थना करणे , शक्य असेल त्याप्रमाणे समाजाच्या हिताचे कार्य करणे , गरजूंना मदत करणे, तसेच सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून वागणे , यांचाही समावेश शास्त्रकारांनी ‘ औषधींमध्येच ‘ केला आहे .

म्हणजेच , जनपदोद्ध्वंस अशी स्थिती असताना , माणसाने ; आपले बाकीचे व्यवहार , अर्थाजन , छंद इत्यादी गोष्टी बाजूला ठेवून , स्वतःचे आरोग्य सांभाळणे , राखणे , समाजातील इतर व्यक्तींचाही जीव ( प्राण ) वाचेल असे कर्म करणे , हे आद्यकर्तव्य मानावे .

कारण , अर्थातच ; माणसाचे आरोग्य (शारीरिक + मानसिक + बौद्धिक) उत्तम असेल तर आयुष्याला अर्थ आहे ; धर्म , अर्थ , काम , मोक्ष ह्या चार पुरुषार्थांना अर्थ आहे . कुटुंब , समाज , राष्ट्र , विश्व यांना अर्थ आहे आणि म्हणून शास्त्रकार सांगतात ,

‘आयुः कामयमानेन धर्मार्थसुखसाधनम् । आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः ।। ‘

वैद्य . स्वाती शार्दुल कर्वे
अथर्व आयुर्वेद चिकित्सालय , ठाणे ( प . )
९८१९०९७९६४

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..