
प्रथमपुज्य म्हणुन सर्व देवदेवतांचे वरदान असलेले आपले बाप्पाच श्री रिद्धी-सिद्धी मातेंचे पती आहेत. माता रिद्धी म्हणजे साक्षात बुद्धीचे स्वरुप आणि माता सिद्धी म्हणजे त्या बुद्धीच्या सहाय्याने मिळवलेले यश. एखादे कार्य संपन्न करण्यासाठी या दोन्ही मातेंची कृपा आपल्यावर असावी. आपले बाप्पा गणपती हे साक्षात ब्रह्मदेवांचे अवतार आहेत. ब्रह्मदेवांनीच माता पार्वतीकडे श्री गणेश रुपात जन्म घेतलेला आहे. आणि माता रिद्धी-सिद्धी या सरस्वती मातेंचा अवतार आहेत.
श्री गणेशांचा जन्म हा अत्यंत वेगळ्या स्वरुपात झाला आहे. आई आदिशक्तीने श्री गणेशांना साक्षात ध्यानातुन जन्म दिला. मातेच्या अवघ्या सात महिन्याच्या ध्यानअवस्थेतुन श्री गणेशांचे स्वरुप प्रकटले. इतर बालअवतारांप्रमाणे त्यांनी उदरी नऊ महिन्याचा कालावधी घेतला नाही. तर जेव्हा मातेच्या ध्यानअवस्थेत त्यांच्या अंगावर जी मळी साचली, त्या मळीचा मातेने सुपारीएवढया आकाराचा गोळा तयार केला आणि मग त्यात आपल्या अखंड ध्यानभक्तीने एका सुंदर बालकाची प्राणप्रतिष्ठा केली. तेच आपले सर्वांगी सुंदर बाप्पा.. आणि याच सुंदर बाळाचे गजरुप कसे घडते या लिलेशी आपण सर्वजण परिचित आहोत. हा मोहक गजरुप अवतार देवांकडुन यासाठी अवतरित केला गेला ज्यामुळे ध्यान लावुन देवांकडुन अमरत्वाचे वरदान मागणारी उन्मत्त झालेली असुरी शक्ती वेळोवेळी निष्फळ व्हावी, विफल व्हावी.
जेव्हा जेव्हा देवांनी अवतार घेतला आहे, तेव्हा तेव्हा त्यांची अर्धांगीनी सुद्धा त्यांच्या लीलेमध्ये सहभागी होत आल्या आहेत. म्हणुन जगतपालक श्री विष्णुंकडुन संकेत मिळाल्यानंतर माता सरस्वती देव विश्वकर्मांकडे श्री गणेशांसाठी रिद्धी-सिद्धी स्वरुपात जन्म घेतात. देव विश्वकर्मा म्हणजे साक्षात रचनाशक्ती. दागिना घडवण्यासाठी सोनाराकडे, शिल्प घडवण्यासाठी शिल्पकाराकडे, चित्र काढण्यासाठी चित्रकाराकडे, घर बांधण्यासाठी गवंडीकडे, तसेच शिंपी, सुतार, लोहार या सर्वांकडे घडवण्यासाठी जी बुद्धी आहे, ती साक्षात देव विश्वकर्मांचाच आशिर्वाद आहे. साक्षात विश्वकर्मांचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या व्यक्तीकडुन अत्यंत सुंदर आणि आकर्षक अश्या कलाकृती तयार होतात. कदाचित हे सत्य फार कमी प्रचलित आहे.
इथे मातेंचे बालरुप जन्मते आणि अखंड ब्रह्माण्डला आनंद होतो. वाऱ्याच्या वेगाने त्यांच्या नामकरणाचे निमंत्रण कैलासापर्यंत पोहोचते. किती ही सुंदर लिला की, चिमुकले ब्राह्मणरुप घेतलेले श्री ब्रह्मगणेश सुद्धा मातेला पाळण्यात घालताना उपस्थित होते. पण तेव्हा त्यांना ही कल्पना कुठे होती की याच त्यांच्या सौ. आहेत म्हणुन😊.
पुढे हळुहळु इथे कैलास पर्वतावर गौराईच्या मायेमध्ये ग़णेश मोठे होतात आणि दुसरीकडे देव विश्वकर्मांच्या सानिध्यात माता रिद्धी-सिद्धी.
या मधल्या कालावधीत श्री गणेशांकडुन म्हणजेच मोहक गजरुप धारण केलेल्या या सर्वांगी सुंदर बाप्पा कडुन अनेक उन्मत्त्त असुरांना मुक्ती मिळते, ज्यांनी त्रिदेवांकडुन वरदान मिळवुन देवांना, ऋषींना आणि प्रजेला त्रास देण्याचा महाप्रयत्न केला होता. बघता बघता इतका कालावधी कधी निघुन जातो हे कळतच नाही कि आता माता गौराईला प्रथमपुज्य गणेशांच्या विवाहाचे विचार येऊ लागतात.
आणि मग हा विषय घरामध्ये चर्चेचा होउन जातो. पण गणेशांना मात्र या गोष्टीची अजिबात घाई नसते. कित्येकदा श्री ग़णेशांनी माता गौराईच्या या विषयाला दुर्लक्षित केले होते. पण कधीना कधी त्यांना हा विषय गांभिर्याने घ्यावाच लागणार होता. पण तरिही गणेशांना कुठेतरी ही खात्री होती कि कदचित या विषयामध्ये जर आपल्या बाबांनी म्हणजेच महादेवांनी हस्तक्षेप केला तर मात्र आपण अजुन काही वेळ या संसारापासुन दुर राहु शकतो. म्ह्णुन साक्षात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कैलास पर्वतापासुन दुर श्री ग़णेश एका दाट जंगलात ध्यानाला सुरुवात करतात. “ॐ नम: शिवाय”, “ॐ नम: शिवाय”, “ॐ नम: शिवाय”…., ही मंत्रावली बुदधीचे आदिपती असलेल्या श्री गणेशांच्या मुखातुन ऐकताना अत्यंत स्वरमय वाटत होती, त्यांच्या या गोड ध्वनीच्या लहरी काहीश्या दुरवर असलेल्या देवी तुळशीच्या मनाला, समुद्राच्या सौम्यलाटा जणु किनाऱ्याला स्पर्श करुन पुन्हा परततात, तश्या येऊन जाग़ृत करुन जात होत्या. श्री ग़णेशांचा ध्वनी ऐकुन देवी तुळस न राहवुन याच ठिकाणी धावत येतात. तुळस या श्रीविष्णुंच्या प्रिय भक्तांपैकी एक आहेत. त्या ध्यानस्थ बसलेल्या श्री गणेशांचा ध्वनी ऐकुन आणि ध्यानामुळे निर्माण झालेल्या त्यांच्या चेहऱ्यावरिल निलवर्णी छ्टा पाहुन अत्यंत प्रसन्न होतात. त्यांच्या मोहक ध्यानस्थ रुपाकडे पाहुन देवी तुळशीलाही मनोमन ध्यान करण्याची इच्छा जागृत होते आणि अगदी त्यांच्या समोर त्या आपल्या श्रीविष्णुदेवांचे ध्यान सुरु करतात. “ॐ श्री विष्णुदेवता नमो नम:”, “ॐ श्री विष्णुदेवता नमो नम:”, “ॐ श्री विष्णुदेवता नमो नम:”….. समोरासमोर कधी “ॐ नम: शिवाय”, तर कधी “ॐ श्री विष्णुदेवता नमो नम:” या दोन्ही ध्वनी एकमेकांमध्ये मिसळुन या जंगलात अत्यंत प्रसन्न लहरी निर्माण करत होत्या. देवी तुळस या गणेशांकडे पाहुन ध्यान करत होत्या तर श्री ग़णेश डोळे बंद करुन ध्यान करत होते. ध्यान करता करता गणेशांना तुळशीचा आवाज ही ऐकु येत असतो. त्यांना मनोमन वाटु लागते. मी इथे एकटा असताना अचानक हा दुसरा मंत्र समोरुन कोणाचा ऐकु येतोय. दोन्ही मत्रांच्या आवाजाने आपले ध्यान खंडित करुन ते मध्येच डोळे उघडतात. आणि रागाने म्हणतात कि, “तुझ्यामुळे माझं ध्यान इथे स्थगित झालं, आता तु ज्यासाठी ध्यान लावलं आहेस. ते तुला कधीही मिळणार नाही, आणि तुझा विवाह हा एका असुरासोबत होईल.” यावर देवी तुळस ही गप्प बसत नाहीत, त्या बोलतात कि तुमचेही दोन विवाह होतील. हे ऐकुन आपलं ध्यान स्थगित करुन श्री ग़णेश लगेचच कैलास पर्वतावर येतात. आणि जे घडणार आहे, त्याचा स्विकार करायचे ठरवतात.
कित्येक ठिकाणी हे असत्य प्रचलित आहे कि गणेशांनी तुळशीला श्राप दिला आहे. तुळस ग़णेश पुजेमध्ये वर्ज्य आहे. पण असं काहीही नाही. इथे हा क्षणभर झालेला एक वाद आहे जो श्राप या शब्दाने प्रचार केला गेला आहे.
इथे ब्रह्मांडामध्ये सर्वत्र श्री ग़णेशांच्या विवाहासाठी कन्येची मागणी होत असताना, श्री विष्णुंकडुन संकेत मिळताच देव विश्वकर्मा आपल्या दोन्ही मुलींना म्हणजेच आपल्या माता रिद्धी-सिद्धी यांना घेऊन थेट कैलास पर्वत गाठतात. कैलास पर्वतावर आल्यावर, माता रिद्धी-सिद्धी, महादेव आणि गौराईचा आशिर्वाद घेऊन आसन ग्रहण करण्यास जाणारच तितक्यात श्री ग़णेश त्यांना अडवतात आणि म्हणतात. बसण्यापुर्वी मला यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. उपस्थित असलेल्या सर्व मोठयांकडुन परवानगी घेऊन श्री ग़णेश स्वत:चा पहिला प्रश्न विचारतात, कि तुम्ही इथे एका अश्या उंच आसनावर बसा जिथे बसल्यावर कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा अपमान होणार नाही. हे ऐकताच दोन्ही बहिणी महादेव आणि गौराईच्या चरणी येऊन बसतात, तिथेच सर्वांना प्रसन्नता मिळते. कारण त्याहुन उंच स्थान या ब्रह्मांडात दुसरे नाही. दुसरा प्रश्न असा की, यापैकी काहीही केले तरी मिळत नाही अशी गोष्ट कोणती? विवाह केला तरी, प्रेम केले तरी, मैत्री केली तरी आणि दान केले तरी मिळत नाही अशी गोष्ट कोणती? तेव्हा दोघीही एकाच स्वरात, एकाच लयीत उत्तर देतात कि ती गोष्ट म्हणजे आनंद, आनंद हा स्वत:लाच घ्यावा लागतो. तो तुम्हाला कुठेही शोधुन सापडणार नाही. तुम्ही स्वत:च आनंदाचे स्त्रोत आहात. आनंद कसा घ्यावा हे व्यक्तीगत आपल्या स्वत:वरच अवलंबुन आहे. त्यांच्या या एकत्रित लयबद्ध आवाजातुन त्यांची एकरुपता ही स्पष्ट झळकत होती. उपस्थित असलेल्या सर्वांना दोन्ही प्रश्नांची उत्तरं ऐकुन आनंद झाला. माता गौराईने देव विश्वामित्रांना तात्काळ होकार दिला. आणि लगेचच त्या तयारीच्या कार्यात गुंतल्या, गणेशांना काहीच समजेना, आणि हे ही कळले नव्हते कि नक्की कोणत्या मुलीला आपल्या आईने होकर दिला आहे. त्यांनी न राहवुन लगबगीने आत जाऊन माता गौराईला विचारले, “माते, नक्की कोणत्या मुलीशी तुम्ही माझा विवाह ठरवला आहे.
माता पार्वती : कोणत्या म्हणजे? दोन्ही मुलींशी.
गणेश : दोन्ही?
माता पार्वती : हो… कारण प्रश्न विचारताना तु हे कुठे स्पष्ट केलस की तुझा प्रश्न हा नक्की कोणत्या मुलीसाठी आहे ते?
हे ऐकुन श्री गणेशांना देवी तुळशीचे शब्द चटकन आठवतात.
पण कितीही बुद्धीचे आदिदैवत जरि असले तरी आदीशक्त्तिच्या आज्ञेचे पालन करणे हे त्यांचे परम कर्तव्य होते.
अश्या रितीने पुढे श्री गणेशांचा विवाह माता श्री रिद्धी-सिद्धी यांच्या सोबत थाटामाटात आणि अत्यंत आनंदात होतो.
शुभ आणि लाभ हे श्री रिद्धी-सिद्धीं मातेंचे पुत्र आहेत. माता रिद्धीचा पुत्र शुभ आणि माता सिद्धीचा पुत्र लाभ….


Leave a Reply