नवीन लेखन...

ब्रेन रॉट – ३ : लोच्या झाला रे

इन्स्पेक्टर शर्मांचा फोन आला तेव्हा पंत , रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतागृहात होते .
तसे ते ‘मोकळे ‘ झाले होते .
पण बेसिन जवळच्या ज्येष्ठ नागरिक म्हणता येईल अशा माणसाकडे ते पहात होते .
गेली सात ते आठ मिनिटे तो माणूस चेहरा धूत होता . नॅपकिन ने कोरडा करत होता . स्वतःभोवती सगळीकडे फिरून चेहरा निरखित होता . पुन्हा चेहरा धूत होता . पुन्हा कोरडा करत होता . पुन्हा… पुन्हा…

सुरुवातीला ते गमतीने या प्रकाराकडे पहात होते . पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे .
त्यांच्या लक्षात आलं , तो माणूस वेगवेगळ्या अँगलने उभा राहून नुसतं आरशात पहात नव्हता . तर वेगवेगळ्या अँगलने मोबाईलवर सेल्फी घेत होता . मनासारखा सेल्फी आला की लगेच सोशल मीडियावर टाकत होता . पंधरावीस सेकंदाने किती लाइक्स मिळाल्या ते चेक करत होता आणि लाइक्सचा मनासारखा आकडा दिसला नाही की पुन्हा तोंड धूत होता . पुन्हा सेल्फी … पुन्हा सारखा सारखा मोबाईल चेक करणं …

असं त्याचं कितीतरी वेळ चाललं होतं .
पंत स्थळकाळ विसरून त्याच्याकडे पहात होते .
जसजसा वेळ जात होता तसतसा तो अधिकाधिक निराश होताना दिसत होता .
शेवटी त्याची सहनशीलता संपली असावी .
काहीशा अनिच्छेनं तो तिथून हलला आणि पाय ओढत निघाला .
पंतांना राहवलं नाही .
ते वयाला न शोभणाऱ्या चपळतेनं त्याच्या जवळ गेले .
” वय किती तुमचं ? ”
त्यांनी विचारलं आणि तो एकदम दचकला . पावसाळ्यात रस्त्यावरच्या पाण्याचा अंदाज येऊ नये आणि अचानक पाय खड्ड्यात जावा . तसं त्याचं झालं .
” काय म्हणालात ? वय ? सत्तर आहे वय माझं ! ”
पंत हसले .
” सहज चौकशी केली . ”
” सहज नाही . मला तुम्ही न्याहाळत होता , हे मी बघितलंय आरश्यात . तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना ? स्वाभाविक आहे . मी सेल्फी काढतो आणि सोशल मीडियावर टाकतो . लाइक्स आणि कमेंट्स साठी . पण कुणी काळा कुत्रा सुद्धा ढुंकून बघत नाही . तरीही मी सेल्फी काढतो , टाकतो . ”
” कशाकरता ? ”
” अं ? ”
क्षणभर तो गोंधळला .
त्याला काही सुचेना .
” मला माझी प्रतिमा उजळायची आहे . लोकांच्या मनात घर करून बसेल असं काहीतरी करून दाखवायचं आहे . ”
तो म्हणाला .
” अशाने साध्य होईल असं वाटतं तुम्हाला ? ”
” म्हणजे ? सध्याचा जमानाच असा आहे . जितका वेळ तुम्ही त्यांच्या समोर असाल तितके तुम्ही लोकप्रिय व्हाल . ”
” गेली किती वर्षे हा उद्योग करताय ? ”
” निवृत्त होण्याच्या आधीपासून. . तेव्हा मला बरेच लाइक्स मिळायचे . बॉस असल्याने अनेकजण मस्त कॉमेंट्स करायचे . शेअर करायचे . पण रिटायर्ड झालो नि सगळा ओघ आटला . मग जिद्दीनं मी पुन्हा फोटो पाठवू लागलो . पण कुणी ढुंकून बघेनासं झालं . ओळखीचे समोर दिसले की ते तोंड फिरवू लागले . मग मी अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागलो . तर अनेकजण मला ब्लॉक करू लागले . तुम्हाला सांगतो माझी झोप उडून गेली . डोक्यात केवळ लाइक्स , शेअर , कमेंट्सचा भुगा पाठी लागला . मग मी नवीन युक्त्या शोधल्या . गर्दीच्या ठिकाणी लोकांना थांबवून मी फोन नंबर्स द्या म्हणून सांगू लागलो . कधी गयावया करून , कधी खोटं बोलून त्यांचाच फोन घेऊन माझ्या नंबरवर मिसकॉल देऊन त्यांचा नंबर मिळवू लागलो . वेळ प्रसंगी मार सुद्धा खाल्ला आहे . ”
पंत बघत बसले .
अत्यंत निर्लज्जपणे समोरचा सत्तरीतला माणूस सांगत होता . वेळप्रसंगी मार सुद्धा खाल्ला आहे .
” भल्या माणसा , तुझी माझी ओळख नाही तरीही विचारतो , घरचे लोक काही बोलत नाहीत ? त्यांना काही सांगत नाहीस ? ”
पंतांनी विचारलं .
तो हसला .
अगदी कोडग्यासारखा .
” मी घरात असेन तर सांगणार ना ?”
” म्हणजे ? ”
” मला माझं घर आठवतच नाही . माझी माणसं , नातेवाईक आठवत नाहीत . म्हणजे कधीतरी सगळं आठवतं . मग जातो घरी . कुणीतरी हातात जेवण आणून देतं . माझ्याशी कुणी बोलत नाही . सगळ्यांच्या कपाळावरच्या आठ्या मला स्पष्ट दिसतात . मी बघतो आणि सोडून देतो . माझी मुलगी तेवढी विचारपूस करते . अंदाजाने मोबाईलचा रिचार्ज मारते . घरी गेलो की बरेचसे पैसे खिशात ठेवते .मला आठवत नाही पण बहुतेक मी तिला एटीएम चे कार्ड दिले असावे . ती मुलगी लाडकी असावी बहुधा माझी . पण तिचे नाव आठवत नाही . बायको जिवंत असावी बहुधा , कारण भिंतींवर तिचा किंवा माझा हार घातलेला फोटो दिसत नाही . घरात बरीच माणसं दिसतात , लहान मुलं दिसतात . पण कुणाची ते आठवत नाही . कदाचित माझीच असावीत नातवंडं . आणि तुम्हाला सांगतो , मला भरपूर सन्मान मिळाले असावेत . भरपूर पैसे मिळाले असावेत पण कुणी दिले ते आठवत नाही . पैसे , मानसन्मान याचा विचार करण्यात रात्र संपून जाते . झोपच लागत नाही . सुरवंट मेंदूला कुरडत असावेत . मला काहीतरी होतंय असं वाटत राहतं. पण कुणाला सांगावं ते कळत नाही . घरातले सगळे मेले किंवा माझ्या वागण्यानं आत्महत्या केली असावी . मग मी मन कुणाजवळ मोकळं करणार ? मग मी सेल्फी काढतो . माझा मलाच न्याहाळतो . सोशल मीडियावर टाकतो . आणि पुन्हा पुन्हा चेक करतो कुणाच्या कमेंट्स आल्या आहेत का ? पण सगळे बिझी असतात . माझ्यासारख्या महान व्यक्तीला डावलणाऱ्या लोकांच्या मेंदूत केमिकल लोच्या झाला असावा . तुम्ही म्हणाला महान कसा , तर परवा दिल्लीतून मला फोन आला . कुणाचा माहितेय ? कुणाचा बरं ? आणि तुम्ही कोण ? मी तुमच्याशी का बोलतोय ? मला तुमचा फोन नंबर देता का ? फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकतो .आणि व्हॉटसॲपला ॲड करून घेतो . आणि हो मी वेडा नाही . व्यवस्थापकीय संचालक होतो मी कंपनीत . गैरसमज करून घेऊ नका . ”
बोलता बोलता त्याने पुन्हा मोबाईलवर स्क्रोल करायला सुरुवात केली .
तरीही तो अखंड बोलत होता . संदर्भ घेऊन . संदर्भाशिवाय . अनाकलनीय .

अचानक तो निघाला . पंत बघत बसले . आणि दहा पावलं चालल्यावर काहीतरी आठवण झाली तसा तो पाठी फिरला . खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढलं .
” हा माणूस आणि त्याच्या नावाखालचा पत्ता तुम्ही शोधून काढू शकाल का ? मी त्याला ओळखतो . पण आत्ता तो कुठे असेल ते सांगता यायचे नाही . जरा त्याच्या घरी जाऊन येतो . ”
” तुमचं नाव काय ? ” पंतांनी विचारलं . त्यानं नाव सांगितलं . त्याने दिलेले कार्ड पंतांनी नीट पाहिले . त्या कार्डावर त्याचेच नाव होते .
त्याला हे सांगण्यासाठी त्यांनी मान वर केली .
तो माणूस समोर नव्हता . झपाझप चालत निघाला होता .
पंतांनी एकदा कार्डाकडे नजर टाकली आणि त्या जाणाऱ्या माणसाकडे पाहिलं .
दिशांचं भान नसणाऱ्या आणि अनोळखी वाट दिसल्यावर चाचपडत जाणाऱ्या माणसासारखा वाटला तो.
त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिलं .

आता त्यांच्या मेंदूत केमिकल लोच्या निर्माण होऊ लागला .
सत्तरीतल्या सुशिक्षित माणसाची मोबाईलच्या वेडाने केलेली दैना बघून त्यांना गलबलून आले .
त्यांनी डोळे टिपले .

इतक्यात फोन वाजला . स्क्रीनवर इन्स्पेक्टर शर्मा असं नाव दिसलं .

” दहा मिनिटात येतोय मी . ”
त्यांनी सांगितलं आणि समोरच्या रिक्षाला थांबवलं .
हॉस्पिटलचा पत्ता सांगितला .
आणि त्यांनी डोळे मिटून घेतले .

नजरेसमोर अजूनही त्यांच्याच वयाचा पण मेंदूचा लोच्या झालेला ‘तो ‘ माणूस उभा होता .

( वास्तवात घडत असलेली तुमच्या आमच्या अवतीभवतीची कथा !)
——-
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..