मराठी किंवा हिंदी चित्रपट संगीतात अनेक संगीतकारांनी लोकसंगीताचा वापर मोठ्या कल्पकतेने करून घेतला आहे. ज्या संगीतकारांनी चित्रपटातील गाण्यांना लोकसंगीतातील ठेका किंवा संगीत वापरले ती गाणी अमाप लोकप्रिय झाली. एवढेच नव्हे तर अनेक वर्षानंतर आजही अशी गाणी लोकप्रिय असून त्या गाण्यांवर रसिकांचे पाय थिरकायला लागतात. पहाडी आवाजासह गाण्याच्या वेगळ्या शैलीमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली.
‘ऐका सत्यनारायणाची कथा’, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी आणि शिंदे यांची इतर गाणीही सार्वजनिक उत्सवांमध्ये हमखास वाजवली जातात. विशेषतः ग्रामीण भागात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली गाणी हमखास वाजतात. आजच्या ‘गीतगणेश’मध्ये शिंदे यांनी गायलेल्या ‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे’ या गाण्याविषयी. हे गीत हरेंद्र जाधव यांनी लिलिले आहे. त्याचे संगीत मधुकर पाठक यांचे असून ते गायले आहे अर्थातच प्रल्हाद शिंदे यांनी.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडपांमधून किंवा गणपतीच्या आगमन विसर्जन मिरवणुकीच्या वेळी बँड, ढोल ताशा किंवा डीजेकडून वाजविल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याचा समावेश असतो. अनेक वर्षानंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. गाण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य भक्ताच्या मनातील भावना गीतकार हरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे.
गाण्यात कठीण शब्द अजिबात नाहीत. सर्वसामान्यांचे जगणे,
ते करत असलेली गणपती बाप्पाची भक्ती आणि गरिबांची व्यथा, त्यांच्या मनातील संवेदना जाधव यांनी गाण्यातून व्यक्त केली ब आहे. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा गणपतीचा भक्त त्याची व्यथा गणपतीकडे मांडतो आहे आणि हाच गणपती बाप्पा आपल्याला सुखाचे दिवस नक्कीच दाखवेल असा आशावादही त्याच्या मनातून व्यक्त होत आहे.
‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’ हे लोकगीत असून लोकगीतामध्ये असलेला विशिष्ट संगीताचा ठेका, उडती चाल आणि गाणे ऐकायला सुरुवात केल्यानंतर आपल्याही नकळत ताल धरायला लावणारी आपली पावले हे यश संगीतकार मधुकर पाठक आणि आपल्या पहाडी आवाजाने या गाण्याला लोकप्रिय करणारे प्रल्हाद शिंदे यांचे आहे.
हे संपूर्ण गाणे असे-
तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा।।धृ।।
पहा पुरे झाले एक वर्ष, वर्षाने होतो एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो स्पर्श, घ्यावा जाणुनी परामर्ष
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची वाचावी कशी ही गाथा।।१।।
पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ
गूळ, फुटाणे, खोबरं नी केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ
कर रक्षण आणि भक्षण, तूच पिता आणि तूच माता ।।२।।
नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
‘डाक लहाल ओळख साऱ्या घराचे, कधी येतील दिवस सुखाचे
सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आशिर्वाद आता ।। ३ ।।
-शेखर जोशी, डोंबिवली
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मध्ये प्रकाशित झालेला श्री शेखर जोशी यांचा हा लेख)


Leave a Reply