नवीन लेखन...

आयुर्वेदाची आजाराचा विचार करण्याची पद्धत

आयुर्वेद शास्त्रात मनुष्य शरीर , त्यात उत्पन्न होणारे रोग , त्याची चिकित्सा याचा विचार फार वेगळ्या पद्धतीने केला गेला आहे . वेगळे मी एवढ्यासाठीच म्हणीन की , आताची आपली जीवन शैलीच फार बदलली आहे ; त्यामुळे आपल्याला हा विचार वेगळा वाटण्याची शक्यता आहे . नाहीतर आयुर्वेद खरंतर नैसर्गिक पद्धतीची जीवनशैली सांगतो. व्याधी म्हणजे रोग याचा फारच खोलवर विचार केला गेला आहे . जे आपल्या शरीरात दुःख निर्माण करते व जे आपल्या मनाला अस्थिर करते अशा कोणत्याही कारणास व्याधी म्हणायला पाहिजे . अर्थात याचा विचार शास्त्रीयदृष्ट्याच केला आहे

शरीराच्या स्वस्थ अवस्थेचा विचारही खूपच सूक्ष्म आहे . आपले शरीर हे त्रिदोष , सप्तधातू , तीन मल , दश इंद्रिये , मन व अनेक मर्मस्थानांनी बनले आहे . वात , पित्त व कफ हे आपल्या शरीराचा आधारस्तंभ असून त्यानेच आपल्या शरीराचा सर्व व्यवहार चालतो .

रस , रक्त , मांस , मेद , अस्थी , मज्जा व शुक्र हे सात धातू असून शरीर घडणे , टिकणे हे सर्व या धातूंवरच अवलंबून असते .

अगदी शरीरातून बाहेर टाकले जाणारे मल , मूत्र , घाम हे देखील शरीर स्वस्थ ठेवण्याचेच काम करते . रोज पोट साफ नाही झाले तरी किती त्रास होतो हे सर्वांना माहीतच आहे .

आपली कर्मेंद्रिये म्हणजे जी काम करण्यास साहाय्यक असतात जसे हात पाय ! यांनी व्यवस्थित काम करणे आवश्यकच आहे , नाही का ?

डोळे , जीभ , कान , नाक , त्वचा ही ज्ञानेंद्रिये ! म्हणजे ज्याच्यापासून ज्ञानप्राप्ती होते , ते ही नीट काम करायलाच पाहिजेत .

वरील या सर्व शरीरातील घटकांचे काम जेव्हा नीट चालत असेल तेव्हाच आपण अगदी हेल्दी आहोत असे वाटते . नाही तर शारीरिक पातळीवर अस्वास्थ्य जाणवतेच .

याचबरोबर आपले मनही ठीक असणे अतिशय महत्त्वाचे आहे . अति ताण , असमाधान , निराश वाटणे , एकाग्रता न होणे , चिडचिड या सर्व त्रासाने शारीरिक दृष्ट्या स्वस्थ माणूसही गांजून जातो . त्यामुळे आपले मन ( यातच विचारशक्ती , बुद्धी सगळे आले ) स्वस्थ असणे देखील आवश्यकच आहे .

तसेच आपला आहार , झोपणे , काम करण्याची पद्धत याचाही आपल्या शरीरावर फार मोठा परिणाम होत असतो .

यामुळेच आयुर्वेदामध्ये जेव्हा एखाद्या रोगाचा विचार केला जातो तेव्हा वरील सर्व व इतरही अनेक मुद्दे विचारात घेऊनच तो रोग ठरवणे , त्याची कारणे शोधणे व मग त्याची चिकित्सा करणे , हे सर्व केले जाते . मग चिकित्सा करताना देखील या माणसाने काय खावे , किती झोपावे , किती व्यायाम करावा , काम कसे करावे याचा सल्ला हा औषधाइतकाच महत्त्वाचा असतो . यामुळेच आयुर्वेदातील सल्ला हा त्या रोगापुरता न ठरता आपल्याला कायमचा उपयोगी पडणारा ठरतो . कारण आयुर्वेद तुम्हाला केवळ ” ताप आला , हे औषध घ्या बरे व्हाल ” असे सांगत नाही तर तो तुम्ही यापूर्वी काय चुकीची जीवनशैली होती हे सांगतो व त्याबरोबरच यापुढे तुम्ही काय केलेत तर स्वस्थ रहाल हे देखील सांगतो .

हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की , आयुर्वे द शास्त्रानुसार आपल्याला होणारे रोग , त्यांचे निदान व ते परत होऊ नयेत या सर्वाचा विचार केला जातो .

शरीरात कोणकोणत्या प्रकाराने व्याधी होतात याचा विचार केल्यास खालील मुद्दे येतात. शरीराचा आधार असणारे तिन्ही दोष , सात धातू , तीन मल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चढ – उतार , असमानता , योग्य कार्य न घडणे या प्रकारचे बदल झाल्यास रोग निश्चित होतो .

म्हणजेच त्रिदोष बिघडल्यास शरीर अस्वास्थ निर्माण होते . यालाच आम्ही निज रोग म्हणतो . मग आपल्याला सगळेच रोग हे यामुळे होतात का ? नाही . काही रोग आगन्तुज म्हणजे बाहेरून शरीरावर आक्रमण करणारे असतात म्हणजेच infection म्हणू शकतो . पण हे रोग काही जणांमध्ये तीव्र स्वरूपात आढळतात तर काही जणामधे अगदी सौम्य लक्षणे दिसतात . असे का होते याचा विचार केला गेला पाहिजे . टीबीच्या जंतूंची संख्या हवेत भरपूर असते पण सगळ्यांना टीबी होत नाही . याचे कारण आधुनिक शास्त्रानुसार आपली प्रतिकारशक्ती हे दिले जाते .

आयुर्वेदात याचा विचार अगदी , आपल्या जन्मापासून केला जातो . आपल्या मातापित्यांमध्ये जर अनेक विकृती असतील , धातूंचे प्रमाण ( रस , रक्त , मांस इ . ) अयोग्य असेल तर त्याचा परिणाम बालकावर निश्चितच होतो व त्यामुळे जन्मतः त्या बालकात एखादा अवयव नाजुक बनतो . उदाहरणार्थ काही बाळांमध्ये सर्दी , खोकला अति प्रमाणात होण्याचे दिसून येते . त्यांची श्वसनवह संस्था काहीशी नाजुक असल्याचे आढळते . ज्यामुळे त्यांना वारंवार रोग होतो . यालाच खवैगुण्य म्हणतात व अशा रुग्णाला सामान्य रूग्णापेक्षा वेगळ्या प्रकारची चिकित्साच उपयोगी पडते व अशा रुग्णांना जेव्हा श्वसनवह संस्थेचा विकार होतो तो बरा होण्यास ही त्रासदायक असतो . त्यांना केवळ औषधाने बरे न वाटल्यास मग पंचकर्मासारख्या चिकित्सेची आवश्यकता भासते .

पण मग जेव्हा बाहेरून रोगाचे आक्रमण शरीरावर होते अशा वेळेस आपण काय करणे अपेक्षित आहे ?

आपण आपल्या शरीराची शक्ती वाढवणे अपेक्षित आहे व तिचा विचार आयुर्वेदात खूपच विस्तृत स्वरूपात केलेला आढळतो .

प्रत्येक माणूस एक विशिष्ट दोषावस्था घेऊन जन्मलेला असतो . कारण हे कफ , पित्त व वात तिन्ही दोष शरीरात स्वस्थावस्थेतही असतातच . तर त्यांची स्वस्थावस्था बिघडू न देणे हे आपल्या हातात असते . योग्य वैद्याकडून आपण आपली प्रकृती म्हणजे शरीरात असणाऱ्या दोषांची उपस्थिती जाणून घेऊ शकतो . मग आपण जेव्हा निरोगी असतो अशा वेळेसच आपण योग्य त्या औषधी चिकित्सा , पंचकर्म व योग्य आहार याद्वारे आपले शरीर आणखी बलवान बनवण्याचा प्रयत्न करू शकतो . यामध्ये केवळ त्रिदोषच नाही तर सर्व सात धातू , मल या सर्वाचा विचार करावा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा , जसे दमट हवा , उष्ण हवामान याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो . तसाच ऋतुनुसार बदलणाऱ्या हवेचा परिणाम देखील शरीरावर होतो . मग शरीरामध्ये अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते . उदाहरणार्थ अचानक ऑक्टोबर हिट सुरू होते व आपल्या शरीरावर त्या उष्णतेचा परिणाम होऊन अनेकांना मूत्रदाह होतो . मग जर आपल्या प्रकृतीनुसार आपणास ह्या रोगाचा त्रास होण्याची जास्त शक्यता आहे हे आपल्याला माहीत असेल तर आपण औषधे व पंचकर्म ऑक्टोबर हिट चालू होण्याआधीच चालू केली तर हा रोग निश्चित टाळता येऊ शकतो .

सांधेदुखी हा थंडीत वाढणारा त्रास. आपण थंडीच्या आधीच जर यावर पंचकर्म चिकित्सा केली तर हा त्रास असह्य होण्यापासून निश्चित सुटका होऊ शकते .

रोग जे बाहेरील जंतू , कीटाणूंमुळे होतो तो का ?
कारण ते जंतू , कीटाणू आपल्या शरीरात वाढण्यासाठी ते आपल्या शरीरात निर्माण झालेली दोषाची विकृत अवस्था होय . उदाहरणार्थ जेव्हा आपण कफ वाढण्याच्या काळामध्ये पथ्य पालन केले नाही ; जास्त कफ निर्माण होऊन तो घशात येऊ लागला तर अशा वेळेस जंतूंनी होणारा खोकला आपल्यावर सहज हल्ला करू शकतो व मग खूप त्रासदायक अशा खोकल्यास सामोरे जावे लागते .

म्हणूनच आपल्या शरीरात जे आपल्या आहाराने , कामाच्या स्वरूपाने , ऋतूमुळे दोषांचे चढउतार होतात , विकृती निर्माण होतात त्यांची काळजी घेणे , ते योग्य अवस्थेत ठेवणे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे .

आहार , व्यायामासह योग्य निद्रा म्हणजे झोप हा ही दोष योग्य अवस्थेत रहाण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे . सध्याचा काळात योग्य वेळी झोपणे हे विसरून गेल्यासारखेच आहे . अयोग्य वेळी , भरपूर पोटभर जेवून लगेच झोपणे , अति झोपणे वा कमी झोपणे या सर्वामुळे शरीरात वात , पित्त विकृती निश्चितच होते आणि हे वारंवार घडत राहिले तर मग त्यातून आम्लपित्त , शिरःशूल सारखे आजार निर्माण होतात .

काही रोग असाध्य समजले जातात , जसे कर्करोग . हा रोग जरी असाध्य समजला जात असला तरी तज्ज्ञ टिकणारे चांगले आरोग्य आपल्यापासून कधीच दूर जाणार नाही .

वैद्य. अर्चना देसाई
सुश्रेया पंचकर्म आणि आयुर्वेदिक ब्युटी क्लिनिक
मुलुंड (पू.)
९८९२०३५०१३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..