नवीन लेखन...

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-अ

पुनर्भेट : आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : (जागतिकीकरणाबद्दल एक चिंतन) : १९९३ 

भाग-१-अ

प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या  ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट  प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.


भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्‍पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्‍वेच्‍छेने पत्‍करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्‍कृतिक आहे हे किती लोकांच्‍या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्‍हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ?

ऐतिहासिक पार्श्वभूमी :

  • प्रथम आपल्‍या इतिहासाचं उदाहरण घेऊं. भारताला शिकंदराच्‍या स्‍वारीपूर्वीचा इतिहासच नाहीं असं अनेक पाश्चिमात्त्य विद्वानांनी १८व्‍या व १९व्‍या शतकांत आग्रहान प्रतिपादन केलं. आमचा इतिहास अगदी फारफार तर बुद्धापर्यंत पोचविला.
  • शिकंदराच्‍या स्‍वारीचा उल्‍लेख कुठल्‍याही भारतीय वाङ्मयांत मिळालेला नाहीं याचा अर्थ असाही असू शकतो की भारताच्‍या दृष्‍टीने त्‍या स्‍वारीला महत्त्व नव्‍हतं . या खंडप्राय अजस्र देशात अनादि काळापासून असे कितीतरी हल्‍लेखोर आले आणि गेले. प्रत्‍येकाचा उल्‍लेख कोण करणार? ग्रीकांच्‍या दृष्‍टीनें , व म्‍हणूनच अत्‍याधुनिक युरोपियनांच्‍या दृष्‍टीनें, शिकंदर हा जगज्‍जेता होता . पण तत्‍कालीन ज्ञात जगताच्‍या कितीतरी मोठ्या भागाला त्‍याचा अल्‍प स्‍पर्शही झाला नाहीं हें ऐतिहासिक सत्‍य आहे. भारताच्‍या कोपर्‍याला त्‍याचा अल्‍प स्‍पर्श झाला इतकेंच , पण भारतात मात्र त्‍याची कोठेही डाळ शिजली नाही. मगधाच्‍या सामर्थ्‍याची कीर्ती ऐकून शिकंदराच्‍या सैन्‍याला भय वाटलें , सैनिक विद्रोहाला सिद्ध झाले, तेव्हां शिकंदराला मागे फिरावं लागलं. लहान लहान गणराज्‍यांनीही त्‍याच्‍याशी जबर लढा दिला. भारत जिंकायचं त्‍याचं स्‍वप्‍न साकार होऊ शकलं नाहीं, हे तत्‍कालीन ग्रीक इतिहासकारांच्‍या वृत्तान्‍तावरून स्‍पष्‍ट दिसतं.

-शिकंदराच्‍या भारतभेटीचा व तत्कालीन भारताचा उल्‍लेख ग्रीक इतिहासकार करतात तेव्‍हा भारतीय राजा ‘सँड्रॉकॉट्टस्’चं नाव पुढ येतं. १७९३ साली विल्‍यम जोन्‍सनें असं मत मांडलं की हा सँड्रॉकॉट्टस् म्‍हणजेच चंद्रगुप्त मौर्य होय. या सिद्धांताचं काही विदेशी व भारतीय विद्वानांनी त्‍यावेळीच व नंतरही खंडन केलं.  १८५९ मध्‍ये मॅक्‍समुल्‍लरने या सिद्धान्‍ताला भारतीय इतिहासाच्‍या कालक्रमाचा  ‘मूलाधार’ ( शीट एँकर ) असं नांव देऊन दुजोरा दिला व तेव्हांपासून तोच भारतीय इतिहासाचा पाया मानला जाऊं लागला. पुढे व्हिन्‍सेंट स्मिथनेंही तीच ‘री ओढली’. आजही आपला इतिहास त्‍याच सिद्धान्‍तानुसार लिहिला जातो, शिकवला जातो.

-खरं तर, पं. भगवद्दत्त, तेलंग, त्रिवेदी व इतर विद्वानांनी अभ्‍यासपूर्वक सँड्रॉकॉट्टस् म्‍हणजे चंद्रगुप्त मौर्य हा सिद्धांन्‍त खोडून काढला होता व भारतीय वाङ्मयातील पुरावे दाखवून आपल्‍या संस्‍कृतिचं प्राचीनत्‍व सिद्ध केलं होतं. पण पारतंत्र्याच्‍या त्‍या काळात ते अरण्‍यरूदनच ठरलं.

  • भारत स्‍वतंत्र झाला तेव्हां आपल्‍याला, आपल्‍या इतिहासाचा पुन्‍हा अभ्‍यास करून, जुने सिद्धांत पारखून, आपल्‍या संस्‍कृतिचं प्राचीनत्‍व सिद्ध करण्‍याची अमूल्‍य संधी आलेली होती. कोटा वेंकटचलम वगैरे विद्वानांनी तशा विनंत्‍याही केल्‍या होत्‍या. पण आपली बौद्धिक गुलामगिरी संपली नव्‍हती. १००-१५० वर्षांपूर्वीचे सिद्धांत पारखून पहायची, खोडून काढायची, कोणाला गरज वाटली नाही.

– वस्‍तुतः पुराणांमध्यें भारतीय राजवंशांच्‍या वंशावळी दिलेल्‍या आहेत. व त्‍या महाभारताच्‍या युद्धापासून सुरूं होतात. इक्ष्‍वाकूपासून महाभारतापर्यंतची वंशावळही आढळते. या वंशावळींनुसार कालगणना केली असतां आपला इतिहास फार प्राचीन ठरतो. भारतीय संस्‍कृती एवढी प्राचीन असूं शकते यावर तत्कालीन पाश्चिमात्त्य विद्वानांचा विश्वासच बसला नाही कारण ते युरोपियनांचे वंशश्रेष्‍ठत्‍व मानत होते. त्‍यामुळे त्‍यांनी पुराणांमधील पाठभेदावर व माहितीतील भिन्नतेवर अतिरिक्‍त भर दिला व स्‍वतःला सोईस्‍कर असे अर्थ व पाठ स्‍वीकारले. वेगवेगळ्या पुराणांमध्यें दिलेल्‍या काही वंशावळींत भेद आहेत खरे; पण असे भेद मौखिक प्रसारात अथवा हाताने प्रतिलिपी लिहितांना येणे स्‍वाभाविक आहे. पण केवळ त्‍यामुळेच पुराणांमधील सर्वच माहिती अविश्वसनीय ठरत नाही.

– अनेक पुराणें मध्‍ययुगात, म्‍हणजे बर्‍याच नंतरच्‍या काळात लिहिली गेली म्‍हणून त्यांतील माहिती विश्वसनीय नाहीं असें कांहीं विद्वान प्रतिपादतात. पुराणातील माहिती विसंगत आहे, पुराणें अतिशयोक्‍त वर्णनें करतात म्‍हणून ती विश्वासार्ह नाहीत असाही एक मुद्दा पुढे केला जातो. पण आपण हे ध्‍यानी घेऊ इच्छित नाही की विसंगत असोत वा नसोत, अतिशयोक्‍त असोत वा नसोत, परंतु वंशावळी देण्यांमागला पुराणांचा उद्देश इतिहासवर्णन हाच होता. पुराणें रचणारांपुढे जुन्‍या पोथ्‍या व इतर मौखिक माहिती असलीच पाहिजे कारण त्‍याशिवाय त्‍यांना विविध राजवंशांच्‍या अनेक पिढ्यांची माहिती देताच आली नसती. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे अगदी अलीकडल्‍या काळापर्यंत छपाईचं तंत्र भारतात अवगत नव्‍हतं व दळणवळणाची सुलभताही नव्‍हती. अशा परिस्थितीत आपल्‍या हाती आज उपलब्‍ध असलेल्‍या पुराणांच्‍या हस्‍तलिखित प्रतिलिप्‍यांमध्यें कांहीं त्रुटी असणें स्‍वाभाविकच आहे.

– भांडारकर प्राच्‍यविद्या संस्‍थेनें अनेक वर्षें खपून अभ्‍यासपूर्वक प्रसिद्ध केलेल्‍या महाभारताच्‍या ‘अधिकृत’ प्रतीमध्‍ये  (क्रिटिकल एडिशन) अजूनही काही दोष राहिलेले आहेत पण त्‍यामुळे त्‍या कार्याचें व त्या प्रतीचें महत्त्व कमी होत नाहीं . त्‍या मार्गावरील तो एक महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे व अभ्‍यासकांना आता तिथून पुढे जायचं आहे . त्‍याच प्रकारें, पुराणांची ‘अधिकृत’ प्रत तयार व्‍हायला हवी व तौलनिकरीत्या पुराणांमधील वंशावळींचा नव्‍यानें ऐतिहासिक अभ्‍यास व्‍हायला हवा. त्‍याचप्रमाणें, वैदिक परंपरेतील साहित्‍याचा, बौद्ध व जैन परंपरेच्‍या वाङ्मयाचा तुलनात्‍मक अभ्‍यास होऊन त्‍यातून भारताचा खरा इतिहास लिहिला जायला हवा.

– मॅगेस्‍थनीजनें लिहिलेल्‍या वर्णनांना स्‍ट्रॅबो इत्यादी जुने इतिहासकारही अविश्वसनीय ठरवतात. तरीही आम्‍ही मॅगेस्‍थनीजवर आंधळा विश्वास ठेवतो. ‘पेरिप्‍लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ हा ग्रंथ तर जणू भारतीय इतिहासाचा मूलाधार असल्‍याप्रमाणे त्‍याच्‍या शपथा वाहतो , पण तो अतिशय विस्‍कळित स्‍वरूपात आणि पुराणांप्रमाणेच सदोष आहे हें विसरतो. आपली पुराणें मात्र आम्हांला फक्‍त भाकडकथाच वाटतात. त्‍यांचा उपयोग इतिहास संशोधनासाठी करून घ्‍यावा असे आमच्‍या विद्वानांना वाटत नाही. How sad !

(पुढें चालूं )

— सुभाष स. नाईक

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..