नवीन लेखन...

वास्तुविशेषांक

दैनिक रोजची पहाट’चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट’ चे मुख्य वार्ताहर. ‘वेष असावा बावळा परि अंतरी नाना कळा’ असा अवलिया. ज्यांच्या मुलाखती घेण्याच्या कौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि रोजची पहाट दाखवणारा ‘रवी’ यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव ताकसांडे, पण त्यांच्या एका पूर्वजाने एका दमात दहा हंडे दही न थांबता घुसळले आणि त्या प्रयत्नात शेवटी दमून त्यांच्या हातून रवी सांडली तेव्हापासून त्यांचे घराणे ताकसांड्याचे रवीसांडे झाले! (जिज्ञासूंनी ताकसांडे-रवीसांडे घराण्याचा इतिहास, प्रकाशक ‘पहाटप्रेस’ पहावा) अर्थात ताकसांड्याचे रवीसांडे कसे झाले याचा आजच्या कथानकाशी तसा काही संबंध नाही. पण सहज ओघात आले म्हणून उल्लेख केला एवढेच! तर सांगायचा मुद्दा, सूर्याजी रवीसांडे काका सरधोपटांची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. तोच काका प्रवेश करते झाले!

“काय काका? केवढा हा उशीर? या रविवारी आपला खास वास्तुविशेषांक काढायचा आहे हे विसरलात?”

“छे! छे! कसा विसरेन? या क्षेत्रातील चार महान वास्तुतज्ज्ञांची नावे आणि त्यांच्या अपॉइंटमेंटस् घेऊनच आलोय. म्हणून थोडा वेळ लागला.”

“मग ठीक आहे. कोण कोण आहेत हे वास्तुतज्ज्ञ?”

‘शंखमणी, शंकर रुद्राक्ष, लहरीनाथ आणि चालू! मोठे मोठे बिल्डर त्यांच्या सल्ल्यासाठी रांगा लावून तिष्ठत बसलेले असतात!”

“अरे वा छान! पण आधी त्यांच्या बिल्डरांकडून जाहिराती मिळवल्या का? आणि हे ‘चालू’ हे काय नाव आहे का?”

“जाहिरातींचे काम पहिले केले. आणि साहेब हे चा लू म्हणजे ‘चालू’ नाही. ते दोन शब्द आहेत. चा आणि लू. म्हणजे ब्रूस ली, यांग लू, लू सांग तसे चा लू!” “अच्छा म्हणजे हे कोणीतरी चिनी किंवा जपानी वास्तुतज्ज्ञ दिसतात. या चिन्यांची पण कमाल आहे बरं का. आता या धंद्यातही घुसले का ते?”

“छे, छे! चिनीबिनी कोणी नाही. आपले मराठीच आहेत. चा म्हणजे चारूहास आणि लू म्हणजे लुकतुके! चा लू! स्वत:ला फेंग शुई तज्ज्ञ म्हणवतात!”

“असू दे, असू दे. बरं आता लागा कामाला!”

जाहिरातींचा मजकूर संपादकांच्या हवाली करून काकांनी गळ्यात धोकटी अडकवली आणि थेट शंखमणींचे ऑफिस गाठले! त्यांचे ऑफिस वरळीला आकाशभरारी या चाळीस मजली भव्य इमारतीच्या तिसाव्या मजल्यावर होते. शंखमणी शंखाच्या आकाराच्या एक ऐसपैस खुर्चीवर बसले होते. त्यांचे टेबलही चार शंखाकृती पायांवर उभे होते. त्यांचा अवतार शंखातून तोंड बाहेर काढणाऱ्या गोगलगायीसारखा दिसत होता.

काकांनी क्षणभरही वेळ न दवडता मुलाखत सुरू केली. कमीत कमी प्रश्न विचारून, कमीत कमी वेळात महत्त्वाची माहिती काढून घ्यायची आणि मग इतर भरमसाठ मजकुराने मुलाखत सजवायची यात काकांचा हातखंडा होता.म्हणूनच एकेका दिवसात चार चार, पाच पाच मुलाखती ते अगदी चुटकीसरशी संपवायचे. असो. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला.

“शंखमणीसाहेब आपले नाव नाविन्यपूर्ण वाटते. ते आपले खरे नाव का व्यवसायानिमित्त घेतले?”

“चांगला प्रश्न. आम्ही प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्या शंखाचे वंशज म्हणून हे नाव धारणं करतो.’

“वा! छान! पण त्याचा ‘वास्तू’ शी काय संबंध?”

“हो आहे तर, आपल्या पुरातन वास्तुशास्त्राची सुरुवातच मुळी शंखनादाने झाली!”

“शंखनादाने? काय सांगता काय? ती कशी झाली?”

“शंखनादाने ज्या लहरी उत्पन्न झाल्या त्यातूनच तर हे शास्त्र संपन्न झाले! आमचे पूर्वज स्वामी शंखनाद यांनी ते ज्ञान ‘शंखपद्’. ‘शंख रत्न’, ‘शंखमणी’, आणि ‘शंखसंभव’, या ग्रंथातून शब्दबद्ध करून ठेवले. त्यात ‘वास्तु’ च्या विविध अंगांचा सांगोपांग विचार केला आहे. तोच वारसा आम्ही चालवतो म्हणून आम्ही शंखमणी!”

“वा! फारच अद्भुत!” या शास्त्राची काय वैशिष्ट्ये? ती आजच्या काळात कशी लागू होतात?”

“काका, पंचमहाभूते आजही आहेत, पूर्वीही होती आणि भविष्यातही राहणार आहेत. ती अखिल विश्वाला घेरून आहेत. त्यांना सांभाळून राहावे लागते. त्यांच्याशी जराही दंगामस्ती चालत नाही. त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवावे लागते. त्यासाठी स्वामी शंखमणी यांनी ‘शंख पद्धती’ म्हणजे ‘शंख थियरी’, शोधून काढली.”

“तिचे आपण थोडक्यात स्वरूप सांगाल का? आणि आधुनिक काळात ती कशी उपयुक्त आहे?”

“काका, मुळात प्राचीन काळ, आधुनिक काळ हे जे आपण म्हणतो ना, ते खरे नाही. काळ हा कधीच पुरातन वा आधुनिक नसतो. ज्याला आपण शंभर वर्षे म्हणतो तो ब्रम्हदेवाचा एक क्षणही नसतो. असो. आपण नेहमी ऐकतो की अमुक तमुक एकाने असे चुकीचे केले आणि आता बसलाय शंख करीत! तसेच लोक या पुरातन वास्तुशास्त्राला विसरून तथाकथित आधुनिक वास्तुशास्त्रज्ञांच्या, ज्यांना आपण आर्किटेक्ट म्हणतो, ज्यांचे ज्ञान पाश्चात्य विद्येच्या उथळ पायावर आधारित असते, त्यांच्या सल्ल्याने इमारती, घरे बांधतात आणि मग पस्तावले की येतात आमच्याकडे शंख करीत!”

 

“त्याचे एखादे उदाहरण देऊ शकाल का?”

“एकच का? शेकडो देता येतील. या अफाट शहरात माझ्या सल्ल्याने इमारती बांधणारे आज शेकडो कंत्राटदार आहेत. ‘आम्ही शंखमणींच्या सल्ल्याने आमची संकुले बांधतो’, असा ते नुसता उल्लेख करतात त्यांच्या जाहिरातीत, तर हातोहात त्यांचे बुकिंग हाऊसफुल्ल होऊन जाते! आणखी काय पुरावा हवा?”

“साहेब, आपले मूळचे शिक्षण काय आणि ‘वास्तु’ मध्ये आपण कुठून पदवी, पदविका घेतली?”

“मी वकील आहे. फावल्या वेळात वकिली करणे पण मुख्य व्यवसाय वास्तु’ ! हा माझा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. त्याचे कुठेही शिक्षण मिळत नाही. पूर्वसुरींचे ज्ञान हेच काय ते खरे शिक्षण. हा महान ठेवा जपणे हे मी माझे आद्यकर्तव्य मानतो.”

“मग कायद्यानुसार नसतो वाटतं आपला सल्ला?”

“कायदा? कसला कायदा? ते कोर्टाचे कायदे वेगळे. इथे मी सांगेन तोच कायदा! विश्वास असेल तर या नाहीतर बसा शंख करीत!” “आपल्या सल्ल्याचा एखादा नमुना सांगाल का?”

“हो सांगतो की, परवाच प्रसिद्ध बिल्डर शेठ चांदीमल यांच्या शंभर इमारतींच्या भव्य  संकुलासाठी शंखयज्ञ संपन्न केला.”

“शंखयज्ञ? ते काय असते?”

“शंखयज्ञ म्हणजे शंखध्वनी करून इमारतीच्या जागेवर चहूबाजूंनी ध्वनीलहरींचा अदृश्य भक्कम पडदा निर्माण करायचा!”

“वा! हे फारच अद्भुत वाटते. ते आपण कसे करता?”

“इमारतींच्या जागेवर चारी बाजूंना काही विशिष्ट अंतरावर आमचे शंखतज्ज्ञ उभे राहतात. एक आठवडाभर त्या जागेवरून अखंड शंखनाद करून शंखनाद लहरींचा अखंड ‘नाद पडदा’, उभा करतात. एकदा का हा पडदा उभा राहिला की कोणतीही अभद्र शक्ती इमारतीला स्पर्श करू शकत नाही! यज्ञ पाहायला (ऐकायला) शेकडो लोक आले. यज्ञाचा प्रसाद खाल्ला. तो ही साधासुधा नाही, पंचतारांकित! आणि जाता जाता बुकिंगही करून गेले! यज्ञ संपला तेव्हा सर्व संकुलाचे बुकिंग पूर्ण झाले! कित्येकांना निराश होऊन परतावे लागले! ज्यांनी बुकिंग केले त्यांना एकेक मंतरलेला शंख फुकट दिला! शिवाय तो फुकायची विशिष्ट पद्धत शिकवली! ‘शंख फुकणे’ आणि ‘शंख करणे’ यातला फरक त्यांना समजावून दिला!

“वा! वा! शंखमणीसाहेब, आपल्या सल्ल्याने शेठ चांदीमल यांची चांगलीच चांदी झाली म्हणावयाचे?”

“होय तर, त्यांनीच खूष होऊन ही आलिशान जागा दिली मला.” एवढ्यात संकटसमयी वाजतो तसा सायरन वाजू लागला. काकांच्या टकलावरचे दोन केस ताठ उभे झाले!

शंखमणींनी शंखहास्य केले. “काका, घाबरू नका. हा आमच्या स्वागतिकेने केलेला शंख इशारा आहे. त्याचा अर्थ आपली वेळ संपली. माझे दुसरे अशील वाट पाहत आहे. या आपण, नमस्ते!”

त्यांचे आभार मानून काकांनी तेथून पाय काढला.

टॅक्सी केली आणि अंधेरीला शंकर रुद्राक्ष यांच्या ऑफिसमध्ये बरोबर एक वाजता जाऊन पोहोचले.

त्यांच्या केबिनबाहेर एक रुद्राक्ष मालामंडित बुवा बसले होते. तो हसून म्हणाला, ‘वत्सा कोण हवंय तुला?”

“मी काका सरधोपट. शंकर रूद्राक्षांची मुलाखत घ्यायला आलोय.’

“हो का? जा आत ते आपलीच वाट पहात आहेत.”

काकांनी चेंबरमध्ये प्रवेश केला. शंकर रुद्राक्ष अगदी अपटुडेट पोशाखात, सूट, बूट, टाय घालून बसले होते. फक्त एकच वेगळे होते ते म्हणजे खांद्यापर्यंत रुळणारे लांब केस! त्या केसांच्या त्यांनी छोट्या छोट्या वेण्या घातल्या होत्या. त्या जटांसारख्या लोंबत होत्या. त्या प्रत्येक वेणीच्या टोकाला एक रुद्राक्ष लावला होता! बोलताना मान हलली की शंकराच्या डमरूतील लोलकाप्रमाणे त्या वेण्या हलत होत्या! काकांनी पहिला प्रश्न विचारला.

“शंकर रुद्राक्ष आपण कोणते वास्तुशास्त्र शिकलात? या शास्त्राचे शिक्षण कोठे मिळते? किती वर्षाचे असते?”

“काका, हे ज्ञान विद्यापीठात मिळत नाही. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जंगलात हिंडून, निसर्ग निरीक्षण करून, थंडीवाऱ्यात प्रचंड तपश्चर्या करून, हिमालयात भगवान शंकरांची आराधना करून हे ‘रुद्रवास्तुज्ञान संपादन केले. अखिल मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी ते ‘रुद्रमंडलम्’ या बृहत् ग्रंथात ग्रंथित केले. त्या थोर वारशाचे आम्ही पुनरुज्जीवन केले।

“ते ठीक आहे. त्यासाठी आपण काही संशोधन करून काही नवीन अभ्यासक्रम बनविला आहे का? त्याला शासनाची मान्यता घेतली असेलच?”

“छे! छे! त्याला कशाला हवी आहे मान्यता? अहो तो आपला स्वयंभू पुरातन वारसा आहे एवढे पुरेसे नाही का? आपण आपल्या वर्तमान पत्रात रोज भविष्य छापता. ते लिहिणारे कोणत्या विद्यापीठाचे पदवीधर असतात? नाही ना? तसेच आहे हे, हा विश्वासाचा मामला आहे.’

“बरे असो. या रुद्रमंडलानुसार आपण काय सल्ला देता?”

“रुद्रमंडलात मुख्यत्वे पाच तत्वे सांगितली आहेत. ती म्हणजे माती, दगड, दिशा, वारा-जल, वृक्ष आणि अग्नी. याचा विचार करून आम्ही सल्ला देतो.”

“तो कसा?”

“मातीची चव घेऊन आम्ही घरातल्या फरशा कशा असाव्या हे सांगतो. दिशा, वारा, पाऊस, जल या तत्त्वांनुसार घराची दारे, खिडक्या कुठे, केवढ्या असाव्यात ते सांगतो. पाण्याचे माठ, लोट्या, पेले, पिंप यांच्या जागा ठरवतो. गच्चीत, बाल्कनीत आजूबाजूला वड, पिंपळ, आंबा वगैरे मोठमोठे वृक्ष कुठे लावायचे ते सांगतो. अग्नी पेटवून त्याच्या धुराच्या दिशेवरून गॅस शेगड्या, हीटर, गिझर, इस्त्री, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी अग्निजन्य उपकरणे कुठे असावीत याचे मार्गदर्शन करतो.”

“अग्नी कसा पेटवता?”

“काडी ओढून! काडी ओढून ती भोकाच्या रूद्राक्षासमोर धरून त्या भोकातून धुराची दिशा पाहतो.”

“वा! फारच सूक्ष्म विचार करता आपण!”

“होय तर, शिवाय त्यातूनही समाधान नाही झाले तर आम्ही एक अत्यंत खात्रीशीर सल्ला देतो.”

“असं? तो कोणता?”

“प्रत्येकाला एक रुद्राक्ष माला देतो. सर्व उपाय थकल्यावर ती माला हातात घेऊन पहाटे आणि रात्री झोपण्यापूर्वी स्नान करून ‘रुद्राक्ष नमः!’ हा जप दहा हजार वेळा करायचा. सर्व बाधा हमखास दूर होतात! अहो काका, या आमच्या सल्ल्याने काहीजणांना तर या संसाराचीच उपरती होऊन त्यांनी कायमची कैलासाची वाट धरली! एकदम मोक्षप्राप्तीच!”

“काय सांगता काय? मग घरच्या लोकांचे काय?”

“काका, जो चोच देतो तो चारापण देतोच. शेवटी तर सगळेच भस्मीभूत व्हायचे असते ना? तो योग त्यांना आमच्या सल्ल्याने आयताच येतो! केवढे भाग्य!!”

“होय, होय, खरेच. थोर भाग्यच म्हणायचे त्यांचे! आपले भाग्य फार उज्ज्वल दिसते रुद्राक्षसाहेब! शुभेच्छा!!”

काका मुलाखत संपवून निघाले तसे शंकर रुद्रांक्षांनी त्यांना एक रुद्राक्ष माळ देऊन सल्ला (फुकटचा) दिला. “रोज कमीत कमी हजार जप करा. तुमचे कल्याण होईल. बरे या आता. नमस्कार.”

बाहेर पडल्यावर काकांनी ती रुद्राक्षमाला काऊंटरवरच्या बुवांना घातली आणि ते थेट वास्तुतज्ज्ञ लहरीनाथांकडे पोहोचले.

लहरीनाथ ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची आणि समोरचे टेबल आणि त्या टेबलसमोरच्या खुर्ध्या हे सगळे एका मोठ्या झोपळ्यासारख्या पाटावर ठेवले होते. पाट जमिनीपासून सुमारे सहा इंच वर होता आणि अगदी हळूहळू पुढेमागे हालत होता! काकांनी हळूच एक पाय वर ठेवला आणि एक खुर्ची पकडून ते खुर्चीवर बसले. लगेचच त्यांनी मुलाखत सुरू केली.

“लहरीनाथ ही झोपाळ्याची कल्पना फारच अभिनव दिसते. याचा ‘वास्तु’ शी काय सबंध?”

“काका, ‘वास्तू’ वर सर्व बाजूंनी सर्व काळी सुष्ट आणि दुष्ट लहरींचा मारा होत असतो. या झोपाळ्यामुळे सतत हलत्या लहरी निर्माण होऊन त्या रोखल्या जातात!”

“वा! हे फारच अजब तंत्र दिसते आहे. पण मला सांगा, हे सर्व सामान्यांना कसे परवडायचे?”

“त्यांच्यासाठी फार सोपे उपाय असतात.”

“ते कोणते?”

“या लहरींच्या नियंत्रणासाठी दरवाजे, खिडक्या, भिंती यांना योग्य ठिकाणी आडव्या, तिडव्या फटी पाडाव्या लागतात. ते मी तपासून सल्ला देतो.”

“ते कसे तपासता?”

“त्यासाठी घराची कुंडली, घरातील माणसांच्या कुंडल्या, पशुपक्षांच्या कुंडल्या, उदा. कुत्रा, मांजर, पोपट वगैरे, तपासाव्या लागतात. काही अमानवी शक्तींचा संचार आहे का हे त्यावरून समजते.

“हे फारच अजब वाटते. एखादे उदाहरण देता का?”

“हो देतो ना. परवाच शेठ माणिकचंदानी आले होते. त्यांच्या चाळीस मजली इमारतीवरचा पेंट हाउस फ्लॅट त्यांचे गिहाईक शेठ घिसूमल चांदीमल यांच्या बायकोला पसंत नाही म्हणून शेठ घिसूमल परत करत होते. माझ्या सल्ल्याप्रमाणे काम चालू असूनही असे का झाले म्हणून मला जाब विचारत होते.”

“मग आपण काय मार्ग काढलात?”

“मी त्यांची माहिती तपासली. तेव्हा लक्षात आलं की माणिकचंदानी शेठजींची आणि त्यांच्या बायकोची जन्मतारीखच चुकीची दिली होती! शेठजींनी दिली होती तीन आणि शेठाणींचीही तीन! पण मुळात शेठाणींची होती सहा! म्हणजे छत्तीसचा आकडा! मग भांडण नाही होणार तर काय मुके घेणार?”

“मग? कसा सोडवलात आपण हा तिढा?”

“मी सल्ला दिला की बायकोच बदला म्हणून!”

“काय सांगता? मग बदलली बायको?”

“हो बदलली. म्हणजे दुसरा फ्लॅट घेऊन दिला आणि ठेवलेल्या बायकोला दिले पेंट हाऊस! दोघीही खूष! माणिकचंदानीचाही दुप्पट फायदा झाला!”

“वा, वा! लहरीनाथ आपण महान आहात.” त्यांना शुभेच्छा देऊन काका चार वाजता पेडर रोडवर, चा लू यांच्या मुलाखतीला त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा चा लू यांची चहाची वेळ झाली होती. काकांनाही चहाची गरज होती. मग एका चहाच्या कपावर म्हणजे ओव्हर अ कप ऑफ टी, त्यांनी मुलाखत सुरू केली.

‘चा लू, हे फेंग शुई काय प्रकरण आहे?”

“हे चिनी शास्त्र आहे असे म्हणतात, पण खरे तर ते प्राचीन भारतीय शास्त्रच आहे.”

“काय सांगता?”

“हो ना, फार पूर्वी बौद्ध भिक्षूनी ते चीनला नेले. या पद्धतीने गृहसजावट केली म्हणजे घरात जंगलांची शांतता निर्माण होऊन मन विपश्यना तपश्चर्येसाठी तयार होते आणि अंतिम मोक्षाकडे जायची आत्म्याची तयारी होते. या शास्त्राला त्याचे मूळ स्वरूप आणि पावित्र्य प्राप्त व्हावे म्हणून मी लवकरच अजिंठ्याला ‘फेंग शुई विपश्यना समाधी संस्था स्थापन करत आहे.”

“वा, वा! चा लू आपण हे फारच महानकार्य हाती घेत आहात. आपणास शुभेच्छा! आपल्या सल्ल्याने घरोघरी अजंठा गुहा निर्माण होवोत ही प्रार्थना! धन्यवाद!” काकांनी मुलाखत आटोपली!

वास्तुविशेषांकाची विक्रमी विक्री झाली! पाश्चिमात्य ज्ञानाने शेफारलेल्या आर्किटेक्ट लोकांचे पुरतेच कंबरडे मोडले! त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळावी म्हणून विशेषांक सम्राट’, ‘सूर्याजी रवीसांडे यांनी आता ‘वास्तुशास्त्र आणि आधुनिक आर्किटेक्चर आणि आर्किटेक्ट या विषयावर एक पाचशेपानी दणदणीत विशेषांक काढायची घोषणा केली आहे!

काका सरधोपट मुलाखतीसाठी आणि जाहिरातींसाठी प्रसिद्ध आर्किटेक्टस् आणि ठेकेदार यांची नावे गोळा करत आहेत. इच्छुकांनी त्वरित नावे नोंदवावीत. संधीचा फायदा घ्यावा.

पत्ता – संपादक, रोजची पहाट, वरळी, मुंबई – ४२०४२० (किर्लोस्कर-सप्टें.२००५)

-विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..