नवीन लेखन...

फट् फजिती

‘बावळट, खेडवळ’ अशी बिरुदे घेऊन सासरी ठाण्यात मी प्रवेश केला. शहरात एवढी गर्दी कशी? एवढ्या मोठ्या ट्रेनमधून लोक कुठे जा-ये करतात? नेहमी लग्नाला निघाल्यासारखे, नीटनेटक्या कपड्यात कसे असतात? बायकासुद्धा छान छान साड्या नेसून रोज ऑफिसला जातात. रात्रीसुद्धा दुकानात दिवसासारखा झगमगाट असतो. प्रश्नच प्रश्न. लाइटशी सुद्धा संबंध नसलेल्या मला असंख्य प्रश्न पडायचे. शेजाऱ्यांना विचारायचे तर उत्तरं मिळायची, पण त्याबरोबर बावळट, खेडवळ अशी शेलकी बिरुदंसुद्धा मिरवावी लागायची. वाईट वाटायचं. तेव्हा ठरवलं आता यापुढे आपले प्रश्न आपणच सोडवायचे. उत्तर आपणच शोधण्याचा प्रयत्न करायचा. संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला विचारायची, पण उत्तर मिळणं किंवा न मिळणं त्याच्या मूडवर अवलंबून असायचं.

असेच दिवस जात होते. मी आता काही प्रमाणात शहाणी झाले होते. तरीसुद्धा रोज नवीन प्रश्न, नवीन उत्तरं. काही चुकायची. मग पुन्हा प्रयत्न.

एकदा कॉमन गॅलरीत उभी राहून रस्त्यावरची रहदारी न्याहाळीत असताना अचानक कानावर काही शब्द आदळले, ‘मरतोय मरतोय.’ मी काही चुकीचं ऐकलं असं वाटून मी कान देऊन ऐकू लागले. पुन्हा ‘मरतोय मरतोय’ पुनः पुन्हा ‘मरतोय मरतोय.’

मी आजूबाजूला नजर टाकली. सर्वजण शांतपणे आपापल्या कामात होते. मुलं शाळेच्या लगबगीत होती. लोक ऑफिसला निघाले होते. गृहिणी घरात आपल्या कामात होते. शेजारचे काका शांतपणे पेपर वाचत होते. म्हणजे मी जे ऐकले ते कुणीच ऐकलं नाही? की शहरातल्या माणसांची मनं ‘मुर्दाड, निगरगट्ट, असंवेदनशील’ असतात? मीसुद्धा तशी होईन? आवाज कुठून येत होता कळत नव्हतं. आता थांबला होता. त्याला कुणीतरी मदत केली की त्याचा त्याच अवस्थेत जीव गेला? कोण जाणे. कुणाला विचारण्यात अर्थ नव्हता. मीही थोडी अस्वस्थता मनात ठेवून माझ्या कामाला लागले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. ‘मरतोय मरतोय’ आपण स्वतःच जाऊन गोष्टीचा सोक्षमोक्ष लावावा अशा विचाराने मी निघाले. त्याला काही मदतीची गरज असली तर करावी म्हणून एक पाण्याची बाटली थोडे पैसे बरोबर घेतले. ही यावेळी लगबगीने कुठे निघाली म्हणून शेजारणीने एक तिरपा कटाक्ष टाकलाच. मी पर्वा केली नाही.

मी भराभर चालत आवाजाच्या रोखाने निघाले. मध्येच रस्ता चुकले. पण माझ्या उद्दिष्टाजवळ पोहोचले. आवाज थांबला होता. त्यामुळे पुन्हा संभ्रमित झाले. एक जुनी पुराणी हातगाडी होती. त्यावर तसाच जुना पुराणा लोखंडी मोठा डबा होता. त्यात तसेच जुने पुराणे तुटलेले फुटलेले सामान होते. मी हे प्रथमच पहात होते. मी क्षणभर उभी राहिले. तुटलेलं फुटलेलं, उकिरड्यावर फेकून द्यायचं हे मला ठाऊक होतं. एवढ्यात बाजूला कोणाबरोबर तरी बोलत उभा असलेला गाडीचा मालक आला. ‘ताई काय बघताय.’ माझ्याकडे प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी चालू लागले माझ्या घराकडे. तो आपला गाडी घेऊन आपल्या उद्योगाला निघाला. आरोळी देत.

‘मोडतोड, मोडतोड’.
बरं झालं कुणाला कळलं नाही. नाहीतर मी गावंढळपणाचं आणखी एक पदक घेतलं
असतं. माझ्या गळ्यात शेलक्या शब्दांचा रत्नहारच पडला असता.

– शुभदा देवळेकर

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..