नवीन लेखन...

इंडिया, भारत आणि हिंदुस्थान

आपल्या देशातील लोकसंख्येची स्थिती समुद्रातल्या हिमनगासारखी आहे. त्याचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि नऊ दशांश भाग पाण्याखाली असतो. पाण्याबाहेरचा भाग म्हणजे इंडियात राहणारे लोक आणि पाण्याखालील नऊ दशांश भाग म्हणजे हिंदूस्थानात राहणारे लोकं

गजानन वामनाचार्य यांनी जवळपास १५ वर्षापूर्वी लिहिलेल्या या लेखातील अनेक मुद्दे आजही तसेच तंतोतंत लागू आहेत.


‘सर्वेक्षण’ ही सध्याच्या युगातील अतिशय लोकप्रिय आणि अत्यत आवश्यक अशी शास्त्रीय पध्दत आहे. कोणतीही योजना प्रकल्प उद्योग किंवा कारखाना सुरू करावयाचा असेल तर सर्व संबंधित बाबींचा सारासार विचार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते म्हणजे सर्व्हे घेतला जातो.

दुपारचे जेवण झाल्यावर थोडी वामकुक्षी घेत असतांना दारावरची बेल वाजल्यामुळे जाग येते. दार उघडून बघतो तर एक वीसबावीस वर्षाची तरूणी अदबीने विचारते की एक सर्व्हे घ्यायचा आहे पाच मिनिटांत होईल. तिला ह्या भागातील कुटुंबात कोणत्या ब्रँन्डचे साबण, कपडे धुण्याच्या पावडरी वगैरे वापरले जातात आणि घरात कोणते कपडे धुलाई मशीन्स आहेत ह्याची आकडेवारी जमा करावयाची होती. अशाप्रकारची सर्वेक्षणे करण्यासाठी कंपन्यात स्वतंत्र खाती असतात आणि खास प्रशिक्षण दिलेली माणसे त्यात काम करतात. इतकेच नव्हे तर विशिष्ट प्रकारची सर्वेक्षणे करण्याची सेवा देणार्‍या कंपन्याही आहेत.

आम्हीही एक सर्वेक्षण केले आणि भोवतालच्या नागरिकांना एक प्रश्न विचारला ‘तुम्ही कोणत्या देशात राहता ?’ नागरिकांनी दिलेली उत्तरे आम्ही लिहून ठेवली. नागरिकांची इतर माहिती म्हणजे शिक्षण आर्थिक परिस्थिती घरात असलेल्या सोयीसुविधा कुटुंबियांच्या सवयी छंद वगैरेही नीट लिहून त्या माहितीचे विश्लेषणही केले.

काही थोडया नागरिकांनी सांगितले आम्ही ‘इंडिया’ त राहतो त्यापेक्षा जास्त नागरिकांनी सांगितले आम्ही ‘भारता’ त राहतो आणि बहुसंख्य नागरिकांनी सांगितले आम्ही ‘हिंदुस्थाना’ त राहतो.

विश्लेषणानुसार असे आढळते की इंडियात राहणारे लोक उच्चविद्याविभूषित आणि आर्थिक दृष्टया सधन ह्या वर्गात सामावतात. या लोकांजवळ सगळी अत्याधुनिक उपकरणे असतात. फ्रीज, टीव्ही, टेलिफोन, मोटारी, संगणक वगैरे सगळया अत्याधुनिक सुखसोयी यांच्या सेवेत हजर असतात. यांची मुले खूप शिकलेली असतात त्यांना भरपूर पगाराच्या नोकर्‍या असतात. काहींची मुले आपल्या देशातील शिक्षण पूर्ण करून आणखी उच्चशिक्षणासाठी परदेशात विशेषत: पाश्चिमात्य देशात गेलेली असतात आणि हेही सतत परदेशच्या वार्‍या करीत असतात. पाश्चिमात्य देश आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत तेव्हा तिकडे ज्या काही नवीन सुखसोयी उपलब्ध होतात त्या हे लोक मायदेशी परत येतांना आपल्याबरोबर घेऊन येतात.

भारतात राहणारे लोक कृतीने ‘आपण बरे की आपला व्यवसाय आणि संसार बरा’ अशातर्‍हेने जगतात. लायब्ररीतून पुस्तके आणायची नाटके बघायची भाषणे ऐकायची वृत्तपत्रे वाचतंाना आपल्या पंतप्रधानांनी काश्मिरच्या बाबतीत काय करायला पाहिजे होते? त्यांचे कुठे चुकते आहे? अमेरिकेचे अध्यक्ष बुश यंानी नेमके कुठे बाँम्ब टाकायला पाहिजेत? ओसामा बीन लादेनला कसा पकडला पाहिजे? आपण क्रिकेटची मॅच का हरलो? टीममध्ये कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश करावा आणि कुणाला डच्चू द्यावा वगैरे बाबतीत हे अगदी तज्ज्ञ असल्यासारखे आपले विचार मांडीत असतात आणि एकमेकांशी वादविवाद करीत असतात.

हिंदुस्थानात राहणार्‍या नागरिकांची संख्या खूपच जास्त आहे. ह्यांना भरपूर वेळ असतो आरामात झोपून उठाव आणि सावकाश काम करीत दिवस घालवावा असा यांचा आयुष्यक्रम असतो. हे लोक गणपती, शंकर, देवी, हनुमान यांच्या देवळांसमोर ठराविक दिवशी दर्शनासाठी रांगा लावतात. आज गणपती उद्या शंकर परवा हनुमान अशी यांची देवळे ठरलेली असतात. देवाला नवस बोलून आणि साकडे घालून आपल्या सर्व समस्या सुटतील अशी ह्यांची ठाम समजूत असते. रांगांच्या बाबतीत गणपती मंदीरे आघाडीवर आहेत.

अनेक ठिकाणच्या संतश्रेष्ठींच्या देवळांसमोर तर रोजच प्रचंड रांगा असतात. ह्या संतश्रेष्ठांचे तत्त्वज्ञान आणि शिकवण समजून घेण्यापेक्षा त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो हे सांगण्यातच हिंदुस्थानातले लोक धन्यता मानीत असावेत. इंडियात आणि भारतात राहणारेही बरेच वेळा हिंदुस्थानात येतात.

हिंदुस्थानातील बहुसंख्य जनता प्रत्येक ठिकाणच्या कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने जाते आणि पवित्र कुंडात किंवा नदीसंगमावर पवित्र स्नान करून स्वच्छ होऊन घरी येते. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, मकर संक्रांत काही विशिष्ट पौर्णिमा, अमावास्या वगैरे प्रसंगी हे लोक नदी, तलाव, समुद्र आणि काहीच नसले तर आपले न्हाणीघर ह्यात पवित्र स्नान करून स्वच्छ आणि शुध्द होतात. इंडियात न्हाणीघराला, बाथरूम म्हणतात.

हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे समाजात वैचारिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक वगैरे बाबतीत तफावत असलेले स्तर किंवा गट असतात हा आहे. म्हणून प्रश्न पडतो की प्रगत झालेले विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा वेळोवेळी राबवल्या जाणार्‍या सरकारी योजना समाजाच्या नेमक्या कोणत्या स्तरासाठी उपयोगी ठरणार आहेत ह्याचा कुणी विचार करतो का? २१ व्या शतकातील इंटरनेट वगैरे आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे म्हणजे संगणक पाहिजेच. तो विकत घेण्याची आणि वापरण्याची ज्याची कुवत असेल तोच त्याचा फायदा घेऊ शकेल. सध्या आपण जगातली महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत ते कशाच्या भरवशावर?

आपल्या देशातील लोकसंख्येची स्थिती समुद्रातल्या हिमनगासारखी आहे. त्याचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि नऊ दशांश भाग पाण्याखाली असतो. पाण्याबाहेरचा भाग म्हणजे इंडियात राहणारे लोक आणि पाण्याखालील नऊ दशांश भाग म्हणजे हिंदूस्थानात राहणारे लोक. आपण अत्याधुनिक प्रगती दर्शविणार्‍या सुखसोयी म्हणतो त्या बहुतेक ह्या एक दशांश भागाजवळ असतात. देशातील नऊ दशांश संपत्ती ह्या एक दशांश लोकांकडे असते. आपण आयात केलेले बहुतेक तंत्रज्ञान ह्या लोकांसाठी असते.

प्रगतीच्या नावाखाली अंमलात आणल्या जाणार्‍या योजना समाजाच्या कोणत्या गटासाठी असाव्यात ह्याचा विचार प्रथम केला पाहिजे. एखादे उत्त्पादन बाजारात आणायचे म्हणजे त्याला गिर्‍हाईक कुठे मिळेल? किती किंमतीला त्याला ते परवडेल? ते त्याच्यापर्यंत कसे पोहोचविता येईल? वगैरे बाबींचा विचार त्या वस्तूचा उत्पादक प्रथम करतो आणि नंतरच उत्पादनाला सुरूवात करतो.

आपण औषधाच्या गोळया घेतो तेव्हा कुणीही कोणतीही गोळी घेत नाही जो रोग ज्याला झाला असेल तोच त्या रोगावर उपायकारक असलेल्या औषधाच्या गोळया घेतो. थोडक्यात म्हणजे गरजेला प्राधान्य आहे. एक दशांश भागासाठी कोणत्या योजना उपयोगी पडतील आणि नऊ दशांश भागासाठी कोणत्या? ह्याचा सारासार विचार करूनच कृती केली तर देशाची सर्वांगीण प्रगती होईल. सध्या श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होतो आहे आणि गरीब वर्ग अधिक गरीब.

२९ डिसेंबर २००१ च्या वृत्तपत्रात ‘स्मार्ट स्कूल’ संबंधी आलेले वृत्त बोलके आहे. संगणक शिक्षणासाठी आपल्या देशभरात सुमारे १००० ‘स्मार्ट स्कूल्स’ म्हणजे ‘हुशार शाळा’ स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी भोपाळ येथे सांगितले. या शाळांमधून स्पर्धात्मक कार्यक्षम आणि व्यावसायिक पध्दतीने शिक्षण देण्यात येणार आहे. या शाळा हळुहळू अन्य शाळांना जोडण्यात येणार असून त्या योगे देशभरात संगणकाचे शिक्षण देणार्‍या सुमारे एक लाख शाळा निर्माण करण्याची ही योजना असल्याचे डॉ जोशी ह्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील शाळांमध्ये संगणक शिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘हेड स्टार्ट’ या सॉफ्टवेअरचे प्रकाशन डॉ जोशी यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

इंडियात राहणार्‍या लोकांसाठी एक लाख संगणक शाळा काढण्याची योजना असेल तर हिंदुस्थानात राहणार्‍या लोकांसाठी निदान ५ लाख प्राथमिक शाळा काढून त्यासाठी प्रत्येकी निदान एक तरी प्राथमिक शिक्षक नेमण्याची योजना का असू नये?

भारताच्या स्वातंत्र्य लढयात देशभक्तीची जागृती तळागाळाच्या लोकांपर्यतही पोचली होती. म्हणूनच प्रचंड ताकद निर्माण झाली. जेव्हा समाजातील सर्व स्तरातील वैचारिक, शैक्षणिक आणि आर्थिक दरी म्हणजे तफावत कमी होईल तेव्हाच आपला देश ताकदवान होईल आणि जगातली महासत्ता होण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल. भलेही तो इंडिया असो की भारत असो की हिंदुस्थान !!
— गजानन वामनाचार्य

मूळ प्रकाशन दि. ८ फेब्रुवारी २००२

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..