नवीन लेखन...

‘हूरहूर असते तीच उरी’ – मैफिलीचा हा किनारा !

सगळ्याच “अ ” आणि “अ +” कलावंतांना सदैव त्यांच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार मिळतंच असं नाही. बरेचदा एका चौकटीत आपण त्यांना बसविलं किंवा शिक्के मारले की ते ” पापी पेटके लिए ” क आणि ड दर्जाचे काहीतरी करत असतात आणि गुजारा करीत असतात. त्यांच्या “आतली ” गुदमर पाहायची असेल तर काही अलौकीक क्षण पांढऱ्या पडद्यावर/रंगभूमीवर यावे लागतात.

शन्ना आणि वपु यांच्या कथांमधील दमदार बीजांना आमच्या चित्रसृष्टीने कधीच न्याय दिला नाही. शन्नांच्या प्रसन्न आणि ताज्या लेखणीने दिलेले दोन चित्रपट मला दिसले- ” आनंदाचं झाड आणि एक उनाड दिवस ! ” ( वपुंचा एकच – ” मुंबईचा जावई “)

“उनाड ” मध्ये आम्ही वाया घालविलेला ” अशोक सराफ ” , क्षमतेपेक्षा गुंजभरापेक्षा बरंच कमी मिळालेल्या फैयाझ समोर बसतो- शुभा जोशींच्या स्वरातले गाणे चेहेऱ्यावर जिवंत करीत –

” हूर हूर असते तीच उरी,
दिवस बरा की रात्र बरी ! ”

सौमित्रच्या शब्दांना सलील कुलकर्णीने अधिक न्याय दिलाय, की शुभा जोशींनी, की फैयाझ ने की अशोकने, माझा आजवर फैसला होत नाहीए.

” उनाड” मध्ये विस्मृतीच्या गर्तेत गेलेली ( तशी प्रत्यक्षातही) चंद्रिका ( फैयाझ ) तिचंच एक गाजलेलं गाणं अनपेक्षित उनाडपणे दिवस घालविणाऱ्या अशोक समोर आत्मीयतेने सादर करते. सगळ्या चित्रपटाचा पोत बदलतो- नवनवे अर्थ सांगत ! भारावलेला अशोक तिला बिदागी विचारतो -एकट्यासमोर सादर केलेल्या मैफिलीची ! डोळ्यांत पाणी आणून ती एवढंच म्हणते- ” अधून-मधून ऐकायला येत जा.”

सगळ्याच अस्ताला जाणाऱ्या कलावंतांचं हेच मागणं असत- ” दुआँमें याद रखना “!

अशोक सराफ ही चीज जाणवली फक्त – चौकट राजा / वज़ीर /आत्मविश्वास /हमीदाबाईची कोठी सारख्या नेमक्या ठिकाणी अन्यथा विनोदवीराचा शिक्का जिंदाबाद !

फैयाझ पहिल्यांदा भावली “कट्यार ” मधील झरीना म्हणून- खां साहेबांची सुरेल कन्या या भूमिकेत, आणि दुसऱ्यांदा भिडून गेली कुसुमाग्रजांच्या ” वीज म्हणाली धरतीला ” मधील जुलेखा म्हणून ! दोन्ही गायिकेच्या भूमिका, त्यामुळे अभिनेत्री की शास्त्रीय गायिका यात कायम गल्लत होत गेली माझी !

पण ” हूरहूर ” मध्ये दोघेही एकाच सामर्थ्याने समोरासमोर आले आणि क्षण चिरंजीव करून गेले.

सतत नजरेसमोर राहावे म्हणून ते काय वाटेल ते ” फ” दर्जाचे काम स्वीकारत असतात. ही धडपड कधी कधी केविलवाणी वाटते तर कधी अपरिहार्य वाटते.

” नूतन ” ला मावळतीच्या रंगांमध्ये (“मेरी जंग “, ” मैं तुलसी — “, ” कर्मा “) बघणं असंच दुःखद होतं. नसीर /परेश/ओम पुरी/ अमिताभ/अनुपम यांनाही आपण अगणितवेळा वाया घालवलं आहे. मराठीत विक्रम/लागू सारेच या वाटेवरचे ! त्यांनी कितीही प्राण फुंकले तरी त्या भूमिका जिवंत होत नसत.

” विक्रम ” ला बघायचे तर त्याची निजखूण बनलेल्या “बॅरिस्टर ” मध्ये, मानसी मागीकरांना ” गोट्या किंवा पुढचं पाऊल ” मध्ये आणि दिलीप कुमारला ” मशाल ” मधल्या एका प्रसंगामध्ये ! ही यादी कितीही लांबविता येईल.

मैफिलीचा हा किनारा
दो घडीचा वायदा !
कारवा दारात आला
अलविदा हो अलविदा !!

कधीकाळी ऐकलेली ही आर्त गज़ल जात्या वर्षाला अलविदा करण्यापूर्वी, अशा अस्तंगत कलावंतांना – त्यांना आपण अजून विसरलेलो नाहीए याची ” बिदागी ” म्हणून देऊ या.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

4 Comments on ‘हूरहूर असते तीच उरी’ – मैफिलीचा हा किनारा !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..