नवीन लेखन...

‘गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार

“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते.

जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला.

निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .

सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल.

बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा वर्ष..

मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली.

वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे “मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.

राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्ही. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शीत केलेला ‘लोक शाहीर राम जोशी’ हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.

‘जिवाचा सखा’मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील ‘धरणीधर’ या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर ‘शाकुंतल’ नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या.

जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत.

‘मराठी रंगभूमी’ ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर “गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट’ ही संस्था स्थापन करून जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते.

जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..