नवीन लेखन...

ड्रॉवर (कथा – सांगोपांग : १)

आजची कथा : ड्रॉवर
पूर्व प्रसिद्धी : मासिक अंतर्नाद
सप्टेंबर , १९९९

‘ रस्त्यावरून जात असताना मैलाचे दगड दिसतात , म्हणून त्यांना कुणी बरोबर घेऊन जातं का ? त्या दगडाचं स्थान , त्या ठिकाणाहून जाणाराला आपण किती चाललो , हे कळण्यापुरतं असतं ! ‘

अशी एक मध्यवर्ती कल्पना केव्हातरी मला सुचली होती .

दैनंदिन व्यवहार चालू असताना अशा अनेक कल्पना मला नेहमी सुचत असतात . मग खिशातल्या छोट्या वहीत मी त्या लिहून ठेवत असतो . आणि स्वस्थचित्त असताना मग त्यातल्या एखादया कल्पनेवर मनातल्या मनात एखादा आकृतिबंध आकाराला येत असतो .

त्यादिवशी असंच झालं. संपादकांचं पत्र आलं आणि मी विचार करू लागलो. वही चाळता चाळता मैलाच्या दगडाच्या मध्यवर्ती कल्पनेविषयी मन घुटमळू लागलं.

अशावेळी एक अस्वस्थता असते. काहीतरी सुचू पाहत असतं आणि मनातल्या आकृतिबंधाला योग्य शब्द मिळत नसतात.
मग नुसतं फिरणं , नको असलेल्या कामात व्यस्त राहणं असं काहीतरी माझं होत राहतं.

तर अशाच एका अवचित क्षणी मला टेबलाचा ड्रॉवर साफ करण्याचा मूड आला आणि मी ड्रॉवर उघडला. त्यातल्या वस्तूंची गर्दी बघून मलाच चमत्कारिक वाटू लागलं. परस्परविरोधी अनेक वस्तू मी त्यात कोंबून कशाही ठेवल्या होत्या. पेनं , पेन्सिल , खोडरबर , नेलकटर , सुटे पैसे , किल्या , कागदाचे तुकडे , कुठली कुठली बिलं …कशाचा कशाला पत्ता लागू नये इतकी गर्दी .. आणि लक्षात आलं की हे अगदी आपल्या मनासारखं आहे .
नको असणाऱ्या अनेक गोष्टींनी मन खच्चून भरून गेलेलं असतं आणि जेव्हा केव्हा काही आठवायला हवं असतं तेव्हा काहीच आठवत नाही. आठवणींचा चिखल झालेला असतो डोक्यात …

असं काहीतरी लक्षात आलं आणि त्याक्षणी मी तो उघडा ड्रॉवर तसाच ठेवून पॅड आणि पेन हाती घेतलं. आणि कागदावर लिहायला सुरुवात केली …

‘आळसावलेल्या कुत्र्यानं उठावं , अंग झडझडावं आणि उडी मारण्याची तयारी करावी , तसा दिवस उगवला …’

कथेला सुरुवात तर चांगली झाली .

मग त्यात रवी आला. प्रेम विवाह करूनसुद्धा नको इतक्या चिकित्सक वृत्तीनं राहिल्यानं होणारी भांडणं आली. त्यामुळे वैतागून माहेरी गेलेली त्याची बायको किरण त्यात आली. रवीची भावनाप्रधानता , किरणची जमिनीवर राहून विचार करण्याची वृत्ती , त्यातून बिघडलेले नाते संबंध हे सगळं आलं. कथा पुढे पुढे सरकत असताना लक्षात आलं की हे सगळ्यांच्या कथेत असतं. मग आपल्या ड्रॉवर कथेमध्ये वेगळं काय?

मग मैलाच्या दगडाचं स्थान , ड्रॉवर मधील वस्तू असं काही काही आठवत गेलं, सुचत गेलं. त्याअनुरोधानं प्रसंग येत गेले. माझीच कथा असूनही मी त्या पात्रांच्या विश्वात गुंतत गेलो आणि शेवट करण्याआधी पुन्हा विचारात पडलो. दोघं एकत्र का येत नाहीत असा मलाच प्रश्न पडला आणि केव्हातरी ड्रॉवर साफ करताना जुनी टाचणी बोटाला टोचली होती ती आठवण आली आणि कथेचा शेवट सुचला.माणसाच्या जुन्या सवयी , जुन्या आठवणी कधी कधी अनपेक्षितपणे सुखद धक्का देतात आणि आयुष्य बदलून जाते. मैलाच्या दगडाला उचलून घेऊन जायचे नसते, ही जाणीव किंवा ड्रॉवर मधल्या सगळ्याच वस्तू टाकाऊ नसतात ही जाणीव होणे महत्त्वाचे असते.

कथा लिहिताना फ्लॅशबॅक तंत्राचा , वर्तमानातल्या भानाचा , छोट्या छोट्या प्रसंगांचा , आशयघन संवादाचा उपयोग केल्याने कथेला वेगळी गती प्राप्त झाली . कथेतील किचन , आरसा , बस ही सगळी पात्रं म्हणून अवतरली . १९९९ मधली कथा असली तरी आत्ताच्या गतिमान युगातील जोडप्यांची व्यथा मांडणारी कथा म्हणून आजही ती तितकीच वाचनीय वाटते .

— आजही ड्रॉवर उघडला की ड्रॉवर ची निर्मिती प्रक्रिया आठवते .
आणि खूप समाधान वाटते .

— डॉ .श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

९४२३८७५८०६
———-
कथा-सांगोपांग मधील माझ्या कथांचा मी करून दिलेला परिचय कसा वाटला हे जाणून घेण्याची आस आहेच .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..