नवीन लेखन...

प्रश्नोपनिषद (कथा – सांगोपांग : ३)

आजची कथा : प्रश्नोपनिषद
पूर्व प्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स
दीपावली २०००

” कूल डाऊन भांडारकर , कूल डाऊन ”

अशी कथेची सुरुवात केली आणि नंतर दोन दिवस कथेचा एक शब्दसुद्धा लिहिला नाही.म्हणजे लिहिताच आलं नाही काही. पेन आणि पॅड हाती घेतलं की डोळे भरून यायचे. अस्वस्थता यायची. वाटायचं , हे कथानक आपण लिहायलाच हवं का? भांडारकर आणि त्यांची बायको राधा यांची मनःस्थिती उलगडायला हवीच का ? बुद्धिमान असणाऱ्या , सातत्याने मेरीटमध्ये येणाऱ्या , विचारवंत असणाऱ्या , कुटुंबसंस्थेला जपण्यासाठी धडपडणाऱ्या , प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या , काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडविणाऱ्या विशालचं दुःख मांडायलाच हवं का? नोकरी मिळविण्यासाठी , लाखो रुपयांची लाच मागणाऱ्याना , विरोध करता न आल्यानं आणि गुणवत्तेची कदर न करणाऱ्या व्यवस्थेला , चार शब्द सुनवता न आल्यानं , हताश होऊन बळी पडणाऱ्या तरुणाईचं दुःख वेशीवर टांगायलाच हवं का? असे असंख्य प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. प्रश्नोपनिषद मनात वादळ निर्माण करीत होतं.

आजूबाजूला बळी पडणारी नवीन पिढी दिसत होती. मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था नोकरीच्या आशेनं कर्जबाजारी होताना आणि नंतर उद्ध्वस्त होताना दिसत होती. सगळं वास्तव त्या प्रश्नोपनिषदातून मनाला हलवून टाकत होतं. त्यामुळं कथेला शीर्षक सुचलं होतं . प्रश्नोपनिषद

कथानक थोडं वेगळं होतं.

मध्यमवर्गीय तेव्हा मुंबईतून उपनगराकडे हाकलला जाऊ लागला होता. भांडारकर असेच एक मध्यमवर्गीय. कर्ज काढून उपनगरात ब्लॉक घेऊन , लोकलच्या रोजच्या गर्दीत स्वतः कणाकणानं मरायला झोकून देणारे. विशालला नोकरीची संधी आलेली पण दीड लाखाची लाच मागितल्यानं तो हबकलेला. पण नोकरी चांगली म्हणून भांडारकर त्यासाठी आणखी कर्ज काढतात. ते पैसे दिल्यानंतर विशालकडे मॅनेजमेंटची पैशांची वाढीव मागणी होते. वडिलांची ओढाताण तो पाहतो .

घरातील असेल नसेल ते विकून भांडारकर त्याला पैसे उपलब्ध करून देतात आणि विशाल जेव्हा ते द्यायला जातो तेव्हा त्याला कळतं की मेरीटमध्ये न बसणाऱ्याला , मॅनेजमेंटने जास्त पैसे घेऊन विशालला डावललंय. तो उद्ध्वस्त होतो . सगळं कुटुंबच उद्ध्वस्त होतं.

कथा इतकीच आहे. पण मला त्यातून बरेच कंगोरे उलगडायचे होते.

व्यवस्था माणसाला , माणुसकीला , भावनांना संपवून टाकते. क्षितीज भासमान असतं आणि ते कधीच हाती लागत नाही .

उमेद संपावणारी मंडळी आपल्या आजूबाजूला भरपूर असतात. भरारी घ्यायला झेपावणाऱ्यांचे पंख छाटण्यात अनेकांना आसुरी आनंद मिळत असतो आणि एखाद्या घरातल्या तरुणाची आत्महत्या ही घरातल्या सगळ्यांना मानसिक , शारीरिक दृष्ट्या संपवून टाकणारी असते. प्रश्नोपनिषद संवेदनशील माणसाला सैरभैर करून सोडते. कथा लिहिताना मी याचा अनुभव घेतला .

सगळी कथा ठाणे रेल्वे स्टेशनवर घडते. त्यामुळे आपल्याच नादात असणारी आणि सतत पळणारी गर्दी , कोलाहल , ओव्हरफ्लो होणाऱ्या लोकल्स , त्यात घुसण्यासाठी होणारी जीवघेणी कसरत , पोलिसांची , दंडगटांची अरेरावी , मग्रूर मस्तवाल रिक्षावाले , टोळ्यांनी हिंडणारे आणि नाडणारे तृतीयपंथी , त्यातच चिकाटीने व्यवसाय करणारे फेरीवाले आणि या सगळ्यात सतत मागे पडत जाणारे भांडारकर मला व्यवस्थित रेखाटता आले. मुलाच्या आठवणीनं व्याकुळ होणारं त्यांचं मन आणि रेल्वेच्या रुळांची रक्तमाखली आठवण मांडता आली. तिन्ही व्यक्तिचित्रे रेखाटताना वर्तमानातले अनेक संदर्भ उपयोगात आले. स्टेशन हे स्थळ निवडल्याने एक प्रकारची गतिमानता आली. व्यवस्थेतला पोकळपणा आणि समाजाची भावनाहीनता मांडता आली.

कथेच्या शेवटी , स्टेशनबाहेर बेरोजगारांचा मोर्चा निघालेला असतो आणि त्यातून दंगल सुरू झालेली असते .
घरी जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भांडारकराना , दंगलीतील इसम म्हणून पोलीस बेदम मारहाण करतो .
आणि ते निपचित पडल्यावर कर्तव्य केल्याच्या समाधानात पोलीस निवांत होऊन तंबाखू मळू लागतो .
इथे कथा संपते आणि प्रश्नोपनिषद खऱ्या अर्थाने सुरू होते …

आपला प्रतिसाद अपेक्षित आहे .

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..