नवीन लेखन...

अधिष्ठाता विठ्ठल

आषाढीचा मुहूर्त गाठत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या वाटेवर पडत आहेत. भक्तांच्या गर्दीत त्यांना विठोबाचं दर्शन होणार नाही, कदाचित…पण त्यांना लांबून दिसणारा विठ्ठलमंदिराचा कळसही पुरतो दर्शनासाठी…कारण त्यांचा विठ्ठल, त्यांच्या हृदयातच तर वसतो!

डॉ. विकास बाहेकर यांचा ‘मटा’ मधील हा लेख… 


आषाढीनिमित्तच्या वारीमुळे महाराष्ट्रातील अवघे जनमानस भक्तिमय झाले आहे. सामान्य माणसाला आपल्या हृदयातील शुद्धभक्तीने भवसागर तारून नेणारा पढंरीराया, त्याच्या अनेकविध वैशिष्ट्यांमुळे आपलासा वाटतो. कुठलेही कर्मकांड, कुठलाही नवससायास, कुठलीही योग्यता न पाहता

खट नट यावे । शुद्ध होऊनि जावे ।
दवंडी पिटे भावे । चोखामेळा ॥

या न्यायाने फक्त तुळशीच्या मंजिरीची माळा व गळ्यात तुळशीमाळ याच ओळखीवर शुद्धभक्तिच्या भांडवलावर हा पांडुरंग ‘देव पहावया गेलो । देवचि होऊनि ठेलो॥’ इतकी कृपा करतो, अशी त्याची ख्याती आहे. म्हणूनच कुठलेही आमंत्रण नसताना, कुठलीही व्यवस्था नसताना (दिंड्यांची गावातून स्वयंस्फूर्त व्यवस्था असते) श्रमणारा कष्ट करणारा सामान्य आर्थिक परिस्थिती असलेला, तसे पाहिले तर फाटकाच, परंतु आत्मिक शक्तीने बलवान असलेला वारकरी माहेरच्या ओढीने आषाढी-कार्तिकीला पंढरीकडे शेकडो वर्षांपासून ओढला जातो आहे. हेच महाराष्ट्राच्या या अधिष्ठानाच्या भक्तीचे मोठे वैशिष्ट्य आहे.

श्रीविठ्ठल उत्पत्ती

अभ्यासकांनी, चिकित्सकांनी विठ्ठलाची उत्पत्ती अनेक अंगानी संशोधित करून त्यांची वेगवेगळी मते मांडली. परंतु खरे पाहता या पांडुरंगाच्या भक्ताला त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही. त्यांचा विचार तुकाराममहाराज या अभंगात मांडतात-

पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणीक न करी तीर्थव्रत ॥
व्रत एकादशी करीन उपवासी।
गाईन अहर्निशी मुखी नाम ॥

‘वारकऱ्यांची हीच भावना, दिनचर्या, जीवनक्रम आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या अधिष्ठानाची उत्पत्तीकथा ये भागवत, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा यातून व्यक्त झालेली आहे. ती अशी की, दशावतारातील आठवा संपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्याला भवसागरापलीकडील मूढ, अज्ञानी, मर्त्य मानवाबद्दल असीम कळवळा, या कळवळ्यातून त्याने स्वतः ज्ञान, कर्म याचे आदर्श उभे केलेत. परंतु कलियुगात आत्मशुध्दीसाठी नाम आणि शुद्धभक्तिसाठी अधिष्ठान म्हणून तो स्वतः भक्तिचा कंद म्हणून भवसागराच्या अल्याड युगे अठ्ठावीस कर कटेवर ठेवून विटेवर समचरण उभा ठाकला. त्याने ज्ञानाची संजीवनी सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अवतार पांडुरंगे नाव ठेवियेले ज्ञानी म्हणून माऊली ज्ञानेश्वरांच्या वाणीतून तेच ज्ञान प्राकृतामध्ये मातृत्वाच्या वात्सल्याने प्रकट केले. कुणास आशीर्वाद किंवा हाती शस्त्र न धरता कटेवर कर ठेवून कलियुगाचा महात्मा संयमाचे शस्त्र सामान्यांना बहाल केले. कटेवरचा कर हा सयंमाचा संदेश देताना म्हणतो- धावते ती गती, थांबते ती भीती, परंतु वारंवार बदलते ती परिस्थिती. या बदलातून तुझ्यासाठी योग्य परिस्थिती निश्चितच येईल, असा दुर्दम्य आत्मविश्वास सामान्य वारकऱ्यांमध्ये निर्माण करतो. त्यासाठी स्वतःच्या निश्चितचे स्वरूपही वारंवार प्रकट करतो. जसे की राईच्या वल्लभा, रूखुमाईच्या वल्लभा या संबोधनातील राई (राधा) पूर्णपणे अदृश्य झाली. पांडुरंग शांत आहे, नाराज रुक्मिणी बाजुला (मागील मंदिरात) जाऊन बसली तरीही हे शांतच, तर कधीकधी चंद्रभागा दर्शनाला येताना नाकापर्यंत पाणी येते तरीही हे शांतच असतात. वारकऱ्यांमध्ये दिसणारी पराकोटीची सहनशीलता ही या ईश्वर स्वरूपाच्या कर कटेचीच देणगी आहे.

ब्रह्मांड व्यापणारे महाविष्णुचे भक्तिमय स्वरूप म्हणजे पंढरीराया आहे. ही भावना समचरणातून व्यक्त होते. ब्रह्मांड व्याप्तीमुळे हे चरण मागेपुढे नाहीत तसेच तुमच्या माझ्या प्रपंचावर, परमार्थावर सर्वार्थाने समृद्ध दृष्टीने पाहणारेसुद्धा आहेत.

विटेवरी ज्याची पाऊले समान ।
तोचि एक दानशूर दाता ॥

असा त्यांच्या औदार्याचा, कृपादृष्टीचा उल्लेख करताना तुकाराममहाराज म्हणतात की, प्रपंचामध्ये नैतिकतेने कार्यमग्न असणाऱ्याला प्रपंचातील समान पाऊल (पांडुरंगाचे) जीवनाचे सर्व ऐहिक रंगही

दाखवते. कारण जीवन वेगवेगळ्या भावभावनांचे सुख-दुःखाचे मनोहारी नाट्यच आहे. म्हणून

जीवनाचे हे सर्व रंग दाखविणारा हा पांडुरंग आहे, फक्त प्रांपचिकाने-

प्रपंच ओसरो । चित्त तुझे पायी मुरो ॥
ऐसे करीगा पांडुरंगा । शुद्ध रंगवावे रंगा ॥

इतके पथ्य पाळावे. पारमार्थिकासाठी दुसरे पाऊल तितकेच खंबीर आणि भक्कम आहे, ज्यातून त्याच्या प्रपंचाचा-परिवाराचा क्षेमकुशल हाच वाहतो. बदामाजीचा प्रसंग किंवा चोखामेळ्याच्या पत्नीचे बाळंतपण असो हा सावळा आभाळासारखा भक्ताच्या रक्षणासाठी दाता बनतो. तो विठ्ठल काळासावळा आहे. पोशिंद्या काळ्या मातीसारखा. त्याचे सिंचन करणाऱ्या कृष्णमेघासारखा.

वीर, अभिचारक, भोग, आणि योग हे मूर्तीचे चार प्रकार आहेत. यातील पंढरीरायाची योग मूर्ती होय.

आजही या मूर्तीच्या प्रत्यक्ष चरणाचे दर्शन सामान्यास घेता येते. तेव्हा हे दर्शन घेताना मनात निश्चित एक भावना निर्माण होते. ती म्हणजे मी जे चरणस्पर्श करतो त्याच चरणांना संत नामदेवराय, माऊली

ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ, जगत्गुरू तुकाराम आदि अनेक संतांनी स्पर्श करून विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. म्हणजे या चरणस्पर्शामध्ये फक्त विठ्ठलच नाही, तर सर्व संतांच्या स्पर्शाचे चैतन्य सामान्य भक्तास पावन करते. प्रपंचातील दुःखे, अपयश, दैन्य इ. अनेक अडचणींचे मनावरील

मळभ क्षणात दूर होऊन असा भक्त प्रपंचाप्रति. वैराग्यभावनेने भरून जातो. पण हे वैराग्य संसार सोडवण्यासाठीचे नव्हे. कारण वारकरी संप्रदायाची ईश्वरप्राप्तीची व्याख्या माऊली ज्ञानेश्वर हरिपाठात करतात की, ‘असुनि संसारी । जिव्हे वेगू करी ॥’ तसेच संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, ‘नलगे सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥’ म्हणून प्रवृत्तीत राहून परमार्थ तर निवृतीमध्ये राहून प्रपंच, असे अजब रसायन म्हणजे वारकरी संप्रदायाचे तत्त्व आहे. त्यामुळे दिंड्या, भागवत सप्ताह, वारी हे संप्रदायाचे सोहळे होत. तर तू जसा ठेवशील त्यात मी पूर्ण समाधानी आहे, ही वारकऱ्याची वृत्ती आहे.

दुसरी सर्वमान्य उत्पत्तीकथा अशी आहे की, भगवान श्रीकृष्णावर रुष्ट होऊन माता रुक्मिणी हारकेहून दिंडोरवनात येऊन बसल्या. त्यांच्या मागे त्यांना समजावण्यासाठी धावतच स्वयं भगवान

श्रीकृष्ण दिंडीरवनाजवळ दाखल झालेत, धावतच आल्यामुळे कुठलेही शस्त्र, चक्र, बासरी इत्यादी काहीही ते बरोबर घेऊन आले नाहीत, परोपरीने माता रुक्मिणीला समजावताना ते अपयशी ठरले.

म्हणून बाजूलाच त्याच्या एका भक्ताकडे पंडलिकाकडे गेले (पूर्वजन्मीचा मुचकुंद), त्याने घरातूनच आईवडिलांच्या सेवेत मग्न असल्यामुळे भगवंतांपुढे उभे राहण्याकरिता वीट फेकली. त्याच विटेवर तो पांडुरंग स्वरूपात युगे अठ्ठावीस उभा आहे, वाट पाहतो आहे. या कथेच्या तपशीलातही न जाता वारकरी संप्रदायाच्या दोन महत्त्वाच्या सिद्धांतांचा विचार येथे करणे क्रमप्राप्त आहे.

विठ्ठलाने विटेवर अधिष्ठान स्वरूप प्राप्त केल्यापासून ते स्वतः प्रथम भक्त पुंडलिकाची युगे अठ्ठावीस वाट पाहात तिष्ठत उभे आहेत. म्हणजे अजून पुंडलिक बाहेरच आला नाही. त्याने विठ्ठलाचे दर्शन घेऊन काही मागणीही केली नाही. त्यामुळे पुंडलिकापासून आजपर्यंत विठ्ठलाचे दर्शन घेणाऱ्या कोणत्याही भक्ताला काहीही मागण्याचा अधिकार नाही. कारण तो भगवंतच त्याच्या झोळीत समाधानाचे आनंदाचे कृपाप्रसादरूपी आशीर्वाद भरभरून देतो. म्हणूनच तो योगमूर्ती होय. भोग नव्हे. कारण कोणतेही ऐहिक मागणे भक्त मागत नाही आणि तो पुरवतही नाही.

दुसरे असे की आजच्या आधुनिक काळामध्ये वारकरीसंप्रदायाचा वेगळ्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. सुखवस्तू कुटुंबामध्ये आईवडिलांना वागवणे जड होऊ लागले व त्यामुळे वृद्धाश्रमाची निर्मिती होते आहे. मात्र विठ्ठलमूर्तीच्या उत्पत्तीच्या निमित्ताने हे संप्रदायाचे तत्त्व विशेषत्वाने समजून घेणे आवश्यक आहे की आईवडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी युगे अठ्ठावीस भगवंतही दारावर विटेवर आनंदी योगमुद्रेने तिष्ठत उभा आहे. त्यामुळे आईवडिलांच्या सेवेतच खरी ईश्वरसेवा आहे. जर यामध्ये मग्न असाल तर ईश्वरालाही तिष्ठत ठेवण्याची शक्ती तुम्हास प्राप्त होते. कारण आईवडील हेच या पृथ्वीतलावरचे खरे सगुण साकार ईश्वर होत.

वारकरी भक्ताची शक्ती

पंढरीचा पांडुरंग त्याचे देवपण विसरून भक्ताच्या लडिवाळाकरिता काहीही करण्यास तयार असतो.

उंबरठयासी कैसी शिवू । त्यात आम्ही हिन ॥
रूप तुझे कैसे पाहू । त्यात आम्ही दीन ॥

असे म्हणणारे संत चोखोबा असो किंवा संत नामदेवराय यांचे कीर्तन असो, मंदिर सोडून चंद्रभागेच्या वाळवंटात या भक्तांच्या कीर्तनात भगवंत बेफाम होऊन नाचतो.

व नाचता नाचता त्याचा पितांबरही सुटतो, याचेही भान राहत नाही. कारण हा संबंधच असा आहे की, आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. या दिवशी सर्व भक्तांनी भगवंतास दम दयायचा की तुम्ही आता झोपा. आम्हास जीवितासाठी प्रपंच करू द्या, एकदा त्यातून अर्थार्जन झाले म्हणजे कार्तिकात काकड्याने तुम्हाला आळवून जागे करण्यात येईल. ती कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी म्हणजे जागृत करणारी एकादशी.

विठ्ठलाचा भक्त कोणापुढे प्रपंचासाठी लाचार होऊन अधिष्ठान आणि भक्ती या दोहोला लांच्छन ठरेल असे वर्तन करू शकत नाही. कारण तो संसारात भक्कमपणे परंतु विरक्त भावनेने उभा असतो, म्हणून उपजीविकेची निर्मिती चातुर्मासात केल्यावर त्याची मुख्य जीविका जो पंढरीराया यांच्याशी परमार्थाचे सोहळे साजरे करण्यात तो परत मोकळा होतो.

नामदेवरायांच्या शब्दांत-

या सुखालागी करीसी तळमळ ।
तरी तू पंढरीसी जाय ऐकवळ ॥
मग तू अवघाचि सुखरूप होसी ।
जन्मोजन्मीचं दुःख विसरसी ॥

अशी प्रचिती घेऊनच प्रत्येक जण वर्षभराची आत्मिक बळाची शिदोरी घेऊन पंढरीहून घराकडे येतो आणि पद्मपत्राप्रमाणे प्रपंचात विसावतो.

भक्ति-ज्ञान-कर्माचा अधिष्ठाता

विठ्ठल हा भक्तिचाच खरा अधिष्ठाता आहे, यात वाद नाही. कारण सामान्याजवळ तेच भांडवल आहे.

त्यामुळे त्याचे सर्व लाड तोच पुरवितो. पण भक्ती मात्र तुकारामांच्या शब्दातली असावी.

हेचि थोर भक्ती आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची ॥

या भक्तिपोटी नामदेवाचा नैवेद्य या भगवंताने ग्रहण केला. म्हणून ज्याच्या हदयात शुद्धभक्ती आहे, त्याच्यासाठी धावणारा हा भगवंत आहे.

— डॉ. विकास बाहेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..