नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ६ – शाकाहारी भाग एक

आपल्या अवतीभवती जे प्राणी आहेत, त्यांचे परीक्षण केले असता, असे लक्षात येते की, जगात कुठेही यांना बघीतलेत किंवा अभ्यासले तरी या प्राण्यांची वैशिष्ट्ये तीच रहातात. दक्षिण आफ्रिकेमधला कावळा काळाच असतो आणि अमेरिकन कावळा पण काळा तो काळाच ! रंगात बदल नाही, गुणसूत्रात बदल नाही, आहारात बदल नाही, की सवयी मधे. त्याचे काव काव ओरडणे सगळीकडे सारखेच ! कावळा हा एक स्वतंत्र अभ्यास करण्यासारखा विषय आहे. पुढे कधीतरी.

आपण मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली आता शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये तपासून बघूया.

सर्व शाकाहारी प्राणी जसे गाय, बैल, हत्ती, घोडा, गाढव इ.इ. पाणी पिताना ओठाने पितात, म्हणजे दोन्ही ओठांचा वापर करून पाणी ओढून घेतात व घोटतात. जीभेचा वापर नाही. जीभ फक्त अन्नाला तोंडातल्या तोंडात, इकडून तिकडे ढकलण्यासाठी, फिरवण्यासाठी वापरली जाते. आणि चव घेण्यासाठी सुद्धा ! पण यांच्या जीभेला धार नसते, खाचा नसतात. लाळ असते ती पण खूपच बुळबुळीत. एकावेळी भरपूर पाणी तोंडात ओढून घेता येते. गाय किंवा बैल पाणी पिताना आपण बघीतले आहेच.

खाल्लेले अन्न, पाला बारीक तुकडे करून पोटात गिळले जातात. यासाठी यांच्या जबड्यात दातांची एक वेगळीच रचना दिसते. यांच्या वरच्या जबड्यातील दातामधे दोन दात सुळे प्रकारातील असतात. ज्यांना थोडेसे टोक असते. घास तयार करण्यासाठी हे सुळे त्यांना उपयोगी पडतात. जे खाल्ले आहे, ते तोंडातून परत बाहेर पडू नये यासाठी पण या सुळ्यांचा वापर केला जातो. गाय बैल घोडा यांच्या जबड्यात अशीच रचना असते. मुद्दाम बघा. यांच्या खालील जबड्यात सुळे असत नाहीत.

यांना अन्नाचे मोठे तुकडे गिळता येत नाहीत. थोडे बारीक करावे लागते. रवंथ करावे लागते, पीठ करून आत ढकलावे लागते, म्हणून यांच्या जबड्यात वर आणि खाली दाढा जास्त यांच्या मधे जे काही येईल त्याचे पीठच.

यांची लाळ जास्त बुळबुळीत असते. कारण पाल्यात भरपूर प्रमाणात असणाऱ्या स्टार्च किंवा शर्करेला पचवणारे ” पिट्यूलीन” हे एक एन्झाईम यांच्या लाळेत जास्त असते.
(जे एन्झाईम मांसाहारी प्राण्यांच्या लाळेमधे उपस्थित नसते. कारण त्यांना त्याची गरजच नसते. कारण मांसाहारामधे स्टार्च चे प्रमाण जवळपास नसतेच, किंवा अपवादानेपण अगदीच कमी असते. त्यामुळे त्यांच्या लाळेमधे स्टार्च पचवणाऱ्या एन्झाईमची आवश्यकताच नसते.
पण मांसामधे प्रोटीन्स जास्त असतात. हे प्रोटीन्स पचवण्यासाठी आवश्यक असलेली एन्झाईम्स, पोटात हायड्रोक्लोरीक अॅसिड सारख्या रूपात भरपूर प्रमाणात निर्माण झालेली असतात.)

चावून चावून चावून चावून गिळल्यामुळे लाळेची निर्मिती जास्त होते. हे एन्झाईम जास्त पाझरते, पचन सुलभ होते. या लाळेमुळेच गाय बैल या शाकाहारी प्राण्यांना, गिळलेले अन्न पुनः तोंडात आणणे आणि सावकाशपणे रवंथ करणे सोपे होते.
कोणीतरी मांसभक्षी आपल्याला खाईल, या भीतीने, दिवसभर बकाबका खाऊन घ्यायचे, मग निवांत सुरक्षित ठिकाणी येऊन खाल्लेले परत पचवायचे.
या दोन वेळा केलेल्या पचनामुळे या प्राण्यांना पण अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर यातले काही त्रास होत नाहीत.

भक्ष्याला पकडायचे नसल्यामुळे पायाची नखे स्थिर असतात. त्यांना आपण खूर म्हणतो. गाय बैल, यांचे खूर विभागलेले असतात, तर घोडा, गाढव यांचे खूर विभागलेले नसतात. पण यांना टोके नसतात. हलवता येत नाहीत. जर यांना टोके असली असती तर चालणे मुश्किल झाले असते, जीव वाचवण्यासाठी पळणे किंवा धावणे दूरच राहिले. म्हणजे शाकाहारी प्राण्यांची नखे आत बाहेर करता न येणे, ही त्यांच्यासाठी “त्याने” दिलेली देणगीच म्हणायची !!!

त्यांना जगवण्यासाठी केलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजेच ईश्वर !!!!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
27.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..