समाज हा एका विशिष्ट वंशाच्या, भाषेच्या किंवा व्यवसायाच्या लोकांचा समूह असतो. समाजाचा जसजसा व्याप वाढत जातो तसतसे त्यातील गुण वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवू लागतात आणि त्या गुण वैशिष्ट्यांना घेऊन आपला वेगळा समूह निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरु होते. यातून मग एक नवा समाज नावारुपास येतो. पुढे हे नावच त्या नवनिर्मित समाजाची मर्यादा आखून देते.
भारतीय समाज सुद्धा अनेक वंश भाषा आणि व्यवसाय असलेला समाज आहे. अगदी वैदिक काळापासूनच भिन्न भिन्न वंशामुळे, चालीरितिमुळे, उपासना पद्धतीतील विविधतेमुळे आणि अनेकानेक व्यवसायामुळे भारताच्या समाज जीवनात असंख्य लहान लहान समूह आपले वेगवेगळे गट करुन जीवन जगत असलेले दिसून येतात. व्यवसायावरुन ज्यांची वेगळी ओळख पटते अशा लोकांत पुरोहित, योद्ध, व्यापारी आणि कारागीर असे चार प्रमुख वर्ग पाडता येतील. हे चारही वर्ग गरजेनुसार परंतु स्वयंप्रज्ञेने उपजीविकेसाठी काम करतात. कारागीर सुद्धा स्वत:ची प्रतिभा, कौशल्य पणास लावून, सौंदर्य विषयक जाणिवा लक्षात घेऊन उपयोगितेनुसार शिल्प घडवितो, त्यामुळे तो शिल्पकार ठरतो. असा शिल्पकार स्वत:चे वेगळे कौशल्य, कसब (Skill) वापरीत असल्यामुळे त्याला कुशल कारागीर म्हणतात. विश्वकर्मा समाज सुद्धा असाच कुशल कारागीरांचा समाज होय.
कुशल कारागीर म्हणजे कोणते कारागीर आणि कोणते शिल्प कुशल कारागिरांचे शिल्प आहे, हे समजून घेण्याआधी कारागीर या शब्दांचे अर्थ आणि त्यांची व्याप्ती वैदिक काळापासून कशी कशी बदलत गेली हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे.
डॉ. चक्रपाणी चोप्पावार


Leave a Reply