नवीन लेखन...

त्रिदल

मराठी संगीत नाट्यसृष्टीचे जनक असणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन !

कै . अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेला संगीत नाटकाचा प्रवाह आज विशाल झाला आहे .
त्या प्रवाहात मलासुद्धा थोडी संधी मिळाली , याबद्दल धन्यता वाटत आहे .

मी लिहिलेल्या आठ संगीत नाटकांपैकी तीन नाटकांचे त्रिदल हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे . आज कै. अण्णासाहेबांच्या जयंतीदिनी त्या पुस्तकाचा परिचय करून देत आहे . संगीत घन अमृताचा ,संगीत शांतिब्रह्म , संगीत राधामानस या तीन संगीत नाटकांचे , खल्वायन संस्थेने प्रकाशित केलेले माझे पुस्तक म्हणजे त्रिदल. सं. घन अमृताचा कलाकाराची कला रसिकाश्रयाने समृद्ध होते हा विचार मांडण्यासाठी लिहिलेले हे संगीत नाटक . गायक असणारे पं. मकरंद आणि पत्नी मधुरा , चित्रकार असणारे शैलेंद्र आणि गायिका असणारी पत्नी शीतल , या दोघांचा मित्र राजा आणि रसिकांचा प्रतिनिधी सातपुते या सर्वांची ही कथा . आयुष्यातील चढउतारात केव्हातरी वितुष्ट येतं आणि मग वेगवेगळ्या मार्गावरून वाटचाल सुरू होते . पण दोन्ही कुटुंबाना जाणवू लागतं की वैयक्तिक हेवेदाव्यात रसिक दुरावत जातो आहे . मग रसिकच अमृताचा घन होऊन दोघांच्या प्रतिभाशक्तीला नवसंजीवन कसे देतो आणि पुन्हा एकदा नव्याने कला कशी बहरू लागते , त्याची कहाणी म्हणजे हे नाटक . मैत्री , प्रेम , नातेसंबंधातील अपरिहार्यता आणि कलेवरची अढळ निष्ठा यांचे महत्व अधोरेखित करणारी ही कहाणी . गायन चालू असताना रंगमंचावर प्रत्यक्ष चित्र काढणं , वेगळ्या धर्तीचं संगीत , वेगळं नेपथ्य , वेगळी वाट चोखळणारं कथानक असे अनेक प्रयोग या नाटकाच्या निमित्ताने मी केले होते.

शांतिब्रह्म
संत विचारातून समाजमन घडत असतं आणि विरोध पत्करून समाजाला दिशा देण्याचं कार्य संतच करू शकतात , हा विचार या नाटकाच्या मध्यवर्ती कल्पनेत आहे . संत एकनाथांचे कार्य सर्वानाच ठाऊक आहे . पण त्यावेळच्या धर्ममार्तंडांनी त्यांच्या मुलाला – हरिपंताला- हाताशी धरून मोठी आघाडी उघडली होती. परमेश्वरासमोर सर्व सामान असतात , हीनदीन समाजाला आपल्याबरोबर घेऊन, आपलं मानून आपण जीवन जगलं पाहिजे या एकनाथांच्या विचारधारेला त्या मार्तंडांनी विरोध केला होता .एकनाथ महाराजांना धर्मबहिष्कृत करण्यापर्यंत मार्तंडांची तयारी झाली होती , पण शांतिब्रह्म एकनाथांनी त्या लोकांना कशी नवी दिशा दिली , कोणता नवा विचार दिला ते या नाटकात मी मांडलं आहे .
संत एकनाथांच्या अनेक रचनांचा त्यात उपयोग करून घेतला आहे . हे नाटक आजही अनेक संस्था सादर करीत असतात . जवळपास पन्नास प्रयोग झाले आहेत , अजूनही होत आहेत .

राधामानस
युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नसले तरी सस्यशामल पृथ्वीसाठी आणि मानव जातीच्या हितासाठी काहीवेळेला युद्धही क्षम्य ठरत असते , हा विचार या नाटकातून मी मांडला आहे .महाभारतातील अठरा दिवसांच्या महायुद्धाच्या अगोदर हे युद्ध थांबवण्यासाठी नारदमुनी , सुदामा आणि राधा प्रयत्नशील असतात . बलरामाला युद्ध हवे असते . खुद्द श्रीकृष्णाला आणि रुक्मिणीलाही हे युद्ध हवे असते . पण प्रत्येकाची त्यापाठची भूमिका वेगळी असते . या नाटकात सुदामा हा गरीब जनतेचा प्रतिनिधी तर राधा ही पृथ्वीची प्रतिनिधी असं रुपकाश्रयानं मी दाखवलं आहे . श्रीकृष्णाची पृथ्वी विषयी ,प्रजेविषयी भूमिका हे या नाटकाचं बलस्थान आहे .

या तीनही नाटकांनी राज्य नाट्यस्पर्धेत चांगलं यश संपादन केलं . घन अमृताचा आणि शांतिब्रह्म ही दोन्ही नाटके राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांकानं तर राधामानस द्वितीय क्रमांकानं यशस्वी ठरलं .

या तीनही नाटकांनी अनेक विक्रम केले . अनेक संगीतकारांना संगीताची , दिग्दर्शकांना दिग्दर्शनाची , कलाकाराना गायनाची , अभिनयाची प्रथम क्रमांकाची पारितोषिके , पुरस्कार मिळाले . तीनही नाटकांना वेगवेगळ्या संस्थांनी वेगळे संगीत , वेगळे नेपथ्य दिले. अनेकांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले .

मला स्वतःला , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार , मुंबईच्या साहित्य संघ मंदिराचा भालेराव पुरस्कार, पु . भा.भावे पुरस्कार लाभला . महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा *कुसुमाग्रज पुरस्कार त्रिदल पुस्तकाला लाभला . पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने मला २००९ यावर्षी कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराने गौरवले होते . एक प्रकारे हा ऋणानुबंधच म्हणायला हवा !

ऋषितुल्य असणाऱ्या प्रतिभावंतांनी सुरू केलेल्या सुरेल परंपरेशी , अशी नाळ जोडली गेली यातच आयुष्य कृतार्थ झाले , असे मला वाटते .
———-
डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
८९५१९०६७०१

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 131 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..