नवीन लेखन...

मलेरिया लस निर्मिती

वैद्यकीय शास्त्राने विविध रोगांविरुद्ध लस निर्माण करण्यात गेल्या शतकात अशी गरूड भरारी मारली की ज्यामुळे अनेक रोग आज इतिहासजमा झाले आहेत . प्लेग , देवी , कांजण्या , पोलिओ , घटसर्प , डांग्या खोकला अशा अनेक संसर्गजन्य रोगांवर परिणामकारक लसीची निर्मिती झाली . अर्थात मग मलेरिया या रोगावर लस का नाही हा प्रश्न सामान्य माणसाला कोड्यात टाकतो .

मलेरियाच्या परोपजीवांचे माणसाच्या शरीरात येईपर्यंत व आल्यानंतरही अनेक अवस्थांतून संक्रमण हाते . त्यामुळे मलेरियाच्या रोगासाठी लस एक किंबहुना अनेक पद्धतींनी बनवावी लागेल . तसेच मलेरियाची लस दिल्यानंतर माणसाला त्यापासून कायमचे अभयत्व मिळते किंवा नाही ही महत्त्वाची अडचण आहे . हे सर्व अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न असून त्यावरून सरळ सकारात्मक उत्तर मिळणे हे आजमितीला तरी दुरापास्त दिसते . म्हणून या विषयाची केवळ तोंड ओळखच या प्रकरणात दिली आहे .

लस निर्मितीमध्ये खालील पद्धतीचा अवलंब केला आहे .
१ ) मलेरिया परोपजीवांच्या विविध स्थिति ( Stages ) मधील प्रतिजनांच्या ( Antigens ) सखोल अभ्यासाच्या निष्कर्षातून जवळजवळ ३० वेगवेगळी प्रतिजने विविध पद्धतीने मिसळून त्यांच्या विरुद्ध प्रतिपिंडे ( Antibodies ) निर्माण केली गेली आहेत . ही सर्व प्रतिजने ( P. Falciparum ) पासून तयार केलेली आहेत .

२ ) डासांच्या लाळेमधून माणसाच्या शरीरात शिरणाऱ्या Circumspores वा Sporozoites पासून तयार केलेली प्रथिने ( Proteins ) प्रतिजन म्हणून वापरून त्याविरुद्ध ( CSP Antigen ) प्रतिपिंडे तयार केली गेली . ह्या प्रतिपिंडांची योजना यकृतामध्ये परोपजीवी शिरू शकणार नाहीत व त्यातूनही थोडे ( Sporozoites ) चकवून यकृतात शिरलेच तर त्यांचा नायनाट ही प्रतिपिंडे व शरीरातील अभयत्व देणाऱ्या T. lymphocytes पेशी करतील या भूमिकेतून आखली होती . या प्रयोगातून Sporozoites निकामी ठरल्यानंतर पुढच्या स्थितीतील परोपजीवी निर्माणच होणार नाहीत हा हेतू होता . परंतू या पद्धतीच्या लसीला शरीरातून योग्य प्रतिसाद मिळाला नाही . यामुळे यात नवीन तांत्रिक बदल केले गेले आहेत .

३ ) CSP Antigen व Hepatitis B Virus ( एका पद्धतीचे कावीळीचे विषाणू ) ज्याचा वाहक म्हणून उपयोग करून लस बनविण्यात आली आहे .

४ ) परोपजीवांतील जनुकांमधील DNA , रासायनिक वाहक , आणि T. lymphocytes या तिघांच्या मदतीने प्रतिबंधकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे .

५ ) Pattrraya लशीमध्ये परोपजीवांमधील विविध प्रथिनांचे मिश्रण ( Cocktail ) बनविले आहे ज्यामध्ये 35KD , 55KD , 83KD असे प्रतिजनांचे मुख्य घटक आहेत . या विरुद्ध तयार झालेली प्रतिपिंडे तांबड्या रक्तपेशींभोवती ढालीसारखा पडदा निर्माण करतात ज्यायोगे परोपजीवांना तांबड्या रक्तपेशीत शिरताच येत नाही . या पद्धतीप्रमाणे Glaxo SKF कंपनीने Mosquirix नावाची लस तयार केलेली असून आतापर्यंत याच्या निर्मितीसाठी ३०० दशलक्ष डॉलर्स खर्च झालेला आहे . प्राथमिक प्रयोग अफ्रिकेतील लहान मुलांवर करण्यात येत असून ५५ ते ६० टक्के यश हाती येईल असा कंपनीचा दावा आहे .

६ ) भारतात हैद्राबाद येथील Bharat Biotech मधील शास्रज्ञ डॉ . चेतन चिटणीस यांनी गेली १० वर्षे या विषयावर सखोल संशोधन केलेले आहे . परोपजीवी कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींना भेदतात . या संशोधनावर आधारित ह्या लसीची निर्मिती केलेली असून २०१२ सालापर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे . या त्यांच्या बहुमोल कामाबद्दल Infossys या कंपनीने २०१० मधील ५० लाख रुपयांचे विज्ञान पारितोषिक या लस संशोधनासाठी दिले आहे .

७ ) परोपजीवांचा मनुष्य – डास – मनुष्य हा प्रवास खंडित करण्याचे महत्त्वपूर्ण काम लसी मार्फत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालू आहे . ह्या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे मलेरिया झालेल्या रुग्णाला ही लस टोचल्यावर त्याचे परिणाम त्याच्या शरीरात न होता , त्या रुग्णाला जे डास चावतील त्यांच्यावर होऊन मलेरियाच्या परोपजीवांचे जीवनचक्र थांबविण्यात यश मिळेल

लस निर्मितीतील संभाव्य अडचणी अशा आहेत .

१ ) मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींवर पोसले जात असताना या परोपजीवांच्या भोवती अतिशय पातळ प्रथिनांचे आवरण निर्माण होते . त्याचप्रमाणे प्रत्येक परोपजीवाच्या आवरणात सूक्ष्म स्वरूपातील रासायनिक विविधता असते . या विविधतेसाठी लागणारा रासायनिक बदल हा परोपजीवांमधील जनुकांमार्फत दिला जातो . या समस्येमुळे एकाच रासायनिक सूत्राचे प्रतिजन बनविणे कठीण असल्याने लस बनविण्यात तांत्रिक अडचणी उत्पन्न होतात .

२ ) प्रतिजनांमधील विविधतेमुळे शरीरात तयार होणारी प्रतिपिंडे तयार होतानाच कमकुवत असतात . त्यांची रक्तातील पातळी कायम न राहता हळूहळू कमी होत जाते व क्षमताही कमी होते .

३ ) परोपजीवांच्या गुणसूत्रात विविध औषधामुळे सतत रासायनिक बदल होत असतो .

४ ) मलेरियाचे परोपजीवी शरीरात वाढत असताना काही वेळा ते एवढ्या मोठ्या संख्येने तयार होतात की औषधांचा मारा तिथे अपुरा पडतो . त्यामुळे त्यांचे उत्पादन पूर्णपणे थांबविण्यात औषधे असफल ठरतात . यामधूनच परोपजीवांची तयार होणारी नवी पिढी औषधांना तर प्रतिसाद देत नाहीच परंतु वापरण्यात येणाऱ्या लसीचा शरीरातील अभयत्वासाठी होणाऱ्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणते .

आजमितीला निसर्गाने परोपजीवांना झुकते माप देत लस निर्मितीच्या कार्यक्रमात अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत .

मलेरियावरील प्रभावी लस निर्मिती – ऑक्टो . २०११

ग्लॅक्सो SKF कंपनीचे प्रमूख वैज्ञानिक डॉ . जो . कोहेन यांनी RIS , S / AS02A या नावाची लस मलेरियासाठी शोधून काढली आहे . या लसीचा उपयोग अफ्रिकेतील ५ ते १७ महिन्यांच्या ६००० बालकांमध्ये करण्यात आला . परिणामी ५७ टक्के बालकांना मलेरियापासून मुक्तता मिळाली व शंभरातील ४७ मुलांना झालेल्या मलेरियाची तीव्रता अतिशय कमी स्वरूपाची आढळली .

अफ्रिका खंडातील बर्कोना , फासो , गॅबॉन , केनिया , मालावी , मोझांबिक , टांझानिया अशा सात देशात अकरा ठिकाणी २ वर्षांच्या कालावधीसाठी चाचण्या घेण्यात आल्या . अशा या चाचण्यांच्या निरीक्षणामधून निघालेल्या सकारात्मक निष्कर्षांमुळे मलेरिया विरुद्ध निघालेली पहिली लस अशी जगन्मान्यता या लसीला मिळाली आहे . दहा वर्षांच्या अथक प्रयत्नातून या लसीचा शोध लावण्यात आल्याने आता मलेरिया निर्मूलनासाठी अंतिम दरवाजा उघडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे . २०१५ सालापर्यंत जगभर ही लस वापरण्यास सुरवात होईल असा ठाम विश्वास डॉ . जो कोहेन यांनी व्यक्त केला . आजपर्यंत कोणत्याही परोपजीवाविरुद्ध लस निर्मिती झालेली नसल्याने जगभरातील मनुष्यप्राण्याला पछाडणाऱ्या मलेरिया या रोगाविरुद्ध लस मिळाल्याचे सांगताना डॉ . कोहेन यांचे डोळे पाणावले होते . पुढच्या टप्यातील चाचणी १५४६० नवजात बालकांमध्ये घेतली जात आहे . तीन वेळा क्रमाने दिल्या जाणाऱ्या या लसीला इतर रोगांसाठी दिल्या जाणाऱ्या लसींसोबत देण्याची योजना आखली गेली आहे . लस शीतपेटीत ठेवण्याची गरज आहे . सर्वात मुख्य समस्या ही लसीच्या किमतीशी निगडीत आहे . जोपर्यंत १०० टक्के यश येत नाही तोपर्यंत देणगी दाते पुढे येण्यास कचरतात . परंतु आजच्या या निष्कर्षांमुळे त्यांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकतेत बदलत आहे , अर्थात हेही नसे थोडके ! उदाहरणार्थ बिल गेट फाउंडेशन सारखी श्रीमंत संस्था या उपक्रमाला मदत देण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे .

या पार्श्वभूमीवर आमच्या मुंबई शहरातील ही बातमी वाचा .

जुहू गल्ली , मुंबई येथे ३०० मुलांना मलेरियाविरुद्ध लस देण्याची फसवेगिरी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे . अजूनही बाजारात जी लस उपलब्धच नाही अशा लसीचे इन्जेक्शन मुलांना देण्यात आले व सोबत बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत्येक मुलाला दिले गेले . त्यानंतर कांही मुलांच्या पालकांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना ही प्रमाणपत्रे दाखविली व त्यातून हा घोटाळा उघडकीला आला आहे . मुले मलेरियापासून पूर्णपणे मुक्त झाली आहेत अशी पालकांची चुकीची समजूत करून देण्यात आली होती .
– ( Midday या वृत्तपत्रातील १० नोव्हेंबर २०११ मधील बातमी ) A80 खरे तर लस बाजारात येण्यास किमान दोन वर्षे तरी लागतील.

–डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..