नवीन लेखन...

मैत्र पत्रांचे – १

हे आज काय नवीन ?
असा प्रश्न मला तुमच्या चेहऱ्यावर स्वच्छ दिसत आहे .
त्याचं उत्तर देणारच आहे . पण त्यासाठी थोडं पाठी जायला हवं .
नेमकं साल सांगायचं तर १९८५ .
म्हणजे माझी पहिली कादंबरी पुस्तक रूपानं प्रसिद्ध झाली , ते वर्ष .

आयुष्यात अनेक वेळेला आपण अनेक गोष्टींची वाट पहात असतो .
माणसं , नाती , वेळ , संधी अशा अनेक गोष्टी …
१९८५ पासून माझ्या आयुष्यात या सगळ्याबरोबर आणखी एका गोष्टीची भर पडली .
ती गोष्ट म्हणजे वाचकांची पत्रे आणि ती घेऊन येणारे पोस्टमनदादा .

त्याचं आज काय एवढं ?
असं कुणालाही वाटेल . पण त्यासाठी माझ्या अंगी असणारा एक विशेष गुण माहीत करून घ्यावा लागेल .
अव्यवस्थितपणा !
हा तो गुण .
मला काही बाबतीत अव्यवस्थितपणा प्रचंड आवडतो .
म्हणजे कपडे कपाटात ठेवणे .
मी काही सेकंदात ते कपडे , कपाटात कोंबून भरू शकतो .
त्यात मजा आहे .कारण दार उघडल्यावर एकेक कपडा घरंगळून खाली पडत असतो आणि त्यात एक छान काव्य असतं . उत्सुकता असते . एखाद्या पदार्थाची रेसिपीच जणू .
हे आपलेच कपडे आहेत याचा नव्यानं शोध लागल्याचा निरागस , ताज्या भाजीचा सुवास . चुरगाळलेपणाचा मसाला , फोडणीत मोहरी , मिरच्या टाकल्यानंतर होणारा तडतड आवाज हा आपल्या पत्नीचा आहे , हे विसरण्याचा गनिमी कावा …
( ही रेसिपी आपल्या अनुभवातून अधिक सकस आणि रुचकर होऊ शकेल ).
खूप गंमत असते या अव्यस्थितपणात .
शिवाय जुन्या फॅशनचा नव्याने शोध लागतो ती गोष्ट वेगळीच .
( माझी एक जुनी जीन पॅन्ट , जिचा बॉटम २८ इंच होता , ती सापडत नव्हती . नंतर कळलं की दहा किलो धान्य आणण्यासाठी मी जी निळ्या रंगाची पिशवी वापरत होतो , ती माझीच सुप्रसिद्ध पॅन्ट होती ! )

असो .
हे अव्यवस्थितपणाचं आणि मैत्र पत्रांचं काय प्रकरण आहे , हे समजून घ्यायचं असेल तर आणखी एक अव्यवस्थितपणा सांगायला हवा .
माझ्या कपाटात असणारी पुस्तकं , पत्रव्यवहाराच्या फाईल्स हे सगळं मी कसंही रचून ठेवलं आहे .
हवं ते पुस्तक , हवा तो संदर्भ आणि वाचकांची आलेली पत्रं चटकन हाती लागली तर त्यात मजा नाही .
थोडी शोधाशोध , थोडा आरडाओरडा आणि मग हवी ती गोष्ट सौभाग्यवतीने वा मुलांनी शोधून दिली की जितं मया असं म्हणून ( मनातल्या मनात ) सुखवण्यात जी मजा आहे ती अचूकपणे पटकन वस्तू मिळण्यात नाही . जिज्ञासा नाही , आनंद नाही, समाधान नाही आणि जिवंतपणाचं लक्षण नाही .

आज असंच काहीसं वाटलं .
मनात आलं आपण १९८५ पासून आलेली वाचकांची पत्रं नजरेखालून घालू या .
आणि सगळे सोपस्कार पार पडून पत्रव्यवहाराच्या नेमक्या फाईल्स माझ्या हाती आल्या .
त्या फाईल्स बघताना लक्षात आलं की हे समाज माध्यमावरच्या माझ्या सुहृदांना वाचायला द्यायला हवं .

त्यासाठी हा प्रपंच !

आत्ताच्या काळातील लाईक्स , कमेंट्स , शेअरच्या जमान्यात फॅनमेल ही संकल्पना कालबाह्य वाटेल . पण याच वाचकांच्या पत्रव्यवहारावर आम्हा लेखकांची पिढी जोपासली गेली आहे .
असंख्य पत्रं .
स्तुती करणारी . टीका करणारी .
जिव्हाळा व्यक्त करणारी . राग राग करणारी .
ज्येष्ठांची , समवयस्क असणाऱ्यांची .
महाराष्ट्रातील . महाराष्ट्राबाहेरील वाचकांची . परदेशस्थित वाचकांची .

असंख्य पत्रं आहेत माझ्यापाशी .
त्यातील निवडक पत्रं तुमच्यासाठी सादर करणार आहे.

अर्थात आपल्याकडून प्रतिसाद अपेक्षित आहे .

एक वेगळं विश्व त्यातून अनुभवू शकाल तुम्ही . आणि हो , पोस्ट आवडली तर सर्वांना पाठवायला हरकत नाही , अर्थात नावासह . आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांना प्रेरणासुद्धा मिळू शकेल .

तुम्हाला काय वाटतं , ते कळवायला , प्रतिसाद द्यायला विसरू नका ..

———
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..