नवीन लेखन...

काश्मीर एक जाणीव – भाग एक

ऍपल व्हॅलीकडे वळणारी आमची बस अचानक थांबली .
आणि बसमध्ये शांतता पसरली .
चेष्टा , मस्करी , गाणी आणि गप्पा एकदम थंडगार पडल्या .

हृदय थांबल्याचा क्षणभर भास झाला .

चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस , या दुर्दैवी दिवसाची अचानक आठवण झाली .

आम्ही त्याच रस्त्यावरून निघालो होतो , ज्या रस्त्यावर आत्मघातकी अतिरेक्यांनी , शूर जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर , स्फोटकांनी भरलेली कार आदळवली होती आणि चाळीस जवान हुतात्मे झाले होते .

माझ्या मनात क्षणार्धात सगळा प्रसंग उभा राहिला आणि मायनस तीन इतकं तापमान असूनही घामानं भिजायला झालं . कारण आम्ही बसच्या दाराजवळच्या सीट वर बसलो होतो . आणि बस अचानक थांबवली गेली होती .

सकाळी श्रीनगर सोडल्यावर पहलगामला जाताना हायवे च्या दोन्ही बाजूला पाचशे , पाचशे मीटर अंतरावर रायफलधारी जवान दिसत होते . मिलट्रीच्या गाड्या , ट्रक्स , जागोजाग होणारं चेकिंग मी पहात होतो . पेट्रोलिंग का सुरू आहे हे कळत नव्हतं .
कदाचित काश्मीर मध्ये असलेल्या मिलट्रीच्या व्यवस्थेचा हा भाग असावा अशी मी मनाची समजूत घातली होती .
काश्मिरच्या जनतेला आणि येणाऱ्या पर्यटकांना संरक्षण देण्याचा हेतू असावा असेही वाटले होते .

पण ऍपल व्हॅलीकडे वळणारी बस अचानक थांबली आणि …

अमृता ट्रॅव्हल्स च्या अजित करंदीकर यांचा उत्साह अमाप होता .
त्यामुळे ऍपल व्हॅली आपण पाहायची आहे , तिथे सफरचंद नसतील पण तिथलं सौंदर्य बघायला मिळेल . हे आणि असं काही काही सांगून त्यांनी आमची उत्सुकता नेहमीप्रमाणे वाढवली होती . त्यांची नेहमीची कॉमेंट्री सुरूच होती . ” रस्त्याच्या या बाजूला हे चिनार आहेत . त्या बाजूला अक्रोड आहेत . आता समोर बघा , हायवे एकदम चकाचक आहे …”

पण बस अचानक थांबली . आणि त्यांची कॉमेंट्री पण थांबली .

श्वास अडकला .
काही क्षणच .
पण तितक्यात काही सैनिक आमच्या बस जवळ आले .

” तुम्ही व्हॅली त जाऊ नका , सगळी परिस्थिती धोकादायक आहे . अतिरेक्यांनी टुरिस्टना टार्गेट करायची धमकी दिली आहे आणि आम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे . तेव्हा हायवे वरून सरळ पुढे चला .”

त्यांनी चक्क आम्हाला ऑर्डर दिली .
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आणि व्हॅलीचा नाद सोडून आम्ही पुढे निघालो .

बसमधून दिसणारं काश्मीरचं निसर्गसौंदर्य पाहताना ‘ त्या दहा पंधरा मिनिटांचं ‘ बहुधा सर्वांना विस्मरण झालं .
पण माझ्या मनात नेमकी तीच दहा पंधरा मिनिटं उलट सुलट होऊन घुसत राहिली .

ते जवान देवदूतच वाटले त्याक्षणी .
आणि त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटला .
बस निघताना मी त्या जवानाला नमस्कार केला .
तो जवानसुद्धा आमच्याकडे बघून निरोपादाखल हात हलवित होता . त्याही स्थितीत त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान मला पहायला मिळालं .
आणि मन भरून आलं .
देवाचे आणि जवानांचे आभार मानत आम्ही पुढे निघालो …

किती विलक्षण होतं सगळं .

खरं म्हणजे काश्मीर मध्ये प्रवास करताना , निसर्गसौंदर्य पाहताना दोन डोळे देखील अपुरे वाटतात .

पण आज मला काही वेगळंच जाणवत होतं .
मी गप्प गप्प होतो .
सगळ्यांना वाटत होतं की माझी तब्येत बरी नाही , म्हणून मी गप्प होतो . काही अंशी ते खरं होतं .
पण मला मात्र , प्रत्यक्ष दिसणाऱ्या काश्मीरपेक्षा अबोल काश्मीरचं रूप जाणवत होतं . म्हणून मी गप्प होतो .

– पण हे फार पुढचं झालं .

– मुंबईहून श्रीनगरला विमानाने जाताना सहप्रवाशांपैकी आम्हा नऊ जणांना जम्मूत उतरावं लागलं .
त्याचं कारण वेगळंच होतं .

ते पुढच्या भागात सांगतो …

पण काश्मिरची एक वेगळी जाणीव जम्मूमध्ये उतरताना झाली , हे नक्की !

( क्रमशः)

– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..