नवीन लेखन...

डोंगरातला झरा

टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता .
उभं राहून अभिवादन करणारी गर्दी खाली बसत नव्हती .
निवेदक वारंवार विनंती करीत होता , पण गर्दी अनावर झाली होती .
विशेष म्हणजे सगळं व्यासपीठ उभं राहून टाळ्या वाजवत होतं .

– आणि निओफ्लाय व्हीलचेअरवर बसलेला अभिराम , भांबावून गेला होता .
भांबावल्या नजरेनं तो सर्वांकडे पहात होता .
आणि कौतुकभरल्या नजरेनं सगळे त्याच्याकडे पहात होते .

हे सगळं कशासाठी चाललंय , हेच त्याला कळत नव्हतं . अशा सत्काराची , कौतुकाची खरंतर गरज नव्हती . फार मोठं काही केलंय , मोठा डोंगर पालथा घातलाय असंही काही नव्हतं.
मग हे सगळं का ? कशासाठी ?
हाच भुंगा त्याचं डोकं कुरतडत होता .

– सैन्यात जाण्याचं आकर्षण अगदी लहानपणापासून होतं . आणि जाणत्या वयात त्या आकर्षणाला ध्यास लागला तो निरीक्षणाचा , तयारीचा . मिलट्री स्कूल , एन सी सी कॅम्प , पोलीस परेड ग्राऊंडवरच्या परेड , सव्वीस जानेवारीचं दिल्लीतील संचलन… सगळं सगळं डोळे भरून पाहायचा तो . स्वतःला त्या जागी कल्पून परेड करायचा . दहा बाय दहाच्या घरात .
भिंती त्याला हसायचा . फाटके कपडे हसायचे . मोलमजुरी करणारे आई बाबा हसायचे . पण तो सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचा .

– सगळ्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात , एके दिवशी रस्त्यावरून चालताना फोर व्हीलरने त्याला उडवलं …

आणि हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळताना त्याच्या लक्षात आलं , आता आपण कायम व्हीलचेअरवर असणार आहोत . आपलं करिअर कायम व्हीलचेअरवर .

नंतरचे त्याचे दिवस पडझडीचे होते .
खंत .
नैराश्य .
परावलंबनाच्या जाणिवेचा मनाला लागलेला भुंगा .
म्हाताऱ्या आईवडिलांचे कष्ट .
अस्वस्थता , त्यातून येणारी पोकळी .
आणि जगण्याचा निरर्थकपणा.

व्हीलचेअरवर बसल्यावर खोलीच्या दारातून दिसणारा आकाशाचा तुकडा आणि आईच्या डोळ्यातून ठिबकणाऱ्या आसवात भिजलेला भाकरीचा तुकडा …

त्याला त्या दोन तुकड्यांची सांगड कशी घालावी हेच उमगत नव्हतं .
पण भाकरीच्या तुकड्यासाठी आकाशाची हाक ऐकायला हवी असं त्याला मनोमन वाटत होतं .

रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं निरीक्षण करणं हा त्याचा आता छंदच झाला होता .
कोण काय करतं , जगण्यासाठी कोण कसं धडपडत या सगळ्याचं निरीक्षण करता करता त्याला अचानक जाणीव झाली .
आपण व्हीलचेअर वरून सकाळी , संध्याकाळी घरोघरी पेपर टाकू शकतो .
किंवा व्हीलचेअर वरून चहा विकू शकतो .
किंवा शाळेच्या गेटबाहेर ,
किंवा गार्डनच्या गेटबाहेर गोळ्या , बिस्किट्स विकू शकतो .
किंवा मिनरल वॉटर च्या बाटल्या विकू शकतो .
किंवा हे सगळं वेगवेगळ्या वेळी , वेगवेगळ्या ठिकाणी …

आता त्याला कमालीचा उत्साह आला . आकाशाचा तुकडा हाती आल्याचा भास झाला .

पण पुढच्याच क्षणी तो दाणकन जमिनीवर आला .

हे सगळं करायचं तर हाताशी थोडं तरी भांडवल हवं . वस्तू ठेवता येतील अशी व्हीलचेअर हवी . तिला इंजिन हवं . जरा तरी चांगले कपडे हवेत …

कोण देणार हे ?
मग त्याची फिरंती सुरू झाली . चौकशीसाठी , मदतीसाठी .
बँका , दिव्यांगासाठी साठी असणाऱ्या यंत्रणा …

आपापले राजकीय झेंडे आणि कॅमेरे घेऊन काही राजकीय पक्षसुद्धा पुढे आले .
त्यांचा राजकीय अजेंडा राबवायला सोयीचा माणूस दिसतोय म्हणून .
पण त्याने त्यांना नम्रपणे नकार दिला .

पंधरा वीस दिवस तो वेड लागल्यासारखा फिरत होता .
मग्रूर नोकरशाही , नियमांची बेडी पुढं करून त्याला मदत नाकारणाऱ्या आस्थापना , फिदीफिदी हसणारे समवयस्क आणि खच्चीकरण करणाऱ्या समाजातील नारोशंकराच्या नकारघंटा …स्वाभिमान , बाणेदारपणा यांची पदोपदी कसोटी पाहणारा काळ…

अभिराम पुन्हा हताश झाला .
हतबल झाला .

कोलमडून पडलेला अभिराम उदास होऊन झाडाच्या सावलीत व्हीलचेअर वर बसलेला असताना देवदूत धावून यावा तसा ‘ तो ‘ आला .
‘ त्या ‘ च्या हाती पाण्याची बाटली होती . व्हीलचेअर वरच्या तरुणाला तहान लागली असेल म्हणून ‘ तो ‘ कार मधून उतरून आला होता .
अभिरामने नकार दिला . पण ‘ तो ‘ जिद्दी होता .
‘ त्याने ‘ चौकशी केली , बोलतं केलं .
अभिरामनं सगळं सांगून टाकलं .

” हे बघ मित्रा , मी फार मोठा पैसेवाला नाही , पण तू उभा रहावास म्हणून मी तुला नक्कीच मदत करीन . देवाच्या कृपेनं तेवढा पैसा आहे माझ्याकडे . तुला हवी तशी व्हीलचेअर , कपडे , विक्रीसाठी प्रारंभिक वस्तू सगळं देईन मी , पण एका अटीवर . मी तुला मदत करतो आहे हे कुणाला सांगायचं नाही , माझी जाहिरात करायची नाही , आणि दिलेल्या मदतीची परतफेड करायची नाही . आपली ओळख नाही , पण तरीही मित्र म्हणून आपण आजपासून नवं नातं सुरू करू या , हे माझं कार्ड , उद्या आपण भेटू .”

‘ तो ‘ निघून गेला आणि अभिराम बघत राहिला .

– पुढच्या काही दिवसात त्याला हवी तशी निओफ्लाय व्हीलचेअर मिळाली .
आणि अभिराम चं नवं आयुष्य सुरू झालं .

महिन्याभरानं अभिराम ‘ त्याच्या ‘ ऑफिसात पोहोचला आणि एक हजार रुपये त्याच्या पुढ्यात ठेवले .
‘ तो ‘ बघत बसला.
” हे काय ? हे पैसे मी घेणार नाही . मी मदत केली होती . कर्जाऊ रक्कम दिली नव्हती . मैत्री माणुसकी म्हणून काही आहे की नाही ? …”
अभिरामनं त्याला थांबवलं .
” तुम्ही दिलेल्या मदतीचा मी अपमान करत नाही . ही रक्कम परतफेड म्हणूनही आणली नाही . माझ्या आई बाबांच्या शिकवणुकीचा हा भाग आहे . डोंगरावर पडणारा पाऊस , डोंगर साठवून घेतो आणि मग केव्हातरी झऱ्याच्या रूपाने पाणी बाहेर येतं. ते अनेकांची तहान भागवत असतं . झरा वाहता होतो . पुढे त्याला अनेक झरे येऊन मिळतात . मग त्याची नदी होते . आणि असंख्याना जगवू लागते . मला हेच म्हणायचं आहे . मी आता स्थिरावेन, पण माझ्यासारखे अन्य कुणी असतील त्यांना मदतीची गरज असेल . त्यावेळी तुम्ही त्यांना हे पैसे देऊ शकाल . म्हणून घ्या . नाही म्हणू नका . झरा वाहू लागला आहे , तो असाच पुढं जाऊ द्या . मी दरमहा तुम्हाला पैसे आणून देत जाईन माझ्या कुवतीप्रमाणे .”

‘ त्याला ‘ काही कळायच्या आत अभिराम निघून गेला .

‘ त्याच्या ‘ ऑफिस मधल्या लोकांनी हे सगळं ऐकलं होतं.
ते सोशल मीडियावर कुणीतरी टाकलं . ते खूप व्हायरल झालं .

आणि संवेदनशील संस्था एकत्र येऊन त्यांनी अभिरामच्या सत्काराचा घाट घातला , निःस्वार्थी मदत करणाऱ्या ‘ त्याच्याच ‘ हस्ते .

— अभिराम अजूनही भांबावलेल्या स्थितीत होता .
कुणीतरी त्याच्या हाती माईक आणून दिला . आणि मनोगत व्यक्त करण्याची आग्रहपूर्वक विनंती केली .

“…मला बोलता येतं नाही , पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो . शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा . आपण कृतीतून झरा होऊ या . आपल्याला अनेकजण मदत करतात . मूलभूत गरजा भागवण्यासाठी अनेकजण पुढे येत असतात . समाज , शासन , सेवाभावी संस्था … आपण मात्र आणखी कोण काय काय देतोय याची वाट बघत बसतो . फुकट मिळणारी प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारत असतो , मग त्याची गरज असो वा नसो . हे चांगल्या माणसाचं लक्षण नाही . त्यापेक्षा मला जेवढं मिळालं आहे , त्यातून गरज भागली की आपण दुसऱ्याची गरज भागवण्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे . झरा वाहता असला पाहिजे , म्हणजे सगळ्यांचीच तहान भागेल . मी जे काही केलं ते अत्यंत क्षुल्लक आहे , पण आपण सर्वांनी दखल घेतली यात भरून पावलो मी …”

तो बोलत होता .
प्रेक्षागृहात शांतता पसरली होती .
आणि ती शांतता सर्वांना अंतर्मुख करत होती .
( सत्य घटनेवर आधारित )

डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
____

आवडल्यास अभिप्राय द्यालच .
नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही . त्यातून समाज जागृती होऊ शकेल .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..