विड्याची पद्धत पार पूर्वापारपासून चालत आलेली आहे. आजही समाजात अनेक रीतीरिवाजांत विड्याचं स्थान अबाधित आहे.
पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विड्यात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विड्याला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी.
नागवेली ही वनस्पती पायपरेसी म्हणजे मिरीच्या कुलातील आहे. नागवेलीच्या पानांतील बाष्पनशील तेल उत्तेजक व कृमिनाशक आहे. बाष्पनशील तेलामुळे विड्याला त्याचा तिखट-तुरटपणा आणि सुवास आलेला असतो. यामुळेच विडा खाल्ल्यावर तोंडाची दुर्गंधी जाते. प्रदेशानुसार, जातीनुसार पानातील रसायनांचे प्रमाण कमी-अधिक असते. पानांतील बाष्पनशील तेल, शर्करा व चोथ्याचं प्रमाण यांच्या प्रमाणावरून पानाची प्रत ठरते.
पानात व्यसन लागेल असं कोणतंही रसायन नाही. पण पानाचं व्यसन लागतं ते सुपारी आणि तंबाखूमुळे. जेव्हा सुपारी कच्ची असते तेव्हा सुपारीमध्ये अल्कलॉइड्स जास्त असतात. त्यामुळे ओली ताजी सुपारी खाल्ल्याने गरगरू लागतं. सुपारी वाळत जाते तसतसे सुपारीच्या आतल्या पांढऱ्या गाभ्यात अल्कलॉइड्स जमा होत जातात. या गाभ्याप्रमाणे सुपारीची प्रतवारी ठरवली जाते. पांढरा गाभा जेवढा जास्त तेवढी सुपारीची प्रत वरची समजली जाते. प्रथमच सुपारी- चुन्यासह पान खाणाऱ्या व्यक्तीला मळमळू, गरगरू लागते. सुपारीत क्रियाशील अल्कॉइडस् उदा. अर्कोलिन, अरेकाइडाइन, गावासाइन, गावाकोसाइन असतात. त्यांच्यामुळे सौम्य नशा येते. यात चुना मिसळला की त्यांची परिणामकारकता वाढते. विशेषतः अर्कोलिन मृदू स्नायूंवर परिणाम करते. जसजसं चावत जावं, तसतसं पानातून बाहेर पडणाऱ्या बाष्पनशील तेलामुळे व निर्माण होणाऱ्या रसायनांमुळे उत्साही वाटू लागतं. सततच्या खाण्यामुळे त्याची सवय लागते. नागवेलीच्या पानामुळे नव्हे तर तंबाखू आणि सुपारीच्या सततच्या खाण्यामुळे गालाचा-जिभेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
-चारुशीला जुईकर (मुंबई)
मराठी विज्ञा परिषद


Leave a Reply