सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. अनेकांना सुख कळले पण सुखाच्या पायवाटा नाही कळल्या. सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते.
सुख मृगजळाप्रमाणे असते त्याच्यामागे जेवढे तुम्ही धावाल तेवढी तुमची दमछाक होते. आयतं सुख मिळालेल्या सुखांपेक्षा संघर्षातून आलेलं सुख मनाला वेगळाच आनंद देऊन जातं. सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास आयत्या सुखाने दिला नाही तर दुःखांनीच गौतम बुद्ध व त्यांचं तत्वज्ञान अवतरलं. ज्यांना सुख कळले त्यांना जीवन कळले.
सुखाचे क्षण दंवबिंदू सारखे असतात. एखादी अवस्था एखादे क्षण जगणं म्हणजेच सुख कळणे होय. दवाबिंदू आपल्या अस्तित्वाचा इतिहास मागे सोडत नाहीत. सुख अत्तराच्या कुपीत ठेवलं तर आठवणीच्या सुगंध दरवळतो. एखादा ध्यास मनात ठेवून सतत कार्यरत राहीलं तर सुख सुद्धा आपल्याकडे पायघड्या घालत येतं.
पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्यांना सुख हे मृगजळाप्रमाणे हुलकावणी देतं. प्रत्येक गोष्टीमध्ये कम्फर्टझोन पाहण्यामध्यें माणसे संघर्षच विसरली. पैसा आला की माणसे चार चाकी मधून हिंडतात, चालणे जवळ जवळ संपलेच. घरात पुन्हा सायकल, ट्रेडमिल आणून ठेवतात. आम्हाला हे सगळं कळतं पण वळत नाही. काही ठिकाणी काही विशिष्ट वर्गामध्ये पिझ्झा बर्गर यांची रेवचेलअसल्यामुळे पौष्टिक आहार मिळतच नाही आणि मग आयुष्याच्या उत्तरार्धात गोळ्या. इंजेक्शन. प्रोटीन पावडर याच्यावर माणसे जगत आहेत. सुख मिळवण्याची साधने कळालीं पण सुख कुठे कळले?
सुख कळले पण भोगणे कळले नाही. अनेकांच्या घरात दोन-चार गाड्या असतात पण ते चालवू शकत नाहीत हे दुःखद आहे.
अनेकांनी पैसा भरपूर कमावला पण पैसा कमविण्याच्या नादात स्वतःच्या शरीराकडे लक्षन देणं, प्रकृतीही ची हेडसाळ करणं, हव्या त्या वस्तू, महागडे अन्न पदार्थ आणू शकतात पण खाऊ शकत नाहीत. कुठे आलं सुख?
पैसा कमावण्याच्या नादात अनेकांनी सुख गमावण्यात धन्यता मानली. सुखाचा कोटा पूर्ण करण्यासाठी अनेकांनी कोटा येथे प्रवेश घेतला व आत्महत्येला जवळ केले.
सुखात स्पर्धा आली की समाधान संपतं. जगतांना ज्या ज्या जाणिवा आपण भोगतो त्या आपल्या व्यक्तिमत्वात उतरतात. चांगलं खाणं, भोगणं,शानशौकीत राहणं, उपभोग घेणं या अनेकांच्या सुखाच्या कल्पना आहेत.
दुसऱ्यासाठी जगतांना सुखाचा परिघ जास्त विस्तारतो. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे सामर्थ्य आपल्यात यायला हवं. सुखाची अनुभूती स्वतःच्या सुखात नसून संतांनी जसं लोककल्याणातच आपल्या जीवनाची यथार्थता पणाला लावली.म्हणून त्यांच्या पायवाट्यानेच आज अनेक जण मार्गक्रमण करत सुख शोधत शोधत जीवनाचा प्रवास करत आहेत. संतांनी स्वतः त्यागमय जीवन जगून
सद्विचार व सदआचरणाचे धडे दिल्यामुळे अनेक जण सुखी व समाधानी आहेत. जीवनातील स्पंदनं टिपतां यायला हवीत. वाऱ्यामुळे हालणाऱ्या पिंपळाच्या पानाची सळसळता अनुभवता यायला हवी.प्रेमातली हृदयाची धडधड, आईचं वात्सल्य हीच सुखाची परिमाणं आहेत.
सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे हे अनुभवता यायला हवे.इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे हा अनुभव घेता यायला हवा.
सुख कळायला दव बिंदू होता आलं पाहिजे. अस्तित्व क्षणिक असलं तरीही नैराश्याचा कुठेही मागमूस नाही.
दुसऱ्यांना सुखावह वाटावं असं जंगलं पाहिजे.आज फिर जीने की तमन्ना है आज फिर मरने का इरादा है या दोन्हीचं भान ठेवून जगता यायला हवं.
सुखासुखी आयुष्य जगायचं सोडून दीनदुबळ्यांसाठी स्वतः च्या आयुष्याची पर्वा न करणार्यांनाच सुख कळलें.
स्वतःसाठी जगणाऱ्यांना सुख कुठें कळतं?
आपल्यावर हल्ला होणार हे माहीत असूनही लोकांना अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी व परंपरा, कर्मकांड यातून बाहेर काढणारे नरेंद्र दाभोलकर यांना खरे सुख कळले होते, स्वतःचे नव्हें तर लोकांचे. दुःखं माणसाला घडवतं.
विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी सुखलोलुपता दूरच ठेवायला हवी. शिस्तीत आयुष्य घालवले तर पुढे सुखच सुख आहे.
आजच्या विद्यार्थ्यासमोर प्रसार माध्यमे हात जोडून उभी आहेत. असंख्य प्रलोभनाच्या मध्ये विद्यार्थी आहे त्यात स्वतःला न गुंतू देता विद्यार्थी दशेला न्याय दिला तरच पुढे योग्य माणूस घडेल.तावूनसुलाखूनच व्यक्तिमत्व आकार घेतं.
तावूनसुलाखावून जे घडतात तेच सुखाचे हकदार होतात. अंतर्मनाची प्रेरणाच स्वतां स्वतः ला घडविते. प्रेरणेची पायवाट कधी कधी आपणही निर्माण करायची असतें.
डॉ.अनिल कुलकर्णी
९४०३८०६१५३
कोथरूड पुणे
सहजानंद सोसायटी ३७/१
४११०३८
Leave a Reply