नवीन लेखन...

बारावी…इंजिनिअरिंग आणि गाणे

त्याचबरोबर माझा बारावीचा अभ्यास सुरू झाला. हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते. कारण या बारावीच्या मार्कांवरच इंजिनिअरींगची अॅडमिशन अवलंबून होती. शाळेत अगदी पाचवीपासून विनय देवस्थळी, सुबोध दाबके, पंकज देवल, सुभाष देसाई, नितीन थत्ते असे माझे जवळचे मित्र बनलेले होते. बारावीतही आम्ही सगळे बरोबर होतो. अभ्यास एकत्र करत होतो. कॉलेजमधील मजाही एकत्रच अनुभवत होतो. बारावीत विनायक महाजनही आमच्या ग्रुपमध्ये सामील झाला. अनेकदा लहानपणापासूनचे आपले मित्र पुढे आयुष्यात थोडे दूर जातात आणि ती जवळीक रहात नाही. पण आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही सगळे मित्र आजही तितकेच जवळ आहोत. आमच्या बायका आणि मुलेही आता आमच्या ग्रुपमध्ये एकत्र आली आहेत. सुभाष देसाई मस्कतमध्ये स्थायिक झाला असला, तरी वर्षातून अनेक वेळा आम्ही एकत्र येतो. या सर्वांमध्ये गाणारा मी एकटा. त्यामुळे आमच्या सहलीत गप्पा आणि मैफिलीत माझे गाणे हा अविभाज्य भाग असतो. ह्या सर्वांचेच माझ्याइतकेच माझ्या गाण्यावर प्रेम आहे आणि खूप लहान असल्यापासून माझे गाणे ते ऐकत आले असल्याने माझ्या गाण्याच्या प्रवासाचे ते साक्षीदारच आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनांचा मी गांभीर्याने विचार करतो.

बारावीमध्ये आम्ही सर्वांनीच मनापासून अभ्यास केला. केलेल्या परिश्रमांचे फळ सर्वांना मिळाले. इंजिनिअरींगच्या अॅडमिशनसाठी माझे मार्क होते ९० टक्के. माझ्या सर्वच मित्रांना चांगले मार्क मिळालेच होते. त्यामुळे जवळ जवळ सर्वांनाच इंजिनिअरींगला अॅडमिशन मिळाली. मला माटुंगा येथील सुप्रसिद्ध व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्यूट म्हणजेच व्ही. जे. टी. आय. या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अॅडमिशन मिळाली. तीर्थरूप आई आणि विशेषतः तीर्थरूप भाऊंना फारच आनंद झाला. कारण व्ही.जे.टी.आय. समोरच्याच युडिसीटी या कॉलेजमधून केमिकल टेक्नॉलॉजी या विषयात त्यांनी एम. एस. सी. टेक ही डिग्री मिळवली होती. आता माझा प्रवास ठाण्याकडून मुंबईकडे सुरू झाला. हा प्रवास माझ्या गाण्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचा होता. माझ्या लहानपणी टीव्हीवर ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ नावाचा खास कार्यक्रम सादर होत असे. दर शुक्रवारी होणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेत्री तबस्सुम चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या मुलाखती घेत असत. त्यांचा पहिला प्रश्न ठरलेला असे. आप बंबई कब आये? तेव्हा या मुंबईत आल्याशिवाय कोणत्याही कलाकाराचे चालत नसे. आता इंजिनीयरींग शिकण्याच्या निमित्ताने मीही मुंबईत पोहोचलो. व्ही.जे.टी.आय.मध्ये सगळे हुषार आणि अभ्यासू विद्यार्थी असल्याने गाणारे कलाकार कमीच होते. त्यामुळे कॉलेजच्या व्ही.जे.टी.आय. टॅलेंड परेड या स्पर्धेत मी भाग घेतला आणि पहिले पारितोषिक मिळवले. पारितोषिकापेक्षाही माझा जास्त फायदा हा झाला की मला आमच्या कॉलेजतर्फे अनेक आंतरमहाविद्यालयीन गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान माझा आणखी एक फायदा या कॉलेजने करून दिला. मला विवेक दातार नावाचा एक चांगला मित्र मिळाला. जो अतिशय उत्तम हार्मोनियम वाजवित असे. शिवाय विवेक काळे सरांकडे माझ्या आधीपासून हार्मोनियम शिकत होता. गाण्यामुळे आम्ही एकदम जवळ आलो आणि आमची अतिशय दाट मैत्री झाली.

– अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..