नवीन लेखन...

व्यायामाचे महत्व

आयुर्वेद शास्त्रात , नित्य काही चर्या कराव्यात असा उल्लेख आहे . त्यातीलच एक नित्य कर्म म्हणजे व्यायाम होय . व्यायाम कधी करावा , किती करावा , कोणी करावा , कोणी टाळावा आदी सर्व मुद्दे आयुर्वेदात मांडलेले आहेत . त्याबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया .

‘शरीरायासजननं कर्म व्यायाम उच्यते । ‘ अर्थ – ज्या कर्मा / कर्मांमुळे शरीरात आयास ( श्रम ) उत्पन्न होतात , थकवा येतो , त्या – त्या उपक्रमांना व्यायाम म्हणतात . ही व्यायामाची शास्त्रीय परिभाषा होय .

व्यायाम कधी करावा – सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठून , मल – मूत्राचे विसर्जन करून , क्रिया आटपून , दंतधावन , अभ्यंग व स्नान केल्यावर व्यायाम करावा . म्हणजेच शरीरातील आधीचे मलरूपी टाकाऊ घटक शरीरातून निघून गेल्यावर अभ्यंग स्नानाने स्वच्छ व तजेला आल्यावर रिकाम्या पोटी व्यायाम करावा .

व्यायाम किती करावा – आयुर्वेदानुसार शरीराच्या क्षमतेच्या अर्ध्या प्रमाणात ( अर्धशक्ती व्यायाम ) व्यायाम करावा . हे कसे ओळखावे ? तर व्यायाम सुरू केल्यावर जेव्हा कपाळावर , काखेत , नाकावर , खांद्यावर वगैरे घाम येऊ लागला , थोडे थकल्यासारखे वाटू लागले , श्वासोच्छ्वासाची गती वाढली , तोंड कोरडे पडले आणि हृदय स्थानी वजन / जखडल्यावत वाटू लागल्या क्षणी अर्धशक्ती व्यायाम झाला असे समजावे . ही अर्धशक्ती प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न भिन्न वेळी उत्पन्न होऊ शकते . तसेच प्रकृतीनुरूप , वयानुरूप आणि स्वास्थ्याच्या निकषांवरही याचा कालावधी बदलतो . जो रोज व्यायाम करतो , त्याची ही क्षमता हळूहळू वाढू लागते . खूप RIGOROUS व्यायाम लगेच सुरू करू नये . प्रमाण हळू – हळूच वाढवावे .

व्यायाम विशेषत : वसंत ऋतूत , हेमंत ऋतूत व प्रावृद ( पावसाळी ) असते त्यावेळी करावा . तो सकाळच्या वेळेस व अनाशेपोटीच करावा . मध्यरात्री , मध्यान्ही , उन्हाळ्यात व पोट भरलेले असतेवेळी करू नये . व्यायामाने शारीरिक थकवा अपेक्षित आहे , मानसिक ताण / थकवा नाही . त्यामुळे ओढून ताणून अति व्यायाम टाळावा . बरेचदा स्टेशनवर चालत जातो , सकाळ – संध्याकाळ भाजी मार्केटला जाते वगैरे सांगून व्यायाम केल्याचा ‘ आभास ‘ निर्माण केला जातो . पण या दैनंदिन घरकामांना वा बाहेरील कार्यांना व्यायाम म्हणता येणार नाही . कारण यात दमछाक होणे , घाम येणे इत्यादी नेहमीच होते असे नाही .

व्यायामाने शरीर सुगठित होतेच , त्याचबरोबर MUSCLES ची ताकद , आणि लवचिकता इत्यादीही वाढते . धावणे , उड्या मारणे , दोरीच्या उड्या मारणे , पोहणे , चालणे , नियुध ( लढाई ) , बाहुयुध ( ARM WRESTLING / BOXING ) असे सर्व व्यायामाचे प्रकार शास्त्रात सांगितले आहेत .

व्यायाम कोणी करू नये १० वर्षाखालील मुला – मुलींनी आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठांनी वरील व्यायाम करू नये , पण सौम्य प्रमाणात नित्य हालचाली , योगाभ्यास केल्यास चालेल . गर्भिणीने , अति वार्तालाप करणाऱ्यांनी , जेवणानंतर , तहान लागलेली असताना , वाताची व पित्ताची व्याधी झाली असताना , भूक लागलेली असताना , तसेच काही आजाराने ग्रस्त असल्यास ( जसे – रक्तपित्त , राजयक्ष्मा , खोकला , दम लागणे , प्रचंड थकवा , अजीर्ण , ताप असतेवेळी , लघवीची तक्रार , अस्थिभंग , कानाचे विकार इत्यादी ) व्यायाम करू नये . वर्षा ऋतूत व्यायाम टाळावा / सौम्य स्वरूपात करावा .

अतिव्यायामाने होणारे त्रास – विविध शारीरिक व्याधी अति व्यायामाने उद्भवू शकतात . तसेच , जर लक्षणांची तीव्रता अधिक असली , तर मृत्यूही ओढवू शकतो .

व्यायामाचे फायदे – व्यायामाचे सर्वांगीण फायदे आहेत . केवळ शारीरिक पातळीवर नव्हे , तर मानसिक , भावनिक , आत्मिक फायदेही आहेत . व्यायामामुळे शरीरात हलकेपणा जाणवतो , काम करण्याची क्षमता वाढते तसेच शरीराची ENDURANCE CAPACITY ( सहनशक्ती ) देखील सुधारते . शरीरातील तिन्ही दोषांमध्ये समतोल साधला जातो , पचनशक्ती सुधारते , नित्य व्यायाम केल्याने वार्धक्य फार काळ टाळता येते . शरीराचा बांधा सुंदर , सुगठित , प्रमाणबद्ध व आकर्षक होण्यास मदत होते . शरीरात पोषक अंश उत्तमरित्या पोहोचल्याने , आळस – थकवा दूर होऊन , कफाच्या विविध व्याधींपासूनही आराम पडतो / त्रास होत नाही . शरीराची ताकद वाढते ( CAPACITY ) तसेच आरोग्यप्राप्ती होते , रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते . थकवा , श्रम , तहान , उष्णता व शीतलता सहन करण्याची क्षमता वाढते . कांती सुधारते .

शारीरिक बल आयुर्वेदानुसार तीन प्रकारचे असते –
सहज ( जन्मत : असलेली ताकद ) , कालज ( वयानुरूप आणि काळानुरूप , कमी जास्त होते ती ताकद ) आणि युक्तिकृत ( ACQUIRED ) . हे बल म्हणजे काही वेगळे नसून व्याधिप्रतिकारशक्ती आहे . व्यायामाने युक्तिकृत बल वाढविता येते . यामुळे रोगप्रतिबंध चांगल्या पद्धतीने करता येतो . पण जर रोग झालाच , तर त्याची लक्षणे आणि तीव्रता कमी ठेवण्यासही मदत होते . पण हे फायदे तेव्हाच मिळू शकतात जेव्हा रोज , अर्धशक्ती व्यायाम ( वर्षा ऋतू व उन्हाळ्यात अर्धशक्ती पेक्षा कमी ) न चुकता केला जातो

योग व व्यायाम यातील फरक –
योगाभ्यासामध्ये अष्टांग योग अभिप्रेत आहे . पण हल्ली केवळ आसन व प्राणायाम यालाच योग म्हटले जाते . योगाभ्यासात शरीराच्या ज्या हालचाली आहेत , त्या श्वसनाबरोबर SYNCHRONISED आहेत . यात स्थिरतेसाठी अधिक प्रयास केला जातो . ( स्थिरसुखं आसनम् ) योगाभ्यासात प्रत्येक पेशीला ACTION & COUNTER ACTION केली जाते . मांसपेशीचे CONTRACTION & RELAXATION केले जाते . सम्यक् व्यायामाची जी लक्षणे सांगितली आहेत . त्यातील कुठलेच लक्षण योगाभ्यासात अपेक्षित नाही . ( श्वसनाची गती वाढणे , घाम येणे , थकवा जाणवणे वगैरे . )

पण व्यायाम आणि योगसाधनेने दोन्ही , शरीर – मन इंद्रिये – भावना व आत्मा यावर सकारात्मक परिणाम होतो . व्यायाम कुठला करावा हा प्रत्येक व्यक्तीसाठी सापेक्ष आहे , बदलू शकतो . पण किती करावा व कधी करावा हे नियम तेच राहतील .

वैद्य . किर्ती मंदार देव
स्वकृत ,
नौपाडा , ठाणे .
९८२०२८६४२९

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..