नवीन लेखन...

द अदर साईड ऑफ सोल – २

पांगरी मार्गे देवरुखला जाणारा रस्ता अगदीच अरुंद. समोरून एसटी आली आणि बाईक चालवणारा धाडसी नसेल तर मातीच्या साईडपट्ट्यांवर बाईक जाणारच.

त्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला निर्धास्तपणे गेला आणि मी साईडपट्ट्यांजवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कोसळलो . गाडी माझ्या अंगावर पडली होती आणि मला ती बाजूला करता येत नव्हती .
पण माझ्या सुदैवाने , शेजारच्या झाडाजवळ जेवायला बसलेला एक तरुण धावत आला आणि त्यानं गाडी बाजूला केली. मला उठवलं आणि शेजारच्या त्या झाडाच्या सावलीत नेलं.

पाणी प्यायला देताना तो माझ्याकडे तो एकटक बघत होता. ” सर , तुम्ही आम्हाला शिकवायला होता.” तो म्हणाला , मी त्याच्याकडे बघत राहिलो.त्यानं काही काही संदर्भ दिल्यावर मला हळूहळू सगळं आठवायला लागलं.

तो अतिशय हुशार विद्यार्थी होता. अभ्यासू , कष्टाळू , नम्र. कला , क्रीडा आणि अभ्यासातील गुणवत्तेमुळं सतत दोन वर्षं तो आदर्श विद्यार्थी ठरला होता . बोर्डानं गुणवत्ता यादी बंद केली म्हणून अन्यथा बोर्डातही तो चमकला असता. इंजिनिअरिंग च्या सीईटी मध्ये त्याला चांगलं रँकिंग होतं. मला सगळं सगळं लख्ख आठवलं.

” तू इथे काय करतोयस ? इंजिनिअर झालास ना? ” ” इंजिनिअर नाही झालो सर मी आणि इथे दगड फोडतोय खडीसाठी…”

तो काही बोलणार इतक्यात कुणाची तरी हाक ऐकू आली. माझ्याकडे एकदा बघून तो हसला. गाडी उभी करून ठेवली आणि तो निघून गेला. त्याचा जेवणाचा डबा तसाच पडला होता . आणि त्या डब्याखाली दहाबारा कागद होते .
वाचावेत की नको या द्वंद्वात असताना मी अभावितपणे ते कागद उचलले . आणि वाचू लागलो…

— बस झालं शिक्षण. आता बाबाला मदत करायला हवी. खडी फोडून फोडून त्याचे हात जखमांनी भरून गेलेत. म्हातारा झाला बाबा आता. अजून किती दिवस…

— पुण्यातल्या या कॉलेजात , इथल्या झगमगाटात , मॉडर्न पोरांच्या कलकलाटात जमणार नाही आपलं काही. अभ्यास करताना बाबा आठवतो. अब्रू वाचवायला उसाच्या फडात गेलेली आणि जळलेली आई आठवते. आणि सगळं सोडून बाबाकडे धावावं वाटतं …

— स्टँडवर आलो , गाडीत चढलो आणि बाबा पुन्हा आठवला. खाली उतरलो. त्याला सांगितलं होतं ,
‘ मी नुसता इंजिनिअर नाही होणार , इंजिनिअरिंगचा अभ्यास करता करता कलेक्टरची परीक्षा पण देणार आणि तुझ्यावरच्या अन्याय दूर करणार.’ सांगितलेलं सगळं आठवलं आणि स्टँडवरून पुन्हा सरकारी होस्टेलवर आलो.

— कलेक्टर व्हायलाच हवं आणि अशा जागी पोहोचायला हवं की ज्या जागेवरून बाबाला सन्मानानं न्याय मिळवून देता येईल. फार सोसलंय बाबानं. – साखर कारखाना चालवणाऱ्या राजकारण्यांनी , बाबाची दहा एकर उसाची शेती हडप केली. त्याला फसवलं. कारखान्याचं सदस्य केलं. सहकारी बँकेतून वीस लाखांचं कर्ज उचलायला लावलं. बाबाच्या हातात वीस हजार ठेवले आणि त्याला आयुष्यातून उठवला. जाब विचारायला गेल्यावर त्या लोकांनी मारहाण केली आणि आईच्या पाठी गुंड लागल्यावर ती आपल्या उसाच्या फडात शिरली. उसाबरोबर तिनं स्वतःला जाळून घेतलं. अब्रू वाचवायला …

— अन्याय तर शाळा कॉलेजातसुद्धा होत होता. पेपर चांगला लिहूनसुद्धा मार्क दिले जात नव्हते. दहावी आणि बारावीला तर गुणांचा बाजारच मांडला होता शिक्षकांनी . सायन्सच्या प्रत्येक विषयाच्या वीस गुणांपैकी प्रत्येक गुणाला हजार रुपयांचा भाव होता. तिथले अनेक गुण पैशाअभावी नष्ट झाले. जिद्दीनं केलेल्या अभ्यासामुळं वाचलो.

सतत मानहानी… आर्थिक चणचण …गरिबी …सतत अन्याय …
नैराश्य . उदासी .
जीव द्यावा आणि सगळं संपवावं असं वाटायचं .
पण डोळ्यासमोर बाबा दिसायचा . त्याला झालेली मारहाण .. आईचा शेतात जळणारा देह …पोट भरण्यासाठी केलेली वणवण …
आणि घाटमाथा सोडून कोकणात रस्त्यासाठी खडी फोडण्यासाठी कंत्राटदाराकडे बाबाने केलेली नोकरी …ठराविक डेपो पूर्ण झाला नाहीतर त्याने मजुरी कापून घेतल्यावर उन्मळून पडणारा , हांजी हांजी करणारा बाबा …

– बाबा सारखा आठवायचा. जगण्यासाठी केलेली भ्रमंती आठवायची. भिकेला लागल्यावर नातेवाईकांनी फिरवलेली पाठ .
बाबाच्या मित्रांनी केलेली निर्भत्सना. कॉलेजमध्ये सगळ्यांनी टर उडवल्यावर सुटीत घरी आल्यानंतर कोलमडलेल्या मनाला सावरून धरणारा बाबा …

— सुटीचं इकडे आल्यावर बाबाला मदत करायची सवय लावून घेतली आणि बाबाच्या हाताच्या जखमा बघून , सोलपटलेले पाय बघून , खपाटीला गेलेलं पोट बघून उद्वेगानं शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि आता लहानशा झोपडीत बाबाला सांभाळतो. जरा दूर गेलो की तो घाबरतो , हाका मारत राहतो. बस. आता हेच आयुष्य. बाबाच्या शेवटच्या दिवसात त्याला जमेल तेवढं सुखी ठेवायचं…

मी हादरलोच त्याचं ते लिखाण वाचून .

— मी कागद उलटला. आता पुन्हा दचकायला झालं. हातात काहीच नव्हतं. हात रिकामे होते. म्हणजे मग , इतका वेळ आपण वाचलं ते काय? मन सुन्न झालं. एका अत्यंत हुशार विद्यार्थ्याच्या आयुष्याची सगळी शोकांतिकाच झाली होती. व्यवस्थेनं त्याचं आयुष्य खाऊन टाकलं होतं. मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. त्यानं अन्य कुणाकडे मदत का मागितली नाही ? अन्याय कुणाला का सांगितला नाही? की ती त्याची मजबुरी होती. की परिस्थितीनं त्याला हतबल केलं होतं? की मानसिक दृष्ट्या तो अपंग झाला होता… त्याला विचारायचं म्हणून मी उठलो. पण थांबलो. दूरवर खडी फोडल्याचा आवाज येत होता आणि त्याचं कुठंही लक्ष नव्हतं. एकाग्रतेनं तो खडी फोडत होता. मी गाडी वळवली आणि माघारी फिरलो. झाडाकडे एकदा पाहिलं. मघाशी दिसलेले कागद आता कुठंच दिसत नव्हते …

( पूर्णतः काल्पनिक ! )

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

दि .१४ जुलै २०२०

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..