नवीन लेखन...

टाकीचे घाव सोसल्या शिवाय ‘देव’ पण येत नाही

‌खरं तर दगडातून एखाद्या विशिष्ट देवतेची मूर्ति बनवावयाची असेल तर दगडाला छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने भरपूर घाव सोसावे लागतातच. बनवणाऱ्या मुर्तीकाराला,तो कितीही मोठा कलाकार असू देत,पण आपण देवतेची मूर्ती बनवत आहोत हे माहीत असूनही तो त्या दगडावर घाव घालतोच ना?

त्यानंतर तयार होणाऱ्या मूर्तीला पूजनाच्या अधिष्ठानावर बसवून, मंत्रोच्चाराच्या संगतीने त्यावर पूजा संस्कार केले जातात. मांगल्य निर्माण केले जाते.यामूळे त्या मुर्ति मध्ये पावित्र्य वास करु लागते असे म्हणतात.

त्या नंतर भक्तिरसाच्या वर्षावात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

कोणत्याही धातूची लाकडातून किंवा दगडातून जेव्हा ‘देव’म्हणून एखादी मूर्ती साकारली जाते,ती जवळजवळ अशाच पद्धतीने.

असे सर्व माहीत असताना सुद्धा आपण त्या विशिष्ट आकारातील मूर्तीला, शिल्पाला ‘देव’असे संबोधतो.

बहुतेक प्रत्येक धर्मातच मूर्त किंवा अमूर्त स्वरुपात देवाचे स्थान आहेच. त्याचे सर्व धर्मातील पावित्र्य सुध्दा सारखेच आहे.त्या मागचा असणारा भक्ति रस ही सर्वांचा सारखाच.देवांच्या केवळ नावांमध्ये आणि रुपा मध्ये वैविध्य असते.

‌ आज, सुशिक्षितपणा व शास्त्रीय दृष्टिकोन सोबत घेऊनच जन्माला आलेलो आपण व लहानाचे मोठे झालेलो आपण. खोलवर जाऊन जेंव्हा चिकित्सा करतो, या मूर्त किंवा अमूर्त कल्पनेत खरच देवत्व असतं का? याचा विचार करू लागतो.

आणि येथेच मग ‘देव’ या कल्पनेला अनेक फाटे फुटू लागतात.

कोणाला या मूर्तींमध्ये देव दिसतो, तर कोणाला सत्कर्मात तो दिसतो. कुणी दानधर्म करुन त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतो.आणि कुणी आपल्या आचरणातून स्वतः च देवमाणूस बनण्याचा अट्टहासही करत असतो.

पण खरा देव मला वाटतं माणसाच्या कल्पनेतूनच साकारतो. नाही का ?

‌‌ हा खरा देव कल्पनेत असतो. आपल्या मनाच्या श्रद्धेमध्ये असतो.

‌ श्रद्धा म्हणजे सुद्धा दुसरे-तिसरे काही नसून मनाच्या कल्पनेचाच एक आविष्कार होय.
माणूस हा समाजशील आणि भावनाशील प्राणी आहेच .
जीवन जगत असताना त्यात सुकरता यावी यासाठी नेहमीच प्रयत्न करणारा.

दरवेळी केलेले प्रयत्न सफल होतीलच याची शाश्वती त्यालाही नसते. पण अशावेळी खचून न जाता मनःशांती मिळवण्यासाठी,पुन्हा प्रयत्नांची कास पकडण्यासाठी त्याला कुठेतरी एखादे श्रद्धा स्थान असावे असे सारखे वाटत असते. जेणे करून त्याच्या समोर बसून आपली तक्रार त्याला मांडता येईल. डोळे मिटून शांतपणे ध्यानमग्न अवस्थेमध्ये त्याच्या पुढ्यात बसले थोडावेळ तर, मनावरील अपयशाचा ताण नाहीसा करता येतो. तसेच आपल्या या श्रद्धास्थानाला साकडं घालून पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागता येतं.

माझ्या मते असे श्रद्धास्थान जे असते ते आपण देवतांच्या मूर्तीं मध्ये शोधत असतो. आपल्या मानसिक अवस्थेची ती एक नितांत गरज असते.

या गरजेला आपण भावनांचे कुंपण घालतो. ही गरज भागवण्यासाठी, मनः शांती मिळवण्यासाठी ,आपण करत असलेल्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी अशी श्रद्धा स्थानं फार आवश्यक ‌असतात. मग ती कोणत्याही देवतेच्या रुपात असतील तरीही हरकत नाही.

हीच श्रद्धा एका मर्यादेपर्यंत बाळगणे केव्हाही चांगले. पण तिला अमर्याद महत्त्व देऊन, त्याचे अवडंबर करत तिला अंधश्रद्धेचे रूप येता कामा नये.किंबहुणा त्यात राजकारण येता कामा नये.कारण अंधश्रद्धा आणि राजकारणाला स्वार्थाचा संसर्ग फार पटकन होऊ शकतो.

‌असे म्हणावेसे वाटते की,
” ईश्वरी श्रद्धा ही मनाच्या कोंदणातच शोभून दिसते. तिचे प्रदर्शन होऊ लागले, की तिला स्वार्थाचा किंवा राजकारणाचा वास येऊ लागतो.”

‌ या श्रद्धेला आपल्या घराच्या देवघरात किंवा एखाद्या मंदिराच्या गाभार्यातच मांगल्य युक्त वातावरणात, तेलाच्या अखंड ज्योतिर्मय प्रकाशात तेवत ठेवावयास हवे. बाहेरच्या वादळाशी टक्कर देण्यासाठी तिला कधीच अधांतरी सोडू नये. आणि तिचे पावित्र्य भंग करू नये. ज्याला हे उमगले, समजले त्यालाच खऱ्या अर्थाने देव समजला.देव भेटला. असे आपण म्हणू शकतो. काय? खरं आहे ना…?

© नंदिनी देशपांडे.

१२, सप्टें २०१८.

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

1 Comment on टाकीचे घाव सोसल्या शिवाय ‘देव’ पण येत नाही

  1. खुप छान मानसातील देवपण आणि मुर्तीतील देवपण अगदि अचुक शोध.मुर्तीपुजा हि शांती देऊन जाते मनाला.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..