नवीन लेखन...

सूर्याला प्रदक्षिणा

तारीख, वार, स्थळ, वेळ, प्रसंग, व्यक्ती यातील लहानसहान तपशीलासह मला अनेक भेटी लक्षात राहतात.म्हणजे मुद्दाम प्रयत्न करावा लागतो असं नाही.. खरं तर त्या विसरलेल्याच नसतात…

सूर्याला याची गरज भासत नसली तरीही जेव्हा माझ्यासारखा पहिल्यांदाच साक्षात सूर्यावर लिहिणार असतो तेव्हा तपशिलाची बंधने आपोआप येतात.

मराठी भाषेचं सौष्ठव अधोरेखित करण्याचं काम करणारी आणि मला कायम स्तिमित करणारी चार व्यक्तिमत्वं म्हणजे ज्ञानोबा माउली, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि श्री. दा. पानवलकर ! या मंडळींच्या लेखणीतून व्यक्त होणारी मराठी काही औरच ! तुम्ही -आम्ही बोलतो ती मराठी त्यांच्या भाषेपेक्षा वेगळीच वाटते.

भुसावळला  शाळेत असताना ” ने मजसी ” आणि “जयोस्तुते ” कानी पडायचे आणि त्या वयातही कान तप्त व्हायचे. वडिलांनी ” माझी जन्मठेप ” वाचणं बंधनकारक केलं होतं. सुरुवातीला कंटाळा पण नंतर त्यात केव्हातरी गुंतून गेलो. अर्थ तरीही फारसे समजले नव्हते कारण ते सगळं बघितलं नव्हतं. पुढे एकदा रत्नागिरीला जाणं झालं. सिएट मध्ये असताना नाशिकला सहकुटुंब गेलो असताना, मूड आला – ” भगूर ” ला जाण्याचा ! स्वातंत्र्यवीरांचा विचार तेथे अनुभवला. स्वातंत्र्य समरात त्या कुटुंबातील सगळ्यांचाच मूक सहभाग तेथे वाचता आला. त्यांचा त्याग, त्यांचे देशप्रेम, त्यांचे कर्तृत्व अस्तित्वाला वेढून गेले. माझा पौगंडावस्थेतील मुलगाही तेथे फिरताना स्तब्ध झाला होता. अंगावरचा असा काटा, याआधी अनुभवला होता माउलींच्या संजीवन समाधीच्या शेजारी – आळंदीला !

आत्मीय मंगेशकर भावंडांनी सावरकरांना, त्यांच्या काव्याला यथोचित न्याय दिला. घराघरात नेऊन ठेवले. हे त्यांचे कर्ज न फेटण्यासारखे ! सावरकरांना हुबेहूब नजरेसमोर उभे केलं त्यांनी.

बाबुजींनी आयुष्यभराचं स्वप्न म्हणून स्वातंत्र्यवीरांवर काढलेला चित्रपट पाहिला. त्यासाठी सावरकर दर्शन प्रतिष्ठानने केलेले महत्प्रयास वाचले. सोप्पं नव्हतंच अंगारावर चित्रपट काढणं ! पण बाबुजीही त्याच जातकुळीतील !! प्रेक्षकांच्या देणग्यांवर निघालेला हा चित्रपट. त्यातील बाबुजींच्या आवाजातील वेगळ्या चालीचे ” ने मजसी ” . मंगेशकरांचा अधिक्षेप/ अवमान करण्याचा हेतू नाही पण हे गीत जास्त भिडले. दस्तुरखुध्द सावरकर पडद्यावर आणि तो अथांग सांजकालीन सागर.  व्याकुळता म्हणजे काय हे शब्दकोशात वाचलं होतं, इथे त्या मानवाची तितकीच अथांग विनवणी व्याकुळ करून गेली. यातील सावरकरांची भूमिका केलेल्या शैलेंद्र गौर यांचे ठाण्यात सरस्वती मंदिरातील व्याख्यानमालेत झालेले व्याख्यान मी सपत्नीक ऐकले.

अटलजी आणि पुलंचे सावरकरांबाबत ओघवते विचार ऐकले आहेत.

या साखळीतील शेवटची कडी – मागील वर्षी भुसावळला गेलो असताना सहज एक स्थानिक मासिक हाती लागले. किती प्रयत्नानंतर नाशिकच्या रेल्वे स्थानकावर ” भगूर ” बाबत दिशादर्शक फलक लागला याबद्दलची  गौरवास्पद बातमी त्यांत सचित्र छापण्यात आली होती.ऊर भरून आला आणि झालेल्या उशिराबाबत दिलगिरी मनात उभी राहिली.

स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्थेच्या वतीने चाललेल्या समाज कार्याचे माहितीपर मार्गदर्शन त्यात करण्यात आले होते. भुसावळच्या शाळेतून ज्या महामानवाबाबत प्रथम काही कानी पडले त्या माझ्या गावात आता सावरकर विचार कृतीतून फोफावतोय यापरता आनंद नाही.

सर्वव्यापी सूर्य असा भेटत गेला मला. त्याचा माझ्या आयुष्यातील हा प्रवास. आता फक्त सेल्युलर जेल हे तीर्थस्थान बघायचे आहे. म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होईल.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..