नवीन लेखन...

स्मरणगाथा : ६ 

संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !

अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान !

‘ कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .’

ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो .
प्र .ल. वाट बघत होते .

‘ आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .’
माझ्या स्कूटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कूटरला किक मारायला विसरलो .

‘ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ?’
मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले .
‘ एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल ?’
‘ ते त्यालाच विचारा .’
त्यांनी विषय संपवला .

आम्ही हॉटेलवर आलो .
रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
‘ जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .’
‘ अहो पण …’
मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .

त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . कीआणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती .
पण त्या कथेवर नाटक ?

मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .

प्र ल मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .
आणि प्रकाश बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती .

हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .

शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले .
एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .

त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते . आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .
पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .
दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .

‘ नाटकाचे नाव काय ठेवणार ? ‘
प्रकाशजीनी विचारलं .
अरे , चल उचल !
‘ असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .’
ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
‘ हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला . ‘

— आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस …अनेक गोष्टी .

‘खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..’

त्यांना मी एक प्रत दिली .
ते त्या रात्री मुंबईला गेले .
नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
अचानक संपर्क थांबला .
मीसुद्धा व्यग्र होतो .
आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
‘ प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू झाला आहे …’

मला धक्काच बसला .
अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .

नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं .
त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं . त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं .
पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं .

त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .

एखाद्या संहितेचं भागधेय असतं.
प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही .

पण मी नाराज नाही .
कारण माझी संहिता दमदार आहे .
कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे .
दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी देणारं आहे .
आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत .

मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय .

केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;

“…श्रीनटेश्वर , रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी , धमाल विनोदी नाटक , अरे , चल उचल ! ”

आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे.

– डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
८९५१९०६७०१
——-
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..