नवीन लेखन...

सर्व्हिस मोटार ते लक्झरी

काळाबरोबर जगणं धावपळीचं बनलं होतं. घरातून बाहेर पडलं की लगेच गाडी मिळायला पाहिजे, अशी मनोवृत्ती बनत होती. खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. एसटीही आपलं रूपडं बदलू लागली. एशियाड सेवेनं शहर जोडली. ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ यासारख्या गाड्या दिमाखात धावत खासगी आरामगाड्यांशी स्पर्धा करू लागल्या. एसटीचा विकास आणि विस्तार होत राहिला. खासगी वाहतुकीचाही विस्तार होत राहिला…


शहरात कुठंतरी व्यापार पेठेत किंवा वर्दळीच्या बसतील, अशा सीटवर आठ लोक बसल्यावर ‘अजून एकदोघं पाहिजे होते…’ असं म्हणत कुरकुरत ड्रायव्हर मोटार सुरू करायचा. लोक एकमेकांच्या मांडीवर पुढं-मागं सरकून बसलेले असायचे. ‘लई गर्दी झाली…’ असं कुणी म्हटलं तरी ड्रायव्हर मोटार थांबवल्यासारखी करून म्हणायचा, ‘गर्दी झाली तर उतरून चालायला लागा. तुम्हाला आवातणं घेऊन आलो नव्हतो घरला…’ तक्रार करणारा गप्प बसायचा, सर्व्हिस मोटारचं असं हे रोजचंच चालायचं. मोटारीबरोबर ड्रायव्हरच्या तोंडाची टकळीही संतत चालू असायची. ठराविक थांब्यांवर प्रवासी उतरत, नवे प्रवासी घेत मोटार डुगुडुगू धावायची.

सुरुवातीच्या स्टॉपवरच्या आधी आलेल्या लोकांना गाडी सुरू होईपर्यंत तास-दोन तास अवघडून बसावं लागायचं. गाडी सुटेपर्यंत चहा पिऊन येतो म्हणावं तर जागा जाण्याची किंवा गाडीच निघून जाण्याची भीती असते. कधीतरी ही मोटार नेहमीचा रस्ता सोडून शहरातच गल्ली, बोळ ओलांडत, हॉर्न वाजवत एखाद्या पेठेतल्या घरासमोर थांबायची. रणरणतं ऊन आणि आतली घुसमटणारी गर्दी. माणसं वैतागून जायची. ड्रायव्हरशेजारच्या सीटवर कुणी नसायचं. त्यावरून प्रवाशांना अंदाज यायचा की कुणीतरी महत्त्वाचं माणूस येणार आहे. तासभर झाला तरी कुणी येण्याची हालचाल दिसायची नाही. ड्रायव्हर बिनबोलता बसून राहायचा. गाडीत बसलेली माणसं शिजून निघाल्यावर कधीतरी तासाभरानं पदर सावरत ठुमकत कुणीतरी बाईसाहेब’ यायच्या. कुणीतरी कुजबुजायचं ‘फौजदारीणबाई आल्या.’ ड्रायव्हर अदबीनं दरवाजा उघडायचा. त्या बसल्यावर हळुवार बंद करून घ्यायचा. त्यादिवशी ड्रायव्हरची बडबड कमी असायची. तर असा फौजदारीणबाईंचा नांहीतर मामलेदार बाईंचा शो महिनाभरातून एखाद्यादिवशी असायचाच.

वाहतूकसेवा सुरू झाली, त्या सुरुवातीच्या काळात हे असंच चित्र असायचं. खासगी लोकांनी ही मोटार सेवा सुरू केलेली होती, तिला सर्व्हिस मोटार म्हटलं जायचं. वाहतूकसेवेला नि नव्हते. ती त्या मालकांच्या मर्जीनुसार चालायची. जिथं चांगल्या सडका असायच्या अशा प्रमुख मार्गावरच ती चालायची. आजुबाजूच्या, दुर्गम भागातल्या लोकांनी चालत प्रमुख रस्त्यापर्यंत, फाट्यापर्यंत यायचं आणि सर्व्हिस मोटारची वाट बघत बसायचं. खासगीकरणाच्या प्रारंभीच्या जमान्यात प्रवाशांना किंमतच नव्हती आणि वाहतूकदारांचीच मनमानी होती, हे कळायचं. एसटीच्या खासगीकरणाची चर्चा केली जायची, तेव्हा जाणती मंडळी. खासगीकरणातल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्यांच्या अनुभवावरून पूर्वीच्या खासंगी वाहतुकीची काहीएक कल्पना करता येऊ शकते.

वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी प्रारंभ महाराष्ट्रात खासगी काल वाहतुकीचा १९३२ च्या सुमारास व्यावसायिकांद्वारे झाला. या व्यावसायिकांची मनमानी वाढू लागल्यावर त्यापुढच्या आठ-दहा वर्षांत या वाहतुकीचं नियमन करण्याची गरज भासू लागली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८मध्ये ‘बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन’ (बीएसआरटीसी) या नावानं प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली. प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला. बीएसआरटीसीची पहिली बस दि. १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या भागातील वाहतूकसेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला..

एसटी सेवा हळूहळू वाढत, विस्तारत गेली.. ‘गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एसटी’ अशा घोषणा झाल्या. गावोगावी एसटी पोहोचलीसुद्धा. शिक्षणप्रसार झाला. खेड्यातली पोरं शिकायला शहरात जाऊ लागली. अशा मुलांचे जेवणाचे डबे एसटी मोफत नेऊ लागली. फणसाचा घमघमाट घेऊन कोकणातून मुंबईकडं एसटी धावू लागली. आंब्याच्या सीझनमध्येही तसाच अनुभव येऊ लागला. म्हैस व्यायल्यावर खरवस घेऊन जाण्यासाठी एसटीच उपयोगी पडू लागली. एसटीनं खेडी आणि शहरांमधले ऋणानुबंध वाढवले. एसटीनं प्रवासी वाहतूकच केली नाही, तर माणसांशी जिव्हाळ्याचं नातं जोडलं.

पण काळाबरोबर माणसांच्या सवयी बदलत होत्या. जगणं धावपळीचं बनलं होतं. वेळ महत्त्वाचा वाटू लागला होता. त्यामुळं एसटीची वाट बघत थांबणं जमत नव्हतं. घरातून बाहेर पडलं की लगेच गाडी मिळायला पाहिजे, अशी मनोवृत्ती बनत होती. खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. कुठं त्याला ‘वडाप’ म्हणत होते. कुठं ‘काळीपिवळी’ तर कुठं ‘टमटम’. खासगी वाहतूक जोरात सुरू झाल्याचा फटका एसटीला. बसू लागला. एसटी डबघाईला आली. खासगीकरणाची चर्चा अधूनमधून डोकं वर काढू लागली. एसटीला वाचवण्यासाठी प्रशासन, कर्मचारी संघटना वेगवेगळे उपक्रम राबवू लागले. एसटीही आपलं रूपडं बदलू लागली. ‘गाव तिथं एसटी’ हे सूत्र धरून ठेवलं. त्यासाठी छोट्या आकाराची मिडीबस काढली. बदलत्या काळाची गरज ओळखून परिवर्तन बस सेवेत आणल्या. एशियाड सेवेनं शहरं जोडली. ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ यासारख्या गाड्या दिमाखात धावत खासगी आरामगाड्यांशी स्पर्धा करू लागल्या. एसटीचा विकास आणि विस्तार होत राहिला. त्याबरोबर खासगी वाहतुकीचाही विस्तार होत राहिला. दोन दशकांपूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणापुरत्या आणि त्याही चार-दोनच असलेल्या लक्झरी बसेस गावोगावी धावू लागल्या.

चाळीसच्या दशकात सुरू झालेल्या सर्व्हिस मोटारीचा प्रवास आज पुन्हा खासगी वाहतुकीपाशीच येऊन ठेपला आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्यात अनेकदा ‘सर्व्हिस मोटारीं’चा उल्लेख येतो. ‘सर्व्हिस मोटार’ नावाची त्यांची एक कथाच आहे. एका लहान खेडेगावात नव्यानं मोटार-सर्व्हिस सुरू होते आणि त्यामुळं त्या गावाचं पूर्वीचं जीवन कसं बदलून जातं, याचं चित्रण त्यांनी कथेत रेखाटलंय. याच कथेवर त्यांचं ‘तू वेडा कुंभार’ हे नाटकही बेतलंय. एकूणच प्रवासी वाहतुकीचा ७५ वर्षांचा प्रवास अनेक वळणं घेत इथपर्यंत आला आहे. गाड्या बदलल्या. काळ बदलला. पिढ्या बदलल्या. एकूण प्रवासी आणि ड्रायव्हरांसह वाहतूकदारांची मनोवृत्ती किती बदलली, याचा विचार केला तर प्रत्येकाच्या नजरेला वेगळं चित्र दिसेल.

विनोद सुर्वे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..