नवीन लेखन...

सायसाखर

पडवीतून गोठ्यात उघडणारं दार , आईनं रात्री उघडलं , तेंव्हाच लक्षात आलं , आज काहीतरी वेगळं घडणार आहे .
एरव्ही ते दार कायम बंद असायचं . दरवेळी मुख्य दरवाज्यातून बाहेर पडून , अंगणातून गोठ्यात जावं लागायचं .

पण आज वेगळीच घाई सुरू होती .

बाहेर काळ्याकुट्ट रात्रीबरोबर गोठवून टाकणारी थंडी वाढत होती . आणि आम्ही ओटीवरच्या माच्यावर बसून सगळी घाई बघत होतो . मध्येच मदतीच्या नावाखाली थोडी लुडबूड केली पण अण्णांनी उबदार शालीत गुंडाळून माच्यावर बसवून ठेवल्यानं नाईलाज झाला होता . आम्हाला तिथं बसवून , अण्णा न्हाणीघरातील मोठ्या पाणचुलीत लाकडं पेटवायला गेले होते . आईनं त्यांना मोठ्या हंड्यात पाणी तापवायला सांगितलं होतं .

भिंतीवरच्या खुंटीवर अडकवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात आईची लगबग दिसत होती .

पडवीत आईनं पेंढा अंथरला होता आणि पडवीतल्या रेज्याला पेंढ्याची एक पेंडी बांधून ठेवली होती .

गोठ्यात गेलेली आई , कपिला गायीला घेऊन आली आणि तिचं दावं , खांबाला बांधलं .

कपिला गाय आमची लाडकी होती . पण आज ती वेगळीच दिसत होती . पोट खूप फुगलं होतं . ती चमत्कारिक चालत होती . खूप दमल्यामुळं मलूल व्हावं , तशी ती मलूल झाली होती .आणि तिच्या डोळ्यातून पाणी वहात होतं . खांबाला बांधल्यानंतरसुद्धा ती सतत इकडे तिकडे फिरायचा प्रयत्न करीत होती . मध्येच हंबरत होती . कसल्या तरी वेदना तिला होत होत्या .

आणि आई मात्र तिच्या अंगावरून मायेनं हात फिरवत होती . मध्येच पदरानं कपिलेचे वाहणारे डोळे पुसत होती .

आणि गंमत म्हणजे एरव्ही आम्हाला जवळ येऊ न देणारी कपिला आज आईला चिकटून उभी रहात होती . आईच्या अंगाला मान घासत होती. आणि आई तिला तेवढ्याच मायेनं जवळ घेत होती .

– आम्हाला झोप केव्हा लागली ते कळलंच नाही .

सकाळी गायीच्या हंबरण्यानं जाग आली आणि आम्ही ताडकन उठून पडवीत आलो .
आणि बघत राहिलो .

कपिलेजवळ हरणाचं पाडस उभं असावं असं एक गोड , गोंडस वासरू धडपडत उभं होतं . आणि कपिला त्याला जिभेनं चाटत होती . आई त्या वासराला कपिलेजवळ धरून बसली होती . आणि दुसऱ्या हातानं हळुवारपणे वासराला गोंजारत होती .

” तुमच्या आईनं केलं हो बाळंतपण कपिलेचं , अगदी हलक्या हातानं .”

अण्णा सांगत होते .

पण ते काय बोलत होते , त्याचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता .

सगळं लक्ष त्या वासराकडे होतं .

– आज इतक्या वर्षांनी आईचा मायाळू स्पर्श जाणवला .

एसटी बसमधून घरी येताना बाहेर सहज लक्ष गेलं .

रस्त्यात एक गाभण गाय कुणाची तरी वाट पहात असल्यासारखी दिसली . ती अस्वस्थ होऊन फिरत होती . आणि तिच्या तिच्या डोळ्यातून पाणी वहात होतं.

मग मला लहानपणीची कपिला गाय आणि तिच्या अंगावरून मायेनं हात फिरवणारी आई आठवली .

एसटी ने आता वेग पकडला होता आणि ती रस्त्यावरची गाय दृष्टीआड झाली होती .

पण माझ्या डोळ्यासमोर आई लख्ख उभी राहिली .

– न्हाणीघराची पडवी म्हणजे आईचं एकछत्री साम्राज्य होतं .

माजघरातून न्हाणीघरात जायला दार होतं , पण आईनं तिथून कधीच ये जा केली नाही . स्वयंपाकघरातून न्हाणीघरात जायला जे दार होतं , तिथून ती जात येत असायची .

उन्हाळ्यात रातांब्याची उस्तवार करण्यासाठी तिला न्हाणीघर बरं वाटायचं . रातांबे फोडायचे , सालं वाळत घालायची आणि बिया पिळून झाल्या की त्याचे मोठाले लाडू तयार करून ते अंगणात वाळत घालायचे आणि नंतर पावसाळ्यात रातांब्याच्या वाळलेल्या बिया कुटून त्याचं कोकमतेल बनवायचं .

हा तिच्या अनेक व्यापातला एक भाग होता .

एरव्ही आवळ्याची सुपारी , फणसाच्या गऱ्याची भाजी , सुपाऱ्या सोलून वाळत घालायच्या , शेतातून हळद , आलं आणून त्याची उस्तवार करायची , आंब्याच्या दिवसात बेगमीचं लोणचं , बेगमीची उसळी मिरची , उकडांबे हे सगळं करताना तिचा दिवस केव्हा सरायचा हे तिला कळत नसे . तिच्या हातच्या पदार्थांची चव अन्य कुणाच्या पदार्थांना येत नसे . अण्णांच्या शब्दात सांगायचं तर , ‘ती जीव ओतते सगळ्या गोष्टीत .’

एकदा अण्णांनी मला हळूच माजघराच्या दारात नेलं आणि लहानशा फटीतून बघायला सांगितलं .
मी बघू लागलो .

आई मोहरीचे उकडांबे घालत होती . प्रत्येक आंबा पुसून त्याला हळुवारपणे गोडेतेल लावून बरणीत ठेवत होती . आणि त्या आंब्यांशी गप्पा मारत होती. ” आता नीट आत रहा , चांगलं पुसून , तेल चोपडून ठेवलंय , एकमेकांना घासू नका , नाहीतर साल तुटेल . गुण्यागोविंदानं नांदा …” असं बरंच काही बडबडत होती .

मला हसू आलं .

” कोण हसतंय मोठ्यांदा ? ”

आई ओरडली खरी पण मग तीच हसू लागली . दार उघडलं .

” अरे , आंब्यांशी बोललं , हलक्या हातानं त्यांना हाताळलं , तर बरं वाटतं त्यांना . हसता काय सगळे ? त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ पण जातो माझा .”

अण्णा कपाळावर हात मारून हसत बाहेर गेले .

मी आईच्या बोलण्यातलं तथ्य शोधत बसलो .

आईला हे सगळं करायला वेळ केव्हा मिळतो , हे कोडं कधीच उलगडलं नव्हतं . पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ती कामात व्यस्त असायची .

चेहऱ्यावर कधी थकवा जाणवला नाही आणि कामाबद्दल तक्रार ऐकायला मिळाली नाही . कामात चुकारपणा पाहायला मिळाला नाही आणि काम नाही म्हणून स्वस्थपणा बघायला मिळाला नाही . प्रसंगपरत्वे जुनी गाणी गुणगुणत , स्तोत्रे म्हणत आणि सवड झाली की असेल , मिळेल , दिसेल ते पुस्तक वाचत बसलेली असायची . त्यातूनच तिचं जीवनविषयक तत्वज्ञान बनत गेलं होतं .

सगळे सण आमच्याकडे आईच्या स्पर्शानं पावन व्हायचे .

प्रत्येक सणाला खास काहीतरी असायचं .

मग कधी ते ठिपक्यांच्या रांगोळीत दिसायचं . कधी गणपतीत आरास करताना दिसायचं . दिवाळीत आकाशकंदील तयार करताना दिसायचं .

आम्हाला गणपतीच्या मूर्तीला हात लवायला परवानगी नसायची . पण चतुर्थीच्या आधल्या सायंकाळी मूर्ती घरी आली की आईबरोबर मूर्ती बघताना मजा वाटायची .

अण्णांच्या नकळत आई गणपतीला औक्षण करायची , त्याच्या गालावरून हात फिरवायची . रंगसंगतीचं कौतुक करायची . उंदीरमामाला गोंजारायची . बाप्पाला जपून आणलं म्हणून त्याच्यासमोर गूळ ठेवायची .

गणपती विसर्जनाच्या दिवशी ती रडवेली व्हायची , म्हणायची , ” चेहरा बघ कसा उतरलाय तो . जपून जा बाबा , आणि पुढल्या वर्षी लवकर ये ”

गणपतीच्या दिवसातल्या प्रत्येक दिवसाच्या भावना ती बोलून दाखवायची . गणपतीवर मानवी भावभावनांचं आरोपण कसं करायचं , ते तिनं शिकवलं .

– त्या दिवशी न्हाणीघरात रडण्याचा आवाज आला म्हणून मी बघायला गेलो तर , वाडीतली दरडातली लक्ष्मी रडताना दिसली .

आई तिला बडबडत होती .

“– रानडुकराचं मटण खायची गरज होती काय त्याला ? आठलीडोंगरातून अख्खा गाव त्या डुकराचा माग काढत होता . त्यात सगळा दिवस घालवलात , आणि वाट्याला काय आलं , तर वाटीभर मटण . ते सुद्धा पचवता आलं नाही , मग हे असं होणारच …”

आईनं मग तिला कसलं तरी झाडपाल्याचं औषध दिलं .

दोन दिवसांनी पुन्हा लक्ष्मी आली .

” आता काय झालं ? ”

” पोराच्या तोंडास चव नाय .”

आई आत गेली .

आणि चांद्याच्या पानांचा द्रोण तयार करून त्यात लिंबाचं लोणचं घालून दिलं .

” कायतरी मटण म्हावरं खाता नी आजारी पडता , त्यापेक्षा गरम भात , वरण खायला दे .”

ती बडबडत म्हणाली . लक्ष्मी निघून गेली पण खाण्यावर नेमकं भाष्य करून गेली .

आमच्याकडे प्रघातच पडून गेला होता . कुणी आजारी पडला की हमखास आमच्याकडल्या लोणचं , मिरचीला पाय फुटायचे .

कधीकधी मी रागावायचो .

मग ती म्हणायची ,

” आपल्याला देवानं काही कमी दिलेलं नाही . आणि मी तरी माझ्याकडचं कुठं काय देते ? जे देवानं दिलं , त्यातलंच तर मी त्यांना देते .”

असं काही आई सांगू लागली की राग पळून जायचा .

– आई अशी कुठून कुठून मनात उगवत राहिली .

कधी हौसेनं लावलेल्या हापूसच्या कलमांना स्वतः कळशीनं पाणी शिंपून निगराणी करणारी आई…
देवाला वाहण्यासाठी , अण्णांना भरपूर फुलं लागतात म्हणून स्वतः फुलझाडं लावून , झाडं बहरली की आनंदी होतानाची आई…

पासष्टच्या चक्रीवादळात झाडांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर कोलमडून गेलेली पण पुन्हा तितक्याच जिद्दीनं उभं राहण्यासाठी खंबीर बनलेली आणि आम्हाला खंबीर बनवणारी आई …

शिमग्यात पालखी नाचवणाऱ्यांचे खांदे सोलपटून निघाल्यानंतर त्यांना लोणी हळद देणारी आई…

एका शिमग्यातल्या आईचं रौद्ररूप अजून आठवतं .
आईचं आणि अण्णांचंसुद्धा .

गावकऱ्यांना शिमग्यात मोठी होळी , तीसुद्धा आंब्याच्या झाडाची लागायची .
दरवर्षी अशी अनेक झाडं तोडली जायची .
त्यावर्षी आमच्याकडील झाड तोडायला गावकरी पहाटे चारच्या सुमारास आले.
ढोल ताशांच्या आवाजाने आम्ही जागे झालो .
सगळे गावकरी आमच्या आवारातील मोठे झाड तोडायला आले होते .
आम्ही सगळ्यांनी विरोध केला , पण ते कुणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते .
कधी न भांडणारे आई अण्णा खूप भांडले , रागावले , झाड तोडायला विरोध केला .पण काही उपयोग होत नव्हता . शेवटी आईनं मला पुढं ढकललं , म्हणाली , ” जा त्या झाडाला मिठी मारून उभा राहा , तुला तोडल्याशिवाय त्यांना आंब्याला हात लावता यायचा नाही , जा , बघतोच आम्ही आता, ते काय करतात ते .”
आईचं हे असं रुद्ररूप मी कधी पाहिलंच नव्हतं .
मी तिरिमिरीनं पुढं झालो आणि त्या झाडाला घट्ट मिठी मारून उभा राहिलो .
पुढं काय होईल याचा विचारसुद्धा मी केला नाही . बिथरलेले आणि झिंगलेले गावकरी काय करतील याचा अंदाज नव्हता .
आणि तसंच झालं .
दोन चार गावकरी कुऱ्हाडी घेऊन पुढे आले . सगळ्यांचा श्वास अडकला . ढोल वाजवणारे अचानक थांबले . काहीतरी भयंकर घडणार याची कल्पना आली .
इतकावेळ भांडणारे , बडबडणारे गावकरी अवाक होऊन पाहू लागले .
कुऱ्हाडी घेऊन आलेल्यांकडे मी एकदा पाहिलं. आणि त्यांचा अवतार बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली .पण क्षणकालच . मी स्वतःला सावरलं . डोळे मिटून मी झाडाला चिपकून उभा राहिलो .
पण काहीच घडलं नाही . मी डोळे उघडले . आता सीन पालटला होता .
बाकीच्या गावकऱ्यांनी , अंगावर धावून येणाऱ्यांना आवरलं होतं .
आम्हाला शिव्या देत सगळे निघून गेले होते .
आई अण्णा धावत माझ्याजवळ आले .
आईचं रौद्ररूप मावळलं होतं .
ती धाय मोकलून रडत होती . माझ्या गालावरून तिचा हात फिरत होता . मध्येच ती झाडावरून हात फिरवत होती . पुन्हा रडत होती .अण्णा तिला सावरत होते .
” या झाडासाठी मी तुला पणाला लावलं .” एवढं बोलून ती मटकन खाली बसली .

खूप वेळानं आमचं घर सावरलं . त्यादिवशी आईनं पंचपक्वान्न करून नैवेद्य दाखवला . मला जवळ घेऊन ती म्हणाली ,
” आज तुझ्यामुळं माझं आणखी एक लेकरू वाचलं .” अण्णा हसत घरात आले . ” ही सायसाखरेची वाटी आंब्याच्या झाडाजवळ मिळाली .” ” मीच नेऊन ठेवली होती . त्यातली सायसाखर आंब्याच्या मुळांना लावली . आता उरलेली तुम्ही सगळ्यांनी खा . ”

सायसाखर ही आमची गंमत होती . साखरेची गोडी सायीत मिसळली की नातं घट्ट होतं. सायीची स्निग्धता सगळ्यांना सामावून घेते . असं आईचं तत्वज्ञान होतं . त्यामुळं कामात राबराब राबलेले आईचे हात कितीही खरखरीत असले तरी सायसाखरेसारखे मृदू मुलायम आणि गोड वाटायचे .

– आज सगळं आठवलं .

– एसटी थांबली . मी उतरलो . घरी निघालो . रात्र झाली होती . घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली . आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती .

सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती …

— डॉ . श्रीकृष्ण जोशी.

९४२३८७५८०६

रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..