नवीन लेखन...

गरिबी, स्ट्रगल व अस्तित्व

नुकतंच प्रणयचं  कॉलेज चालू झालं. मुंबई मध्ये जाऊन शिक्षण घेणं म्हटलं तर इतकं सोपं नव्हतं. घरच्यांचा विरोध पत्करून प्रणयने मुंबईसारख्या ठिकाणी अॅडमिशन घेतली होती. कायदा या क्षेत्रात पदवी मिळविण्याचा मानस होता प्रणयचा. मनाशी एक पक्की खूणगाठ बांधली होती. तसं पण ग्रामीण भागातून शहरी भागात मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घेणं खूप कठीण काम असतं. अॅडमिशन तर घेतली पण रहायचं कुठे हा प्रश्न सतावत होता. रोज अपडाऊन करणं परवडण्यासारखं नव्हतं. त्यात काॅलेज रात्रपाळीचं होतं.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे “कमवा आणि शिका” याची जाणीव प्रणयला होती. कारण घरची परिस्थिती अगदी हलाखीची होती. मुंबईनगरी मध्ये जाऊन तेथे राहून शिक्षण घेणं शक्य नव्हतं. काय करायचं आता…..? प्रश्न पडला होता. मदतीला कुणीही नव्हतं. कारण मुंबई मध्ये कुणीही कुणाचा नसतो. तेथील लोकांना एकमेकांकडे बघायला सुद्धा वेळ नाही. प्रचंड वेगवान जीवनशैली आहे. दिवसा पार्ट टाईम जाॅब करून रात्री काॅलेज करण्याचा निर्णय प्रणयने घेतला.

प्रणयसाठी तेथे सर्वच नवीन होतं. आजपर्यंत मुंबई बद्दल फक्त ऐकलं होतं. कधी सिनेमा मध्ये तर कधी न्यूज मध्ये बघितलं होतं. आज प्रत्यक्ष अनुभव येत होता. प्रणयने राहण्यासाठी सोय करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु राहण्याची सोय काहीच झाली नाही. त्यातच एकमेव आशा हाॅस्टेलची होती. परंतु तिथेही नंबर न लागल्यानं शेवटची आशाही संपली. आता काॅलेज कसं करायचं. रात्री काॅलेजची वेळ 6 ते 10 अशी होती. वाडा-जव्हार सारख्या ठिकाणाहून मुंबईला रोज अप डाऊन करणं इतकं सोपं नव्हतं. आता मात्र परिस्थिती पुढे  प्रणय हतबल झाला होता. काय करायचं हा प्रश्न सतावत होता. पण प्रणय खचलेला नव्हता. कारण काहीही झालं तरी आपलं उच्च शिक्षण पूर्ण करायचंच असा पक्का निर्धार केला होता त्याने.

दिवसा पार्टटाईम जाॅब करून रात्री काॅलेज असा दिनक्रम चालू झाला. राहण्याची कोणतीही सोय न झाल्यानं अपडाऊन शिवाय दुसरा पर्याय नव्हता. रोज 200 ते 250 कि.मी. प्रवास करून जाॅब सांभाळून प्रणयचं काॅलेज चालू होतं. खूप त्रास होत होता. कधी कधी वाटायचं काॅलेज सोडून दयावं. कारण दिवसेंदिवस त्रास वाढतच होता. सकाळी पहाटे घरातून बाहेर पडायचं.  रात्री घरी कधी पोहोचणार याची खात्री नसायची. कारण रात्री 10.30 वाजता वडाळा-दादर वरून प्रणय घरी यायला निघायचा. मग पुन्हा ठाण्याला आल्यावर वाडा बस पकडण्यासाठी घाई-घाईतच निघायचं. ठाण्याला बस स्टॅंडवर आल्यानंतर कळायचं की 2 ते 5 मिनिटांआधी बस निघून गेली. 2 ते 5 मिनिटांचं महत्व काय असतं हे तेव्हा समजायचं. मग पुन्हा रात्री 12.30 वाजता सुटणा-या बसची वाट बघायची. नाही तर कसंतरी भिवंडीला पोहोचायचं. कारण भिवंडीपर्यंत यायला बस मिळायची. भिवंडीला पोहोचायचं आणि मग खरी परिक्षा असायची. वाडा-जव्हारला यायची काहीच सोय नसायची. प्रायव्हेट टॅक्सी तर करू शकत नव्हता प्रणय. कारण आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती की, रोजच घरी प्रायव्हेट टॅक्सी करून येता येईल. भुकेल्या पोटी मग ट्रकवाल्यांना हात करत बसायचं. गाडीतच झोप घ्यायची. कधी कधी खूप भिती वाटायची, अनोळखी ड्रायव्हर असायचा, चांगला निघाला तर ठीक नाही तर…. आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर….लुटलं वैगेरे तर…..मनाला खूप भिती असायची, रोजचाच हा दिनक्रम चालू होता. मात्र एका दिवशी असा काही प्रसंग प्रणयच्या आयुष्यात घडला की, जगण्याला  एक  नवी दिशा मिळाली. जी व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होते, ती प्रत्येक व्यक्ती अशा अनुभवातून गेलेली असतेच. शेवटी यालाच तर जीवन म्हणतात.

प्रणय त्या दिवशी काॅलेजला गेला होता. आज डोकं नुसतं जड झाल्यासारखं वाटत होतं. लेक्चर खूप महत्वाचे होते म्हणून बंक पण करू शकत नव्हता. परिक्षा पण जवळ आलेली. पण आज काही तरी वेगळंच घडत होतं. काही तरी घडणार आहे असा भास होत होता. बाहेर पाऊस जोराने पडत होता. मग काॅलेज रात्री 10.00 वाजता सुटल्यानंतर दादर स्टेशनला 10-15 मिनीटात प्रणय पोहोचायचा, आज मात्र जरा उशीरच झाला. स्टेशनवर आज प्रमाणापेक्षा ट्रेनला जरा जास्तच गर्दी होती. नुसती चेंगरा चेंगरी चालू होती. कुणी मागून धक्का देत होता तर कुणी पुढून….एक तर खूप भूक लागली होती. अशातच 2-3 ट्रेन गेल्या पण बसायला काही जमलंच नाही. मग कसातरी गर्दीतच प्रणय ट्रेन मध्ये शिरला. इतकी प्रचंड गर्दी होती की काहीच समजायला मार्ग नव्हता. कसातरी उभाच राहून ठाण्यापर्यंत पोहोचला. गर्दीच इतकी असते की आतमध्ये उभा असणारा व्यक्ती आपोआपच दरवाजातून कसा उतरतो हे समजतच नाही. ट्रेनमधून खाली उतरल्यावर जरा बरं वाटलं. आता मात्र खूप भूक लागली होती. ठाणा बस स्टॅंडवर प्रणय पोहोचला. गरमागरम चणे- शेंगदाणे  खाऊ यात… या विचारात प्रणय होता. इतक्यात चणे-शेंगदाणे वाला आला. मग प्रणयने आपला हात पाकिट
काढण्यासाठी खिशामध्ये टाकला आणि बघतो तर काय पाकिट गायब…..पाकिट ट्रेनमध्ये मारलं होतं. गर्दीच इतकी होती की काहीच समजलं नाही….बॅग चेक केली, पुन्हा खिसे चेक केले……अरे बापरे…आता काय करायचं. रात्रीचे 11.30 ते 12.00 वाजले होते. खिशात 1 रुपया सुद्धा नव्हता. भूक लागली होती हेच विसरून गेला प्रणय. आता जायचं तरी कसं घरी. भाडयाला सुद्धा पैसे नव्हते. आजूबाजूला ओळखीचं पण कुणी नव्हतं. बरं रात्रं इतकी झाली की कुणी मित्र पण येऊ शकणार नव्हता. आता काय करायचं याच विचारात असतांना कानावर पडलं की रात्रीची 12.30 वा. ची बस आज जाणार नाही. आता मात्र पायाखालची जमीनच सरकली. खूप भूक लागली होती. आज स्टॅन्डलाच थांबायला लागणार याची जाणीव झाली. हे कमी होतं की काय आणखी पाऊस जोराने आला. भर पावसात पूर्ण रात्रभर भुकेल्यापोटी प्रणय उभा होता. काय करावं सुचत नव्हतं. रात्री 1.00 ते 1.30  वाजले होते. पोटात कावळे ओरडत होते. पायांमध्ये गोळे आले होते. मनाला खूप वाईट वाटलं, आता मात्र राहावलंच नाही. डोळे कधी पाणावले ते समजलंच नाही.

लाईफ मध्ये स्ट्रगल करावं लागतं. पण इतकं करावं लागतं. हे मात्र कळून चुकलं होतं. आता मात्र थकल्यासारखं वाटत होतं. मनाने प्रणय पूर्ण खचला होता. एका धक्क्यावर प्रणय शांतपणे बसला. डोळ्यांतून आसवं गळत होती. नशिबाला दोष देत मनाला समजावत होता. खूप राग आला होता स्वत:च्याच जीवनाचा….त्यातच गरीबीचा आणि करावं लागत असणा-या स्ट्रगलचा…देवाला एकच विणवणी करत होता की, हे सर्व माझ्याच लाईफ मध्ये का होतं…..मलाच इतक्या दुःखांना सामोरं का जावं लागतं. मन भुकेने व्याकूळ झालं होतं. मग अचानक प्रणयच्या नजरेसमोर अंधार दाटून आला. क्षणार्धात त्याचं मन भूतकाळात शिरलं.

इथपर्यंत पोहोचायला आजपर्यंत किती स्ट्रगल करावं लागलं होतं. परिस्थितीशी, गरीबीशी सामना करत इथपर्यंत प्रणय पोहोचला होता. त्याच्यासमोर ते सर्व दिवस नजरेसमोर आले. लहानपणीचे गरीब परिस्थितीचे, हालाखीचे दिवस आठवले….ते लहान  घर….आपल्या मुलाने शिकावं म्हणून  दिवसरात्र काम करत असणारे आई-वडील त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट, त्यांची धडपड….घरची आर्थिक परिस्थिती बेताची म्हणून त्या गरीब परिस्थितीला सामोरं जाताना करावं लागलेलं काम…अगदी लहानपणी वहया-पुस्तके घ्यायला पैसे नव्हते म्हणून राना-वनांत जाऊन पळसाची पान आणून पत्रावल्या लावायच्या…… मुहाच्या झाडांखाली जाऊन मुहा जमा करायची…सुकलेल्या शेणे-या जमा करायच्या…..भाजीपाला विकायचा… कुणाच्या घरी जाऊन कलरचं, पेंटींगचं काम करायचं….रात्र रात्र जागून पुठ्ठा कंपनीचं केलेलं काम….दिवसा काॅलेज करून रात्री कोका-कोला कंपनीमध्ये जाॅब करायचा.

रात्री वाहतुकीचे साधन नसायचे तेव्हा वनीडा कंपनीच्या धक्कयावरच झोपलेले ते दिवस आठवले…. शिक्षणासाठी पैसे मिळावेत म्हणून केलेली ही धडपड आठवली…प्रणय आजपर्यंत प्रत्येक परिस्थितीला, संकटाला सामोरे गेला होता. इतकं स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचला होता. हे सर्व काही क्षणात नजरेसमोर आलं. आता मात्र प्रणयला राहावलं नाही. हृदय प्रणयचे रडले….डोळे पाण्याने भरले….

अरे माझ्याच नशिबात असं का…? माझ्याच नशिबात इतके कष्ट का… ? मी काय कुणाचं वाईट केलं आहे की माझ्या लाईफ मध्ये मला इतकं स्ट्रगल करावं लागतं आहे. कधी कधी खूप वाईट वाटायचं…. भुकेल्या मनाला खूप वेदना व्हायच्या….. मन खूप तडफडायचं….. प्रणयला रोजच असे प्रश्न पडायचे आणि मग गरीबीला, आपल्या नशिबीला दोष देत कसं तरी मनाला समजवायचं….. “ही वेळ पण निघून जाईल….”  मग घरी पोहोचायचं तो पर्यंत भूक मरून जायची. त्यातच घरी पोहोचेपर्यंत पहाट झालेली असायची. रोजचाच हा दिनक्रम ठरलेला. जीवनात स्ट्रगल आणि गरीबी काय असते हे प्रणयपेक्षा आणखी कुणाला समजू शकतं. प्रणयने एक मात्र पक्का निर्धार केला होता की, “स्वताःचं शिक्षण पूर्ण करून एक दिवस स्वताःचं वेगळं अस्तीत्व निर्माण केल्या शिवाय राहणार नाही. जन्म जरी गरीबीत घेतला असला तरी मरणार मात्र गरीबीत नाही…..”

“यशाचा पाऊस तेव्हाच पडत असतो,

जेव्हा घामाचा दवबिंदू कर्तुत्वाने चमकत असतो आणी डोळ्यातला सागर दुखःची उष्णता सहन करत असतो…..”

अशा पद्धतीने प्रणयचं काॅलेज जीवन चालू होतं. मुंबई नगरी मध्ये काॅलेज जीवन जगत असतांना सुद्धा प्रणय काॅलेज जीवन enjoy करू शकत नव्हता. मनाला वाटायचं आपण पण enjoy करू यात…. प्रणयचा मित्र-मैत्रिणींचा छान ग्रुप सुद्धा होता. सर्व frnds श्रीमंत….म्हणून थोडी लाज सुद्धा वाटायची गरीबीची. प्रणयकडे स्वताःच्या पर्सनल लाईफकडे लक्ष दयायला वेळच नव्हता. जाॅब आणि शिक्षण यापलिकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. लवकरच 1st Sem ची exam आली. Exam चालू झाली. सेंटर विक्रोळी आलं होतं. पहिला पेपर झाला. दुसरा झाला…तिसरा झाला….पेपर छान गेले…मात्र चौथा पेपर लेबर लाॅ होता. तो पेपर मात्र देऊ शकला नाही. कारण पेपर दयायला जायला भाडयाला पैसे नव्हते. खर्च होता भाडयाचा 200 ते 250 रूपये. तेही न मिळावेत….

गरीबी काय असते….याचा अनुभव येत होता…कसं वाटलं असेल त्यावेळी प्रणयला…… कदाचित वर्ष वाया जाईल. कारण पेपर देऊ शकला नव्हता. तरीही मनाला समजावलं आता नाही तर 2nd Sem ला तो subject सोडवू यात. मनाला धीर दयायचा..

समजावायचा……एक दिवस नक्की येईल….तो दिवस फक्त आपला असेल….अशाप्रकारे प्रणयचं काॅलेज जीवन चालू होतं. गरिब परिस्थितीशी सामना करत….स्ट्रगल करत प्रणयने आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. कधी- कधी तर अशी परिस्थिती असायची की exam झाली तरी त्या विषयाचा पुस्तक खरेदी करायला मिळत नसायचं. कारण गरीबी आडवी यायची. मग पुस्तक न घेताच exam द्यायची. कधी-कधी प्रणयला याचा खूप राग सुद्धा यायचा. खूप वेदना होत असत. वाटायचं सोडून द्यावं…पण फक्त मनाला समजवायचं…..” ही वेळ पण निघून जाईल.”

“शेवटी शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे…जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे….”

असं किती तरी वेळा आपलं ध्येय, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी  या जीवनामध्ये कठीण प्रसंगातून जाव लागतं. परिस्थितीशी, गरिबीशी सामना करत प्रसंगी प्रचंड वेदना सहन करत, स्ट्रगल करावं लागतं, मेहनत करावी लागते.

“संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे, जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामधे क्षमता असते”

त्यानंरच आपण यशस्वी होतो. त्यानंतर आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचलेलो असतो.

“धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल पुढे टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल….!!

यानंतर आपलं स्वतःचं वेगळं अस्तीत्व बनलेलं असतं. त्यानंरचं आयुष्य मात्र बदलूनच जातं. लोक नेहमी उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात. त्याप्रमाणे जेव्हा आपण यशस्वी होतो. तेव्हा लोक आपल्याला मान-सन्मान देतात. आपला आदर करतात. पण जेव्हा आपण संकटात असतो. परिस्थितीशी सामना करत असतो. जेव्हा आपल्याला त्यांच्या आधाराची गरज असते. स्ट्रगल करत असतो. रात्रंदिवस मेहनत करत असतो. पण तेव्हा मात्र कुणीच मदत करत नाही. अगदी सख्खा नातेवाईक असो नाही तर कुटूंबातील व्यक्ती असो…किंवा अगदी भाऊ किंवा काका असो…. इथे प्रत्येकाला भिती असते. जर मी मदत केली तर कदाचित हा माझ्या पुढे जाईल. आज मला जो मान सन्मान भेटतो आहे…. लोकं मला विचारतात… तो झाल्यानंतर  त्याला विचारतील…माझ्या पुढे जाईल आणि म्हणून लोक एकमेकांना मदत करत नाहीत. ठीक आहे मदत नाही करायची तर नका करू…पण कधी कधी लोकं त्याच्या रस्त्यात काटे टाकतात…

खूप त्रास देतात….तो पुढे गेला नाही पाहीजे म्हणून विनाकारण खेचण्याचा प्रयत्न करतात….जर मदत नसेल करायची तर नका ना करू….पण त्रास तरी नका ना देऊ…. atleast फायदा नसेल करायचा तर नका करू पण मग तोटा तरी नका करू लोकांच्या या वागण्याचा तेव्हा खूप त्रास होत असतो. खूप वेदना होतात….लोकं असा स्वार्थी विचार का करतात…? अरे आज जर त्याचं चांगलं झालं तर भविष्यात मला कधी ना कधी गरज लागेलच की त्याची…उलट जर आपण त्याला आज त्याच्या कठीण परिस्थितीत मदत केली तर आपल्या कठीण परिस्थितीत तो आपल्याला नक्की मदत करेल…

नव्हे आपण हक्काने, भांडून आपलं काम करून घेऊ शकतोय असा विचार का करत नाहीत.

“प्रत्येक वेळेस तुम्हांला आपल्या लोकांची साथ मिळेलच असे नाही…., कधीकधी एकटे पण लढावे लागते, पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील….”

येणेप्रमाणे परिस्थीती असतांना आपण यशस्वी होतो. कठीण परिस्थितीशी सामना करत इथपर्यंत पोहोचल्यावर तेव्हा घेतलेल्या मेहनतीची, रात्रंदिवस केलेल्या परिश्रमाची किंमत समजते. कारण जेव्हा आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतो, रात्रंदिवस अभ्यास करत असतो. भुक-तहान विसरून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत असतो. या वाटेत अनेक संकटं येतात…काटे रूततात पायाला…प्रचंड वेदना होतात. आपली स्वत:ची पर्सनल लाईफ विसरून आपल्या ध्येयापर्यत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सर्व धडपडीत कधी कधी मित्र-मैत्रिणीं पासून, घरच्या लोकांपासून आपण दूर जातो….एखादी व्यक्ती तर इतकी जवळ आलेली असते…अगदी हृदयापर्यंत….पण ती व्यक्ती सुद्धा सोडून जाते….कारण त्या व्यक्तीला आपली किंमत नसते कारण आपण गरीब असतो…त्या व्यक्तीला फक्त पैसा हवा असतो आणि हवी असते ती श्रीमंती…. जेव्हा आपल्या सोबतची पोरं enjoy करत असतात. मित्र-मैत्रिणी, काॅलेज लाईफ जगण्यात…टीव्ही बघण्यात, सिनेमाला जाण्यात… हाॅटेल मध्ये टाईमपास करण्यात….क्रिकेट खेळण्यात….गर्लफ्रेंड, बाॅयफ्रेंडच्या मागे फिरण्यात वेळ घालवत असतात…..आणि तो मात्र स्वत:चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वत:चं वेगळं अस्तीत्व निर्माण करण्यासाठी दिवस-रात्र एक करून प्रयत्न करत असतो, खूप मेहनत करत असतो, कितीतरी कष्ट घेत असतो,  कितीतरी वेळा उपाशीपोटी…एक एक वडापाव खाऊन दिवस काढत असतो….

कितीतरी वेळा बस स्टॅंडवर, रेल्वे स्टेशनला झोपलेली असते ती व्यक्ती….इतकं स्ट्रगल केलेलं असतं.

“यशाकरीता केलेली सकारात्मक धडपड म्हणजे स्ट्रगल.”

मग प्राप्त होतं ते यश. यशस्वी झाल्यावर स्वत:चं वेगळं अस्तीत्व निर्माण होतं. आपण यशस्वीतेच्या शिखरावर जाऊन बसतो. आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते.

“स्वतःचं अस्तीत्व म्हणजे काय…? प्रणय 19 वर्षांचा असतांना आपल्या गरीबी परिस्थितीमुळे साधं B.sc. ला ज्या काॅलेजला अॅडमीशन घेऊ शकला नव्हता…त्याच काॅलेजला आज वयाच्या 24 व्या वर्षी प्रणयच्या एका शब्दावर…एका काॅलवर अॅडमीशन दिलं जातं….काही गरजू, गरीब मुलांची फी सुद्धा प्रणय स्वतःच भरतो….गरीब मुलांनी शिकावं म्हणून प्रयत्न करतो….. इतक्या कमी वयात यापेक्षा चांगली स्वतःच्या अस्तीत्वाची दुसरी Definition तरी काय करता येईल……”

“ज्याने आयुष्यात, पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीय….,

तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते..! कारण आनंदाची किंमत त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते…..!!

ठेच तर लागत राहणार ती पचवायची हिम्मत ठेवा…..

कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा…..

माणसाला स्वतःचा “फोटो” काढायला वेळ लागत नाही….

पण स्वतःची ” इमेज” बनवायला खूप वेळ लागतो…..!!

-अॅड.प्रफुल्ल पष्टे.
 (बी.काॅम. एल.एल.बी.)
 मो. नं. 7798136261
 9529804243

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..