नवीन लेखन...

नाना !

“पंडित, आहेस का घरात?” सक्काळी सहा वाजता, नाना गेट बाहेरून तार स्वरात ओरडले. हा म्हातारा कोंड्यापेक्षाही लवकर उठतो. कधी का उठेना. पण माझ्या गेटसमोर येउन बांग देतो! माझे शुभांगी आणि वामांगी शेजारी माझ्या नावाने बोंबलतात!

“अहो, त्या नानाला जरा सांगा न, सकाळी सकाळी असे भेसूर ओरडत नका जाऊ म्हणून? ते तुम्हाला आवाज देतात पण, आमची झोपमोड होते ना?” शेजारचे कांतराव एकदा मला म्हणाले.

“अहो, मी हजारदा सांगितलं. ऐकत नाहीत! ‘मी माझ्या तोंडाने बोंबलतो! इतरांना काय करायचंय? कोण्या हरामखोऱ्याला त्रास होतो? आण माझ्या समोर! का? तूच इतरांच्या नावानं हे मला सुनावतोस?’ असं मलाच म्हणाले! तुम्ही स्वतःच का सांगत नाहीत?”

“नको रे, बाबा!! तो दूर आहे तेच बर आहे! त्याला बोलायचं म्हणजे, पतल्या शेणावर दगड मारून, आपल्याच अंगावर  शिंतोडे  उडवून घेण्या सारखं आहे!! तुमचा दोस्त आहे, तुम्हीच सांभाळा!” कांतरावांनी शरणागती पत्करली.

खरं तर, या ‘सकाळच्या अलार्म’ला मीच जवाबदार आहे! एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांचे झाड जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक? त्यांच्यावर उखडलो.

“नाना, आम्ही इतके कष्ट करून झाड वाढवतो, खत पाणी देतो. अन तूम्ही फुलांची मलाई घेऊन जाता, याला काय अर्थ आहे?!”

“मग? त्याला काय होतय? तुझ्या फुलाचा, मी काय, माझ्या टकलाला गजरा करून, घालून फिरतोय काय? देवासाठीच तर फुल घेतोय!”

“माझ्या घरी पण देव आहेत!”

“असू देत! सगळ्या चराचरात देव असतो! तुझा देव आन माझा देव एकच आहे! माझ्या देवाला फुल वाहिली की तझ्या देवाला मिळतील! अन, एक टमरेल भर पाणी झाडाला घातल्याची, काय मिजाज सांगतोस? मी काय तो शेपूटघाल्या कांतू वाटलो कि काय, तुझं काहीही ऐकून घ्यायला?”

विनाकारण कांतरावला नाना हिणवून गेले. बोलता बोलता असं पाणी उडवायची त्याना सवय आहे! हे नाना म्हणजे मोठं कठीण प्रकरण!

“अहो, देवाला न्याचीत तर न्या कि. पण विचारण्याची काही पद्धत आहे का नाही?”

“असे का? आज घेतलीत. आता विचारून उपयोग नाही! उद्यापासून विचारीत जाईन.”

नानाची बोलती बंद केल्याचा अर्थात मला आनंद झाला. पण नाना डाम्बिस निघाले. त्या दिवशी पासून पहाटेच ‘पंडित, जागा आहेस का?’ म्हणून जोरकस हाळी मारू लागले! फुलाचा बहर संपला तरी, त्यांची हाळी बंद झाली नाही! ‘आज फुलंच नाहीत. म्हणून घेता आली नाहीत! तरी तुला सांगायला पाहिजे ना? म्हणून हाक मारली!’ मलाच सुनवतात!

नाना म्हणजे, बहात्तरीतले (खरतर तो ‘शुकबहात्तरीत’च आहे!), आख्या अळीने ओवाळून, ‘टाकायचं कुठं?’ या प्रश्नाला उत्तर नसल्याने, आळीतच ठेवलेले, एक (सद?)गृहस्थ! त्यांचा मुलगा गोपीनाथ, एकदम मऊ माणूस! बापाची तक्रार कोणी घेऊन आलातर हात जोडून उभा रहातो.

“देवा! नाना चुकीचं वागतात! त्यांच्या वतीने मी माफी मागतो. वय झालाय. पूर्वी असे नव्हते. मी एकुलता एक, माझ्या शिवाय ते कोठे जातील? आणि मी तरी त्यांना कोठे सोडू? तुम्ही समजदार आहेत, थोडं समजून घ्याल तर बरे होईल!” तक्रार करणारा काय बोलणार?

हे खरे आहे. नानांचं जिभेवर नियंत्रण नाही. काय तोंडाला येईल ते बोलतात. पण म्हणून मोकळ्या मनाचे नाहीत. मोठा आतल्या गाठीचा अन खुन्नसबाज माणूस! अश्या तिरसट माणसानं माझ्याशी मैत्री का करावी? आणि ती का टिकावी? हे एक कोडंच आहे.

नाना म्हणजे, एक ड्राय फ्रुटच मिनी स्टोर आहेत! चेहरा एका मोठ्या जर्दाळू सारखा, विशेषतः ते लोंबते गाल आणि रंग. खारकेच्या अठोळी सारखं चकचकीत, आणि टोकदार नाक! बाकी सगळीकडं सुरकुत्या असतील पण नाकावर एकही नाही! बोटची पेर सुकल्या खरकाच! डोळे बदामी, आकारानं आणि रंगानं सुद्धा. काही बदाम खऊट असावेत, ते त्यांच्या बोलण्यात मुरलेत!

‘पंडित!’ हा, त्यांनी मला बहाल केलेला ‘किताब’ आहे! कारण मी लॅपटॉपवरची काहीकाही माहिती त्यांना ऐकवत असतो! मला याच नावाने मला हाक मारतात. त्यात थोडासा कुचकटपणा असतोच.

“काय नाना? आज गाड्यावर वडा पाव? एकटेच खाताय? मला देणार नाहीत?” मला एकदा ते ‘बजरंग वडा’च्या गाड्यावर दिसले. मी त्यांची गंमत करण्यासाठी म्हणालो.

“कोण? पंडित? ये, ये! आता तुला वडा ‘नाही’ म्हणून कस चाललं? या नंतर, मला चहा तूच पाजणार ना?”

“वा! म्हणजे, तुम्ही वडापावची किंमत वसूल करणार?”

“बेकूफ! मुळीच नाही! कारण वड्याचे सुद्धा तुलाच पैसे द्यावे लागणार आहेत! मी आधी एक वडा खाला आहे. माझी पेन्शन संपली! पैसे नाहीत माझ्या जवळ!”

“पैसे नाहीत? मग कशाला खाताय बाहेरच?”

“मग काय करू? गोप्याच्या बायकोने आज काही केलं नाही! माहेरी गेली. मला भूक लागली होती! गोप्या बाहेरगावी गेलाय! चहा सांगतोस ना?”

नाना असेच आहे. तिरसटपणाचा बुरखा फाटून कधीकधी त्यांची आगतिकता चमकून जाते.

“नाना, तुमचं काय वय असेल?” मी विषय बदलला.

“मी न? बहात्तरिचा! पण बघ, कसा ठणठणीत आहे? तुझ्या सारखं कुबड चालावं लागत नाही! अन तुला चष्मा कधी पासून लागलाय?”

“नाना, अहो वाचायला लागतो. खूप दिवस झाले वापरतोय. तुम्हाला नाही लागत?”

“छट! मला त्याची गरजच पडत नाही! कारण मी वाचतच नाही!”

पण हे खोट आहे. नानांनी वाचायचं का सोडलं? याची कहाणी मला, त्यांनीच सांगितली आहे! ते आता ओळख दाखवणार नाहीत! एकदा नानाच्या चष्म्याची एक टांग तुटली. त्यांनी गोप्याला नवीन चष्मा घेण्यास सांगितले. नाना दोरी बांधून वापरू लागले. गोप्याची बायको, तिने एकदा, तो दोरीवाला चष्मा चपले खाली तुडवला. कारण ‘तुझी बायको मला, चारचा चहा सहा पर्यंत देत नाही!’ अशी तक्रार त्यांनी गोप्याजवळ केली होती!

एके दिवशी मी दुपारी लोळत होतो. साडेचारचा सुमार असावा.

“पंडित, काय करतोस?” नाना दारात उभा.

“नाना! साल, सुट्टीच पण आराम करू देत नाहीत.”

“आराम हराम असतो! तू करतोस? का मी करू?”

“काय?”

“चहा!”

“का? तुमच्या घरी चहा संपला का?”

“नाही! गोप्याची बायको, मला उकलल्या पत्तीचा चहा देते! म्हणून आलो! तुझ्याकडे रेड लेबल चहा असतो ना!”

“बसा, करतो!”

मी चहा केला. त्यात अंमळ साखर जरा ज्यास्तच घातली. नानाची फार मोठी अपेक्षा नसते. सोबत मारीचे काही बिस्किटे बशीत ठेवली.

त्यांनी अधाश्या सारखा चहाचा पहिला घोट घेतला.

“वा! पंडित! फक्कड चहा झालाय! साखर काय भाव झालियय?” मी समजलो साखर ज्यास्त झाली.

“नाना, त्या सोबत बिस्किटे घ्या. म्हणजे चहा फार गोड लागणार नाही.”

“पंडित! हि मारीची बिस्किटे म्हणजे, खपटाचे तुकडे! चव ना ढव! कुत्र्या पुढे टाकले तर, ते सुद्धा तोंड लावणार नाही! पण, तू काळजी करू नकोस! मी माझा ‘पार्ले-जी’ सोबत आणलाय!” त्यांनी खिशातून बिस्किटाचा पुडा काढला. मी समोर बसल्याची दखल न घेता एकट्यानेच खाऊन टाकला!

माझी बदली झाली. मी निघालो. नाना भेटायला आले.

“पंडित! आता मी एकटा पडणार बघ! मला काय भेट देणार?” हे नानाच डोकं! बदली माझी झाली, मला गिफ्ट देण्या ऐवजी, मलाच मागत होते.

“काय देऊ?”

“चार सहा पोस्ट कार्ड दे! तुझी आठवण आली तर पत्र लिहीन!”

“नाना, फोन करा कि, त्या पेक्ष्या.”

“मग! मोबाईल घेऊन दे!” मोबाईल त्यांच्या पर्यंत, गोपाळची बायको येऊ देणार नव्हती, हि त्यांची अडचण होती!

मी डझनभर पोस्ट कार्ड त्यांना आणून दिली.

०००

नवीन ब्रान्चला जॉईन झालो. चार-सहा महिन्यांनी, ‘येऊन जा.’ हे एकच वाक्य लिहलेले, नानाचे पत्र आले. त्यांनी भेटण्याचा पत्ता दिला होता. तो वाचून काळजात चर्रर्र झाले. तो एका वृद्धाश्रमाचा होता! खरे तर असं काही होईल असा माझा होरा होताच. नाना पडत घेणार नाहीत, आणि गोपाळची बायको (हिला नानांनी कधी ‘सुनबाई’ म्हटल्याचे मला तरी आठवत नाही. कारण गोपालचे लव्ह मॅरेज!) तर म्हाताऱ्याला झटकून दूर करायच्याच मागे होती. म्हणजे नानाच तसे सगळ्यांना सांगत. मी शनिवार रविवार गाठून गाडी काढली.

नानाचा वृद्धाश्रम झकास होता. टापटीप स्वच्छता होती. मी आधी मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेलो नानांची चौकशी केली. त्यांचा खोली क्रमांक घेतला.

“काय नाना कसे आहेत? बाकी हे मात्र मस्त झालं. इथे बरोबरीची मंडळी आहे. छान सोबत मिळाली तुम्हाला. कस वाटतंय इथं? करमत ना येथे?” मी विचारले.

“करमायला, इथं काय कॅबरे असतो कि काय? अन सोबतीच म्हणशील तर, येथे येणाऱ्या प्रत्यकाने आपापल्या ‘आठवणी’ सोबत आणल्यात! बाकी सोबतीची आम्हाला गरज पडत नाही! ते, तुझ्या फेसबुकमधलं नको बरळूस! नाव जरी ‘वृद्धाश्रम’ असलं तरी, हे म्हाताऱ्याचं ‘अनाथ आश्रमच’ असत! अरे आम्हाला, तुम्हा पोरांसोबत रहायचं असत! पोर सोबत नसतील तर, ‘घर’ काय अन ‘आश्रम’ काय दोन्ही सारखेच! काही फरक नाही!”

नानाच्या आवाजात पूर्वीचा जोर नव्हता. ते खूप थकल्या सारखेपणा दिसत होते.

“पण, नाना इथं कसे आलात?”

“काय करू? इलाज नव्हता! गोप्याची बायको, उगाच खुचपट काढून भांडली. ‘एक तर मी या घरात राहीन नाहीतर नाना रहातील! त्यांना वृद्धाश्रमात ठेव!’ तीन गोप्याला उल्टीमेटम दिला! तो का कू करूलागला. तर म्हणते कशी? ‘ काय होत त्या वृद्धाश्रमात न रहायला? मी नाही का माझ्या पिंट्याला, डेकेयर मध्ये ठेवते! मी पोटच्या पोराला ठेवते, तस तुही तुझ्या बापाला ठेव!'”

“बापरे! बरच रामायण झाल्यासारखं दिसतंय!”

“तर? रामायचं झालं, आता माझा वनवास सुरु झालाय! तर काय सांगत होतो? डेकेयर! मी म्हणालो,’ ठेव तुझ्या पोराला,अनाथ आश्रमात! अन जात जा शनिवार -रविवार भेटायला! करतेस?’ मग तीन भोकाड पसरलं! मलाच गोप्याची गोची बघवेना. आलो झालं इथं!”

“नाना, अशात काय आजारी-बिजारी होतात कि काय?”

“नाही रे! ते दवाखान्यातून आल्या पासून जरा थकवा वाटतोय!”

“दवाखाना?”

“अरे काही नाही. पंचविशीतला जवान पोरगा! दारून लिव्हर, पार गोवरीच्या खांडासारखं झालं होत! माझ्या लिव्हरचा थोडा भाग डोनेट केला! आता तो माझ्या लिव्हरच्या जोरावर पुन्हा दारू पीत असेल! माझ्या लिव्हरलापण व्हिस्कीची चव कळेल!”

“नाना! तुम्ही लिव्हर डोनेट केलंत!”

“हो! ते माझ्या मालकीचं होत! मी वाढवलेलं!”

“गोपूला माहित होत? काही म्हणाला नाही?”

“गोप्याला खूप वाईट वाटलं! कारण मी फुकटच दिल, पैसे घेतले नाहीत म्हणून! म्हणून माझ्यावर रागावला! ते राहू दे. माझ्या साठी काही आणलास का गोप्या सारखा हात हलवत आलास? गोप्या, खरतर मायाळू आहे रे, पण बायकोच्या नादान बिघडलाय!”

मी सोबत आणलेली शाल त्यांच्या खांद्यावर घातली.

“नाना, त्या बाकीच्या शाली तुमच्या हातानी तुमच्या मित्रांना द्या!”

नानांनी मी आणलेल्या शाली इतर आश्रमवासीयांना वाटल्या. माझ्या ‘पंडित’न आणल्यात म्हणून आवर्जून सांगत होते. मी त्याच्या उत्साहाकडे, डोळेभरून पहात होतो! सोबत थोडे सामोसे आणि केळी नेल्या होत्या. आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचेहि वाटप केले.

“पंडित! एक विचारू?”

नाना खरं तर असं कधी ‘विचारू?’च्या भानगडीत पडत नाहीत. कारण तो त्यांचा स्वभाव नाही.

“बोला कि नाना, अशी औपचारिक भाषा का वापरताय?”

“पंडित! माझं आयुष्य कारकुनीतच गेलं. कोट आमच्या खांद्याला लागण्याची सूतराम शक्यता नव्हती आणि आता नाहीहि. पण कोटाची हौस —-” माझ्या कोटाकडे पहात म्हणाले.

मी पटकन माझा कोट काढला त्यांच्या हाती दिला.

“मला! मी घेऊन टाकू?” त्यांच्या डोळ्यात एका लहान मुलाची अविश्वनीयता होती.

मी मानेनेच होकार दिला.  त्यांनी लगबगीने तो अंगात घातला.

“पंडित, तुमचं काय म्हणतात ते, मोबाईवर काढून घे! आपल्या दोघांचा फोटो!”

मी मोबाईल काढला. आमच्या दोघांचा एक सेल्फी काढून घेतला. काय वाटले कोणास ठाऊक? त्यांनी कोट माझ्याकडे परत केला.

“असू देत नाना!”

“पंडित, नाही झेपायचे ते कोटाचे ओझे माझ्या खांद्याला!”

आश्रमाच्या जवळ एक फटोस्टुडिओ होता. तेथे मी आमच्या फोटोची प्रिंट काढून घेतली. त्याच्याकडचीच एक फ्रेम विकत घेतली. परत आश्रमात आलो अन तो फ्रेमकेलेला फोटो नानाला दिला. त्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडत होता.

“माझा कोटातला फोटो!” ते स्वतःशीच पुट्पुले.

त्यांनी तो आपल्या पलंगाजवळच्या छोट्या टेबलवर ठेवून दिला. आणि पलंगावर बसले. फोटोकडे पहात.

“नाना, आता मी निघतो. काही लागलं तर काळवा. सारखं नाही पण, जमेल तस चक्कर मारत जाईन. तसेही गोपाळची चक्कर होत असेलच ना?”

“हो! कालच येऊन गेला! पेन्शन खात्याच्या चेकवर सही घेऊन गेला! महिन्यातून एकदा असते त्याची चक्कर!”

“नाना, उशीर झालाय. मी येऊ?”

नाना पलंगावरून उठले. माझ्या गळ्याला घट्ट मिठी मारली. खूप वेळ. जिवंत माणूस कधी न पहिल्या सारखी! तसही त्यांना मिठी मारणार किंवा त्यांना मिठीत घेणार होत तरी कोण? किती दिवसांनी, कि वर्षांनी असा प्रसंग त्यांच्या जीवनात आला असावा, देव जाणे! ती मिठी, माझ्या साठी निशब्द आशीर्वाद होता! काही बोलले नाहीत. माझ्याकडे पाठ फिरवून बसले. मी आश्रमाबाहेर पडलो.

०००

नानाचे या जगातले वास्तव्य संपले. ते गेल्याच कळलं. आतल्या आत काहीतरी तुटलं. डोळे भरून आले. माझे कोण होते? माझ्यात आपुलकीचा ओलावा शोधत आलेला एक माणूस. मी जमेल तस तो देण्याचा केलेला प्रयत्न! मनात घर करून गेले नाना. कायमच!

काही दिवसांनी ऑफिसच्या कामासाठी आलो होतो. मुद्दाम गोपाळला भेटायला गेलो. ‘दुःखात सहभागी’ असल्याची औचारिकता आटोपली. घराबाहेर पडताना, माझी नजर, तेथे टीव्ही शोकेसवर ठेवलेल्या फोटो फ्रेमवर गेली. ती तीच होती जी मी नानाला ,आमचा सेल्फी फ्रेम करून दिलेली होती! त्यात आता गोपाळ आणि त्याच्या बायकोचा फोटो होता!

गोपाळला बापाच्या फोटो पेक्षा, फोटोची फ्रेमच आवडली असावी!

हि जग रहाटीच आहे, उपयोगी वस्तू ठेवून घेतात! त्याला गोपाळने तरी का अपवाद असावं?

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..