नवीन लेखन...

कुदरत की गत न्यारी !

– कुमारजींच्या स्वरांनी मेंदू भंजाळून गेला होता.
सकाळपासून.

आकाशवाणीवर सकाळी सकाळी कुमार गंधर्वांचं निर्गुणी भजन लागलं आणि अंगावरची चादर दूर फेकून तो ताडकन उठला.

‘ हे आजच का लागावं गाणं ? ‘
त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला आणि काहीच न सुचल्यानं सैरभैर होऊन तो बाहेर पडला.

आणि वर्क फ्रॉम होम ची आठवण झाली, तसा पुन्हा घरी परतला.

दिवसभराचा वैताग पूर्ण करून तो पुन्हा बाहेर पडला.

कुमारजींच्या स्वरांनी त्याचा मेंदू पोखरायला सुरुवात केली.

कुदरत की गत न्यारी…

असं काही झालं की त्याची पावलं रत्नदुर्ग किल्ल्याकडे वळायची.
भगवतीला बाहेरूनच नमस्कार करून तो टेहळणी बुरुजामध्ये जायचा.

आत्ताही तो तसाच गेला आणि स्तंभाच्या पाठी असलेल्या टेहळणीच्या जागी जाऊन बसला.
ती जागा त्याची आवडती जागा होती.

तिथून बाहेर डोकावलं की तिन्ही बाजूला पसरलेला निळाशार समुद्र दिसायचा. पार दूरवर पसरलेलं अथांग पाणी. वर निळं आभाळ. मधूनच स्वैरपणे विहरणारे पक्षी आणि खालच्या बाजूला दिसणारी मुंग्यांसारखी माणसं. मधूनच केव्हातरी जेटीला बिलगून उभी असणारी होडकी.

हे नेहमीचं दृश्य. दीर्घ परिचयाचं. पण नवलाईचं असल्यासारखा तो पाहायचा.
आजसुद्धा एकटक नजरेनं तो पहात होता.
आणि अचानक त्याला बुरुजाला लागून असलेल्या डोंगरावर बकरी दिसली. स्वतःचा तोल सावरत ती झाडाचा पाला ओरबाडून खात होती.
डोंगरातल्या त्या अरुंद वाटेवर असलेल्या माणसाच्या हातात तिची दोरी होती. तो बकरीला दूर जाऊ देत नव्हता. हातातल्या काठीनं कधी तिला मारत होता. तर कधी झाडाची फांदी वाकवून झाडाचा पाला ओरबाडू देत होता.

कितीतरी वेळ तो हे दृश्य बघत होता.
आणि अचानक पुन्हा कुमारजींचा धीरगंभीर आवाज त्याच्या मनात घुमू लागला…

कुदरत की गत न्यारी…

त्यानं त्या बकरीकडे एकदा पाहिलं.
माणसाकडे पाहिलं आणि त्याला काहीतरी चमत्कारिक जाणवलं.

त्या बकरीला हे महित्येय की आत्ता हा माणूस झाडाचा पाला ओरबाडू देतोय, वेळ प्रसंगी स्वतः ओरबाडून तिला खायला देतोय.
पण उद्या हाच माणूस तिच्या गळ्यावरून सुरा फिरवणार आहे.
मसाला भरून शिजवून खाणार आहे.
माहित्येय का हे तिला ?

तो अस्वस्थ झाला.
बकरीला सांगायला हवं, की बाई गं, आज तू हे सगळं मिळणारं, आनंदानं ओरबाडून खाते आहेस, पण तिकडे धार लावलेला लखलखीत सुरा अधीर झालाय तुझ्या मानेवरून फिरायला…

सांगावं का ?
सावध करावं का ?

आणि त्याच क्षणी त्याच्या मनात स्वर रुंजी घालू लागले..
कुदरत की गत न्यारी…

नको त्या वेळी नेमकं हेच निर्गुणी भजन का आठवतं आपल्याला ?

पुन्हा ती बकरी दिसली त्याला.
ओरबाडून ओरबाडून पाला खाल्यानं पोट टम्म भरलेलं दिसत होतं.

त्याला वाटलं आपण सगळे बकरीच आहोत.
मिळेल ते, दिसेल ते ओरबाडून खाणारी बकरी.
गरज असो नसो ओरबडत राहायचं.
नाही ओरबडायला मिळालं की सरकारच्या नावानं बोंबलत फिरायचं.
कुणी ओरबडायला देत असेल तर त्याच्याकडे आधाशीपणानं धावायचं.
जो देईल त्याच्या नावानं चांगभलं म्हणायचं. ओरबडायचं. खायचं. पोट फुटेस्तोवर खायचं.
जे हक्काचं आहे तेही खायचं. जे हक्काचं नाही तेही खायचं.
निसर्गाला धुडकारून निसर्गातलंच खायचं. शेजाऱ्यापाजाऱ्यांचं खायचं.स्वार्थाला खायचं आणि परमार्थाला खायचं.
त्यासाठी कुणाच्या तरी हातात आपल्या गळ्यातली स्वाभिमानाची दोरी द्यायची.
आणि म्हणायचं.
चांगभलं !

वेळ येते तेव्हा गळ्यातली दोरी केव्हा कोण तोडतं, कोण मानेवरून सुरा फिरवतं, ते कधी कळतच नाही.
तेव्हा सारं संपलेलं असतं.

डोंगर अवघड असतो.
त्यातल्या वाटा अरुंद असतात.
खाली खोल अथांग समुद्र असतो.
लहानशी चूक.
कपाळमोक्ष ठरलेला.

तरीही कळत नाही.
कुदरत की गत न्यारी !

कुमारजींच्या गाण्यातला दर्द आत्ता त्याच्या ध्यानात आला.

त्याच्या लक्षात आलं,
सगळ्याला उशीर झालाय.
सगळं संपत आलंय.
कोरोना हे निमित्त झालंय, पण प्रत्यक्षात फक्त निर्गुणी भजन तेव्हढं चिरंजीव होऊन राहिलंय…

कुदरत की गत न्यारी !

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..