नवीन लेखन...

गृहप्रवेश

हल्ली इंटरनेट वर सगळीकडेच आपल्या प्रथा परंपरांना चुकीचे ठरवण्याचे पेव फुटले आहे. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे नव्या नवरीचा गृहप्रवेश. तिचे धान्यानी भरलेले माप पाऊलानी कलंडून घरात येणे. हे असे करणे कसे चुकीचे आहे. यात कसा अन्नाचा अपमान होतो. त्याला कसे लाथाडले जाते. या बद्दल अनेकदा बोलले जाते. त्याबद्दलच माझेही मत मला मांडवेसे वाटले म्हणून हे लेखन.
मुळात पाय आणि पाऊल यात एक फरक आहे. पाऊल आणि पाय दोन्ही शब्द ऐकायला जरी एकसारखेच वाटत असले, तरी दोन्हीत फरक असतो. पाऊल म्हणजे पायाचा खालचा, जमिनीला स्पर्श करणारा भाग. हा नाजुक, मुलायम असतो. आणि वरचा भाग असतो तो पाय.
या पाऊलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या पाऊलांवरच आपल्या शरीराचा डोलारा उभा असतो. आपल्या संतांच्या, गुरुजनांच्या, वाड वडिलांच्या पाऊलखुणांवरुनच आपण आपले मार्गक्रमण करत असतो, म्हणूनच आपल्या संतांच्या, गुरुजनांच्या, वाड वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेऊन चालला आहे, असे आपण म्हणतो. आषाढी वारीला विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेली वारकऱ्यांची पाऊले, म्हणूनच महत्त्वपूर्ण असतात. “पाऊले चालती पंढरीची वाट” असे अभंग आणि “राम कृष्ण हरी” चा नामजप करत, जेव्हा पंढरपुरात विठुरायाचे दर्शन त्यांना होते, तेव्हा त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे त्यांना वाटते. म्हणूनच त्यांची पाऊले वंदनीय होतात. कारण ती पाऊलेच, त्यांना विठ्ठल दर्शन घडवतात.
वामन अवतारात बटूच्या वेशात आलेले विष्णू केवळ आपल्या तीन पाऊलात आकाश, पाताळ आणि पृथ्वी व्यापतात, तेव्हा त्या पाऊलांमध्ये किती अचाट शक्ती असेल, हे आपण समजू शकतो.
आपल्या शास्त्रात म्हणूनच देवी देवतांचे, गुरूंचे, थोरा मोठ्यांचे चरणस्पर्श किंवा चरणपूजन करण्याची प्रथा आहे. आपल्याकडे गौर सुद्धा सोनपाऊली आली, असे आपण म्हणतो. लक्ष्मीची पाऊले काढली जातात. वेगवेगळ्या प्रथांमध्ये, देवतांच्या पाऊलांचे किंवा पादुकांचे पूजन करून त्यांचे चरणामृत, तीर्थ म्हणून प्राशन करतो.
सवाष्णींच्या पाऊलांवर दूध पाणी घालून, कुंकू लाऊन त्यांचे अर्चन आपण का करतो? तर ज्या देवतेच्या पूजनाचे प्रतीक, म्हणून आपण तिचे पूजन करत असतो, त्या देवतेचे रुप ती आहे, अशी आपली भावना असते. तिच्या मुखामधून आपली इष्ट देवता आपण अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करून आपल्याला, आपल्या घराला आशीर्वाद देत असते असे आपले शास्त्र सांगते.
आपल्या घरात विवाह करून आलेली नववधू, ही त्या घराची अन्नपूर्णा असते, गृहलक्ष्मी असते. म्हणूनच सासरी आल्यावर तिचे लक्ष्मी पूजन केले जाते. यासाठीच माहेराहून तिला अन्नपूर्णेची मूर्ती देण्याची आणि त्याचे पूजन लग्न विधीमध्ये करण्याची पद्धत आहे. ज्या घरची तू सून होत आहेस, त्या घरी धनधान्याची कायम बरकत व्हावी, अन्नपूर्णेची कृपा त्या घरावर कायम असावी, असा महान आशय त्या पाठी आहे.
अशा या गृहलक्ष्मीचा गृहप्रवेश करताना, धान्यानी शिगोशिग भरलेले माप तिने पायाच्या अंगठ्याच्या तळव्यानी, नाजूकपणे फक्त कलंडायचे आहे. उडवून किंवा लाथाडून टाकायचे नाही. यात घरात धान्य ओसंडून जावे, अशी कामना आहे. कारण ती गृहलक्ष्मीच्या, अन्नपूर्णेच्या शुभ पावलांनी घरात प्रवेश करत असते. लग्नविधी होताच ती स्वतःच अन्नपूर्णा, गृहलक्ष्मी असते. त्यामुळे तिच्या पावलांनी अन्नाचा उपमर्द होऊच शकत नाही. जमिनीवर धान्य सांडू नये म्हणून मापट्याच्या खाली फार फार तर एखादे वस्त्र ठेऊन, ते धान्य आपण वापरू शकतो.
नवीन घरात गृहप्रवेश केल्या नंतर दूध वर येईपर्यंत तापऊन, ते उतू घालवले जाते. यात जशी घरात सुख, समृद्धी ओसंडून जावी अशी शुभकामना असते, तीच शुभकामना नववधू गृहप्रवेश करत असताना, सगळ्यांच्या मनामध्ये असते. तेव्हा या प्रथेमध्ये काहीही गैर असे मला वाटत नाही. अर्थात हे माझे मत झाले, या लेखनातून कुणाच्याही मताचे खंडन करण्याचा हेतू नाही.
— सौ. अमृता विजय शेंडे.
email – amu.shende4@gmail.com

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

1 Comment on गृहप्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..