नवीन लेखन...

।। दिठी ।।

– काहीतरी हरवलं होतं.
काय आणि कधी ते मात्र लक्षात येत नव्हतं .

पहाटेपासून विधिवत पंचामृती पूजा चालली होती .
मांगलिक स्नानानंतर भाळावर चंदनलेपाची विशिष्ट मुद्रा आरेखित झाली होती.
वस्त्रप्रावरणांनी देहाला आलंकृत करणं सुरु होतं.
तुळशीचे प्रचंड हार गळ्यात घातल्यानंतर गुरुजींनी प्रथेनुसार दर्पण समोर धरला .
आणि विठुराया पाहात राहिला .

आपलाच चेहरा त्याला परका वाटू लागला .

ज्या मुखमंडळाची शोभा भक्तांना अवर्णनीय वाटायची , ज्या मुखदर्शनानं अनंत जन्माचं सुकृत फळाला आल्याचं सुख मिळायचं, ज्या प्रसन्नवदनाच्या दर्शनाची ओढ, भवसागर तरून जाण्यासाठी पंढरीच्या वारीला निमित्तमात्र व्हायची…
ते मुखकमल ,विठुरायानं दर्पणात पाहिलं आणि त्याच्या अंतर्यामी वेदनेचा महासागर उसळला .

आजूबाजूला महाआरतीचा , त्याच्या नामाचा , टाळघोषाचा, मृदंगाचा कल्लोळ , आसमंत भेदून जात होता .

पण निळासावळा सुकुमार पंढरीराया अस्वस्थ होऊन एकटेपणा सोसत होता .
कारण दर्पणात जे दिसलं , त्यामुळं परब्रह्माला अनंत यातनांची जाणीव झाली .

योगियांचा योगी असणाऱ्या विठ्ठलाची ‘ दृष्टी ‘ हरवली होती .
– केव्हा…
– कुठे…
– कधी …
– काहीच जाणवलं नव्हतं .

तो पाहत होता .
दर्शन घेणाऱ्यांच्या रांगा अव्याहत सुरु होत्या .
विठुराया दूरदूर पर्यंत पाहत होता .
हरवलेली ‘दृष्टी ‘ दिसत नव्हती .
कुणाच्याही काहीही लक्षात येत नव्हतं .
सर्व सोपस्कार , कार्यक्रम सुरु होते .
अंतर्यामी दुःखी असलेला राजसराया , शोध घेत होता .

– आणि त्याला अचानक काहीतरी जाणवलं .
नंतर दिसलं .
समोरून एक लहानगं बालक आपल्या बाळमुठी घट्ट आवळून , धावत त्याच्याकडे येत होतं.
बालक जवळ आलं आणि स्वतःच्या कटीवर हात ठेवून , डोळे मोठ्ठे करून एकदा बाप्पाकडे पाहिलं .
आणि गालाला गोड खळी पाडणारं स्मितहास्य करीत , दोन्ही हात फैलावून त्यानं बाळमुठी उघडल्या .

विठुराया बघत राहिला .
त्या मुठीत होती निरागसता .
त्या मुठीत होतं सुखाचं ,कैवल्याचं चांदणं .
पंढरीरायाला त्याची हरवलेली ‘ दृष्टी ‘ सापडली होती .

गेली अनेक वर्षे ,स्वतःला भक्त म्हणवणाऱ्यांच्या अशक्यप्राय मागण्यांमुळे ती हरवली होती .
कृत्रिम संवेदनशीलतेनं ती झाकोळली होती .
दांडगाईमुळं आणि अव्यवस्थेमुळं दर्शन न मिळाल्यानं , परत जाणाऱ्या खऱ्या भक्तांच्या , वारकऱ्यांच्या निराश , हताश मनात ती लपली होती .
प्रसिद्धीचं अवडंबर माजवणाऱ्या आणि सगळ्या प्रकारच्या कलांचा बाजार करणाऱ्यांच्या धनलोभात दृष्टी घुसमटली होती .

– आणि आता ती परत मिळाली होती . त्या बालकामुळे !!

विठुराया , विटेेवरून खाली उतरला . त्यानं त्या बालकाला उचलून घेतलं आणि भक्तांच्या महासागरातून तो सुसाट धावू लागला , एकांतवासाच्या शोधात …

— भक्तांचा महासागर सर्वच गोष्टीपासून अनभिज्ञ होता .
पाषाणाच्या मूर्तीत देवत्व शोधत होता , पाषाणासमोर साकडं घालत होता .

— आणि विठुरायाचं देवत्व, बाळमुठीत असलेल्या दिठी त सामावलं होतं…

— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..